Thursday, March 17, 2011

वायनाड (केरळ) ट्रीप

    ऑक्टोबरचा लाँग वीकेंड जवळ येत होता. रोजच्या रुटीन मधून ब्रेक हवा होता. "आपण कुठेतरी फिरायला जाऊया मस्त!", अभिजीतला सुचवले. तोही लगेच तयार झाला. वेगवेगळ्या जागांची माहिती काढणे सुरु झाले. कूर्गबद्दल खूप लोकांकडून ऐकलेले असल्याने त्याच्याबद्दल सर्च करायला लागलो. दक्षिण भारतातील हिल-स्टेशन्सवर राहण्यासाठी "होम-स्टे" हा उत्तम पर्याय असतो. त्या ठिकाणचे लोक आपल्या घरीच राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय करतात, उत्तम पाहुणचार करतात. फायदा असा की ह्यामुळे जिथे जाऊ त्या ठिकाणाची राहणी, खान-पान, घरे इत्यादीन्बद्दलही कल्पना येते. आम्ही कूर्गमधील होम-स्टेजना कॉल करू लागलो. दसरा जवळ आला होता. ह्या काळात कूर्गमध्ये जत्र भरते. त्यामुळे तिथे भरपूर गर्दी असते. असंख्य कॉल्स केले. सगळे होम-स्टेज बुक झालेले होते. त्यातच एका मित्राने सांगितले की त्या जत्रेमुळे कूर्ग ही आत्ता जाण्यासाठी योग्य जागा नाही. आमचा कूर्गविषयीचा सगळा अभ्यास वाया गेला. बर... मग आता कुठे जायचे हा प्रश्न होताच. http://www.mustseeindia.com/places-around-bangalore  ही एक अतीशय माहितीपूर्ण साईट मिळाली. अनेक जागांविषयी चर्चा करता करता गाडी वायनाडला पोहोचली. वायनाड- केरळ मधील एक पर्यटनासाठी प्रसिद्ध असा जिल्हा. कसे जावे, कुठे राहावे परत शोध सुरु झाला.
    हल्ली travelogs, tourism-related sites वरचे हॉटेल्सविषयींचे रिव्ह्यूज ह्यांमुळे ट्रिपचे प्लानिंग करणे फार सोप्पे झाले आहे. अनेक ठिकाणी 'Tropical Forrest' ह्या होम-स्टे विषयी चांगले रिव्ह्यूज लिहिलेले दिसले. त्यांना फोन केल्यावर एका बंगल्यात जागा आहे असेही कळले. आम्ही फार विचार न करता बुकिंग करून टाकले. बुकिंग केल्यावर प्रवास कसा करावा ह्याचा विचार सुरु झाला. दोन माणसांसाठी स्वतंत्र गाडी करणे हा पर्याय खर्चिक आणि कंटाळवाणा वाटला. कोणत्यातरी न आठवणार्या कारणाने बसने जायचाही पर्याय रद्द केला. "बाईकने जावे का?", अभिजीतने योग्य वेळ पाहून हळूच पिल्लू सोडले. आम्ही आधी मुन्नारला गेलो होतो तेव्हा तिथल्या कॉफी-इस्टेट्स पाहून तशा रस्त्यांवर गाडी चालवायला मिळाली तर किती मजा येईल असे अभिजीतने म्हणाल्याचेही मला आठवले. माझ्या तोंडातून पटकन हो निघाले.
     त्यावेळी काही जाणवले नाही. पण आम्हाला ३०० की.मी.चे अंतर कापायचे होते. मी कधी बाईक वरून इतक्या लांब गेलेली नव्हते. शिवाय आम्ही दोघाच जाणार होतो. तेव्हा काही झाले तर सोबत कोणीच असणार नव्हते. मला जरा भीती वाटायला लागली. बस मिळू शकेल का त्याची चौकशीही केली. पण लाँग वीकेंड सुरु व्हायला एकाच दिवस उरला असल्याने बुकिंग फूल झाले होते. पर्यायाच नाही म्हणल्यावर भगवान-भरोसे बाईक-ट्रीप करूनच पाहू असे ठरवले.
     सकाळी ५ ला घरून निघालो. तासा-दीड तासाचे ब्रेक घेत घेत अंतर कापू लागलो. दर वेळी ब्रेअक घेतला की पुढच्या स्ट्रेचमध्ये किती वेळात कुठे पोहोचायला हवे ते ठरवायचो. जस-जसे पुढे जाउ लागलो तस-तसा माझाही कॉन्फिडन्स वाढून भीती नाहीशी झाली. मजा यायला लागली. वार्याच्या आवाजात आवाज मिळवून अनेक गाणी म्हणाली.
यूं ही चला चाल राही, यूं ही चला चाल राही..कितनी हसीन ही ये दुनिया...
भूल सारे झमेले देख फुलों के मेलें, बाडी रंगीन ही ये दुनिया...
   वातावरण अगदी हे गाणे आठवावे असे होते. निमा-पाऊण प्रवास एकदमच मस्त झाला. रस्ता एकदमच मस्त होता. वरुणराजाची कृपा म्हणून पाऊसही पडत नव्हता. पण मध्येच एका स्ट्रेचमध्ये रस्ता अस्तीशय वाईट होता."रस्त्यात खड्डा, की खड्ड्यात रस्ता" अशी परिस्थिती होती. कंबरडे पार मोडले. बराच वेळ प्रवास झाल्याने दुखणे जास्तच तीव्र वाटत होते. आधी आम्ही १-१ गाव मागे टाकण्यासाठी झुंजत होतो न आता १-१ १-१ की.मी पार पाडण्यासाठी झुन्जतोय असे वाटू लागले. एवढा केलेला प्रवास पाहता डेस्टीनेशन तसे जवळ आले होते, पण आता आम्हाला जास्त विचारात विचारात जायला लागत असल्याने जास्त वेळ लागत होता. तेवढ्यात पावसाने हजेरी लावली. वाटेत थांबून रेन-कोट घालण्याचा कार्यक्रम आटपायला लागला. दमलेले आम्ही, पाऊस अशा परिस्थितीत आमची गाडी कशी-बशी पुढे सरकू लागली. "Tropical ForRest" हे ठिकाण पहायला आपले प्राण तरी शिल्लक राहणार आहेत का?" असले बालिश विचार मनात यायला लागले. एवढ्यात "Tropical ForRest" च्या पाट्या दिसू लागल्या. आमच्या जिवात जीव आला. चहाचे मळे लागले. जिवाला आणखी छान वाटले आणि असे छान वाटत असतानाच "Tropical ForRest" सापडले. तिथला व्यवस्थापक साजी ह्याला फोन केला. होम-स्टे छोटीशी टेकडी चढून गेल्यावर होता. पाऊस पडत होता. तरी साजी आम्हाला घ्यायला आला. साजीने आमचे छानसे स्वागत केले. टपरीवर चहा पाजला. पाऊस थांबताच आम्ही वरती गेलो.
वायनाडला पावसाळ्यात थोडा लवकर अंधार पडतो, धुकेही पडते. त्यामुळे सर्व हालचाल बंद होते. चार वाजले होते. त्यामुळे कुठेही न जाता तिथेच थोडे इकडे तिकडे फिरून मग आराम करायचा निर्णय घेतला.
    घराच्या आजूबाजूला चालायला सुरवात केली. थोडासा चढ चढून गेलो न वरून मस्त दृश्य दिसत होते. हलकेसे धुके, वळणं-वळणांचा रस्ता, त्यापलीकडे दरी! परत येताना आजूबाजूच्या झाडांकडे लक्ष गेले. रानफुले उत्साहाने डुलत होती. जिकडे तिकडे भरपूर लाजाळूची झाडे उगवलेली होती. एका लाजाळूच्या पानांना हात लावून लावून त्याला इतके लाजवले की बिचार्याने स्वतःला जमिनीवर झोकुनच दिले. फोटो-बिटो काढले.


आता मात्र थकवा जाणवू लागला. मस्त कट्ट्यावर बसलो. पत्ते खेळलो. अंधार झाला तशी आत गेलो. साजीने मस्त गरमा-गरम जेवण आणले. त्यात काही पदार्थ आपले नेहमीचे अन काही केरळी पद्धतीचे होते. केरळी पदार्थांमध्ये नारळ बर्याच प्रमाणात वापरतात असे कुठेतरी वाचलेले प्रत्ययास आले. हवा थंड होती. दिवसभराचा थकवा, पाऊस, थंडी, गरम चहा, पत्ते, गरम जेवण..मस्त झोपेसाठी अजून चांगले औषध ते काय असणार? पांघरुणात डोके खुपसून मस्त झोपून गेलो.
     येऊन-जाऊन ६०० की,मी, असा बाईकचा प्रवास खूप होणार होता. त्यामुळे त्यादिवशीच्या साईट-सीइंगसाठी जीप केली. सकाळी लवकर निघालो. आम्ही केरळला दोनदा गेलोय. दोन्हीवेळा आम्हाला हॉटेल आणि ड्रायव्हरचा अनुभव छान आलेला आहे. समोरच्या माणसाची ट्रीप जमेल तेवढी सोयीची, आनंददायक करावी हा त्यांचा हेतू त्यांच्या वागण्या-बोलण्यातून सतत प्रत्ययास आला. साजीने सकाळी मस्त ब्रेकफास्ट आणून दिला. ब्रेकफास्टमध्ये चहा-कॉफी, पुट्टू, सांबार न केळी होती. पुट्टू हा केरळातील ब्रेकफास्ट स्पेशल आयटम आहे. तिखट आवडत असेल तर साम्बारासोबत खावा. गोड आवडत असेल तर केळी आणि साखर घालून खावा. ब्रेकफास्टने ट्रीपच्या मजेत भर घातली.  
     पहिली भेट दिली Banasura Sagar Dam ला. नाव मराठीत लिहिणे अशक्य आहे कारण त्यांचे खरे उच्चार काही आम्हाला कळले नाहीत. हा भारतातील सर्वात मोठा आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा earthen dam आहे असे कळले. बाहेर गाड्यांवर तिखट-मीठ लावलेला अननस, कैरीच्या फोडी, आवळे अशा गोष्टी दिसल्या. त्यांचा आस्वाद घेत घेत धरणाच्या दिशेने चालू लागलो. तिथे पोहोचल्यावर जे दृश्य दिसले ते अजूनही माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट येते. हिरवी जमीन, निळे पाणी, पलीकडे डोंगर..पाण्यामध्ये patch-work करावे तसे क्चोते-छोटे हिरवेगार जमिनीचे तुकडे..छोटी बेटेच जणू. ह्या बेटांची शोभा वाढवली होती ती त्यांवर हिंडणार्या बगळ्यांनी. पाण्यात बदके पोहत होती. आहाहा. शेजारीच एक छोटीशी हट होती. तिथे काही काळ नुसते हे दृश्य पाहत बसलो. पलीकडे छोटीशी बाग होती. उंच झोके झाडाला बांधले होते. काही काळ झोका घेतला. न निसर्गाची शोभा पाहत पाहत तिथून Kuruva Dweep पाहण्यासाठी निघालो.



केरळ टूरिझमच्या चिन्हाखाली "Gods own country" असे वाक्य लिहिलेले आहे. केरळच्या रस्त्यांवरून जायला लागले की ह्या वाक्यात किती तथ्य आहे ते प्रत्ययास येते. चांगले रस्ते. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला चहा-कॉफीच्या किंवा नारळांच्या बागा. सीझनमध्ये गेल्यास मस्त हवा...कोणत्याही ठिकाणाला भेट न देता नुसती भटकंती केली तरी डोळ्यांना सुख आणि जीवाला समाधान मिळते. बराचसा रस्ता असाच गेला. "कुरुवा द्वीप" कडे जाणारा रस्ता मात्र भयंकर होता. भूकंप होतोय की काय असे वाटावे तशी गाडी हलत होती. १०-१५ मिनिटांचा असा भयंकर प्रवास झाल्यावर कुरुवा द्वीपला पोहोचलो. ही जागा एकदम रहस्यमय किंवा भूत-खेतांच्या सिनेमात शोभून दिसावी अशी होती. हे एक छोटेसे बेत आहे. ह्या बेटाच्या चारीही बाजूंना चॉकलेटी रंगाचे पाणी आहे! बेटावर चित्र-विचित्र आकारांची  झाडे आहेत. उंच बांबूंची झुडुपे आहेत. बाम्बूतून वाहणार्या वार्याचा गंभीर आवाज येत असतो. हिरवा रंग असा नजरेसाच येत नाही. पाणी चॉकलेटी, जमीन चॉकलेटी,  गूढ दिसणारी झाडे! बेटाच्या एका बाजूने चालत निघायचे न बेटाच्या काठाने संपूर्ण प्रदक्षिणा पूर्ण करायची. एका वेगळ्याच वातावरणाचा अनुभव आला.

      तिथून आम्ही निघालो Poolot Lake ला. आता मला ह्याचाही उच्चार माहित नाही. ही जागाही छान होती. तलाव,  त्याच्या बाजूने चक्कर मारायला वाट केलेली होती. बाजूला झाडे. आम्ही संध्याकाळी ५ च्या सुमारास तिकडे पोचलो. अंधार पडत आला होता. किंचितसा पाऊसही होता. त्यामुळे इथेही एक गूढ-गंभीर असे वातावरण अनुभवास आले.

     दिवसभर मस्त फिरणे झाले. तसे वायनाड पूर्ण फिरायला २-३ दिवस लागतात. ठिकाणे लांब लांब आहेत. पण एक दिवसात ह्या तीन ठिकाणी जाता आले आणि फार मजा आली.
घरी परतलो. थोडा आराम, खेळ, गरमा-गरम जेवण आणि मग मस्त झोप असा दिवस म्हणता म्हणता संपला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघालो. आता रस्त्याची पूर्ण कल्पना होती. त्यामुळे कुठे कुठे विश्रांतीला थांबायचे ते आधीच ठरवले. त्यामुळे प्रवास सुखकर झाला.
येता येता चिन्नपट्टणंला मुद्दाम ब्रेक घेतला. बेंगलोरजवळील हे गाव रंगीत लाकडी खेळणी आणि वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. एका दुकानाला भेट दिली. रंगीत खेळण्यांच्या दुनियेत अक्षरशः हरवून गेल्यासारखे वाटले. थोडी खरेदी करून निघालो. बंगलोर गाठले.
     केरळचा हिरवागार निसर्ग, जेवण, पाहुणचार आणि बाईक..कॉम्बीनेशन मस्त होते. ट्रीप अविस्मरणीय होती. सहा महिन्यांनी मी तिच्यावर पोस्ट लिहू शकत आहे त्यातच सगळे आले.