Showing posts with label pune. Show all posts
Showing posts with label pune. Show all posts

Tuesday, December 13, 2011

उन्हाळा

    पुण्याचा रखरखीत आणि मुंबईचा दमट उन्हाळा सोसल्यावर उन्हाळ्याविषयी मी फार प्रेमाने लिहीन असे काही मला बंगलोरला येण्याआधी वाटले नव्हते. माणसाला कोणत्या गोष्टीची किंमत कधी समजेल काही सांगता येत नाही. गेल्या वर्षी कांद्याचे भाव ६०-७० झाल्यावर आणि अजिबात कांदा न घातलेले जेवण जेवल्यावर जशी कांद्याची किंमत कळली तसे बंगलोरमध्ये आल्यावर मला उन्हाळ्याची किंमत कळली.
उन्हाळा म्हणले की माझ्या डोक्यात आंबा, सरबते, कलिंगडे, द्राक्षे, करवंदे, जांभळे, कैऱ्या, वाळवणे (कुरडया, पापड, लोणची), माठातले पाणी, वाळा, पांढरा कांदा, पिवळ्या फुलांनी लगडलेली टबूबियाची झाडे, थोडे दिवस परीक्षा; मग उन्हाळ्याची सुट्टी आणि दिवसभर मजा (फक्त शाळेत असेपर्यंत) असे वेगवेगळे शब्द येतात. उन्हाळ्याची सुट्टी तर माझ्यासारख्या घोडीला आता कोणी देणार नाही पण बंगलोरमध्ये उरलेल्यापैकीही एकही गोष्टीची मजा उन्हाळ्यात अनुभवता आली नाही.
     उन्हाळा सुरु होऊन बरेच दिवस होत आल्यावर दशेहरी, नीलम, रसपुरी, बदामी अशा नावांचे आंबे बंगलोरमध्ये दिसू लागले. ह्यातला बदामी सोडून कुठलाच आंबा आधी चाखलेला नसल्याने आंब्याकडे बोट दाखवून हा ०.५/१ किलो द्या (हे आंबे किलोवर मिळतात) असे सांगून आंबे घेतले आणि खाल्ले. पण हापूसची सर एकालाही नाही. त्यामुळे पुण्यात असतानासारखी सकाळ-संध्याकाळच्या जेवण्यातली आंब्याच्या रसाची मजा काही इकडे घेता आली नाही. "काळी मैना डोंगरची मैना", "काळे काळे जांभूळ, लय गोड जांभूळ" अशी हाक कानावर आल्याक्षणी पळत पळत जाऊन करवंदे, जांभूळ घरी आणून मिटक्या मारत खाण्यातली गम्मतही इथे घेता आली नाही. कलिंगडांची खरी मजा येते ती उकाड्यात! सरबतांचेही तेच! भयंकर उकडतेय, डोक्यावर पंखा गरागरा फिरतोय, घामाच्या धारा वाहतायत आणि अशात कोणी कलिंगडाच्या फोडी खायला दिल्या, सरबत दिले काय समाधान मिळते! पन्ह्याची, ताज्या-ताज्या उसाच्या रसाची, कोकमाच्या,  लिंबाच्या,  रसनाच्या सरबतांची खरी मजा कडक उन्हाळ्यातच येते. होलसेल मार्केटातून १०० पेप्सिकोल्यांचे पाकीट आणून येता-जाता पेप्सीकोले खाणे हे उन्हाळ्यातच आनंद देऊ शकते. चैत्राच्या हळदी-कुन्कवानिम्मित बनणारे डाळ-पन्हेही उन्हाळ्यातच खायला छान वाटते. बंगलोरला उन्हाळ्यातही उकडतंय अशी परिस्थिती क्वचितच निर्माण होते. वर्षातले १० महिने तर इथे पाऊसच असतो. थंडी-उन्ह-पावसाचा खेळ तर दिवसभर चालू असतो. एकंदरीत बंगलोरचे हवामान चांगले आहे. पण ४ महिने उन्हाळ्याने त्रासलेल्या जिवाला पहिल्या पावसाने मिळणारा आनंद इथे नाही की सततच्या पावसाने  कंटाळलेल्या लोकांना दिवाळीच्या सुमारास अलगद येणाऱ्या थंडीने मिळणारा गारवा नाही. स्वेटर, छत्र्या ह्या वस्तू इथे कधी माळ्यावर जातच नाहीत!
   लहानपणी गच्चीत आईने धान्ये, वाळवणे घातली की त्यांची पक्ष्यांपासून राखण करण्याचे काम माझ्याकडे असायचे. वाळवणे घातली की गच्चीच्या समोरच्या पोर्चमध्ये एखादी सतरंजी पांघरून, सोबत द्राक्षे-दाणे-खाऊचा खुराक घेऊन फास्टर फेणे, टारझन, शरलॉक होम्स वगरे दिवसभर वाचत  बसायची मजा वेगळीच होती. इथे उन्हाळा असा विशेष वेगळा नसल्याने वाळवणे घालण्याचा प्लान करणेच अवघड! भर उन्हात मंडईत जाऊन लिंबे, माठ, पांढरे कांदे, वाळे, रसाची गुऱ्हाळे, शिकेकाई, मसाले ह्यांनी भरलेला बाजार नुसता पाहण्यातली एक मजा होती हे इथे उन्हाळा घालवल्यानंतर कळले.
     गेल्या मार्चमध्ये उकाडा जाणवला तशी मी मोठ्या हौसेने माठ घेऊन आले. पुण्याला गेले असताना माठात घालायला वाळा घेऊन आले. थोडे दिवस माठातले पाणी प्यायले, पण कसले काय! थोड्याच दिवसात पावसाने उन्हाळ्याला पळवून लावले, विशेष उकडेनासे  झाले आणि माठातले पाणी प्यायचे थांबवून नॉर्मल पाणी प्यायला सुरवात करावी लागली.
   थोडक्यात बंगलोरच्या लाईफमध्येही भरपूर (महागड्या?) मजा मिळतात. पण आपल्या देशीच्या ह्या बारीक सारीक माजांची सर त्यांना नाही. पुढच्यावेळी ही सगळी मजा घेण्यासाठी आवर्जून उन्हाळ्यातच पुण्याला जायचे मी ठरवले आहे.

Tuesday, March 23, 2010

आमचे पुणे!



IPL मध्ये पुढच्या वर्षी पुण्याची टीम भाग दिसणार अशी बातमी आली न काल्पनिक पुणेरी पाटयांसाठी लोकांना एक विषय मिळाला. असेच एक फॉरवर्ड मिळाले, जर्सीचे! कमाल वाटली नएखाद्या पोस्टद्वारे पुणेरी दुकानदार तसेच व्यावसायिक (चितळ्यांना दुकानदार म्हणून कसा चालेल बुवा) ह्यांना आदरांजली वाहण्याची इच्छा मनात आली.
गिर्हाईकांशी कसे वागू नये ह्याविषयीचे फुकटात ट्रेनिंग हवे असल्यास "चितळे बंधू मिठाईवाले" ह्यांच्याकडे जाच. फ़क्त काय निरीक्षण करायचे ते लवकर करून बाहेर पडाल ह्याची काळजी घ्या नाहीतर ट्रेनिंगच्या काही भागात तुमच्यावरच प्रयोग होण्याची शक्यता जास्त आहे. जर तुम्ही चितळ्यांच्या बाकरावड़ीचे fan असाल तर तुमच्याकडे शिस्त आणि पेशंस असणे आवश्यक आहे. चितळ्यांकडे बाकरवडीसाठी रांग असते. तुम्ही रांगेच्या १ इंच जरी बाहेर दिसलात तरी चितळ्यांचा शिपाई तुम्हाला हटकतो .. जर तुम्ही त्याच्याशी हुज्जत घालायचा प्रयत्न केलात तर चितळ्यांचा सेवक येऊन तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी शिस्तापालन कसे गरजेचे आहे ह्या विषयावर १ लेक्चर देतो. ह्या सगळ्या भानगडीत चितळ्यांचा त्या दिवशीचा बाकरवड्यांचा स्टॉक संपतो न रिकाम्या पिशवीने तुम्हाला घरी जायला लागू शकते...चिताल्यांनी एक शाळा काढली तर ही मानसे मुलांना शिस्त लावण्याच्या कामी उपयोगी पडतील...चिताल्यांची शाळा!
दुसरा नंबर येतो महेंदळे वाद्यवाल्यांचा! तंबोरा, पेटीसारखे जड़ वाद्य रिक्षातून उतारवल्यावर मेहेंदल्यांचा गडी तुमची मदत करायला येईल असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मूर्ख आहात. वाद्य घेऊन कसेबसे आत गेल्यावर तातडीने कोणीतरी येऊन त्याबद्दल चौकशी करेल असे तुम्हाला वाटले तर तो अजूनच मुर्खपणा असेल. तुम्ही आत जाल, बर्याच वेळ ताटकळत उभे रहाल, कधीतरी दुकानातल्या माणसांना तुमची दया येईल, माग ती येतील, तुमच्या वाद्याकडे चित्र-विचित्र कटाक्ष टाकतील...काय ही ब्याद आलीये अशा पद्धतीने वाद्याला उचलून जमिनीवर आपटतील.."काय झालय?" म्हणून चौकशी करतील न प्रॉब्लम कुठलाही असे ना एक आठवड्याने चौकशी करा असे ठराविक उत्तर देऊन तुमची बोळवण केली जाइल.
जोशी वडेवाल्यांकडे गेल्यावर तुम्ही फुकट वडे मागत आहात की काय अशी तुमची तुम्हालाच शंका येऊ शकते. काही दुकानांत बराच वेळ वाट पाहिल्यावर आपण इथे नक्की कशासाठी आलो होतो हे तुम्ही विसरून जायचीही शक्यता असते. याशिवाय जनसेवा दुग्धालय, जुने डेअरीवाले, बेकरीवाले, रिक्शावाले, कंडक्टर, टेलर, सोनार हे तुम्ही पुण्यातच आहात हे विसरु नये ह्याची वे ळोवेळी दक्षता घेताच असतात!
गेल्या आठवड्यात दादा-वाहिनीसोबत नवरत्न भेळ इथे भेळ खायला गेले. नेहमीच्या सवयीप्रमाणे १ मीडियम, २ गोड अशी आर्डर दिली प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी (action-reaction) तसा दुकानदार खेकसला "आमच्याकडे एकाच प्रकारची भेळ मिलते. आत तिखट-गोड पाणी ठेवलेले आहे. हवी अशी करून ह्या..". "बापरे, केवढा हा अपराध असे वाटून आम्ही आत जाऊन बसलो." (तिथली भेळ खरच चांगली असते म्हणून नाहीतर पुणेरी स्वभावानुसार दुकानादाराच्या तोंडावर शिव्या घालत तिकडून निघालो असतो..असो). तर १ च प्रकारची भेळ जिच्यात लोकांनी स्वतः पाणी घालून चवीनुसार तिखट बनवावी अशी पद्धत असेल तर दिलेली भेळ कमी तिखट नको का? भेळ खायला लागल्यापासून २ मिनिटात दादा- वहिनीचा चेहरा तिखटामुळे लाल झाला! ह्याच दुकानात अजुन एक मजेदार पाटी दिसली! "नवरंग भेळ होटल च्या गिर्हाईकांनी वाहने अमुक-अमुक ठिकाणी लावावीत!" होटल नवरंग बर का..जागा ८*८ पण नसेल. बाकड़ी गुर्हाळात असतात असली लाकडी...संपला विषय!
मजेचा भाग बाजुला ठेऊ..ही सगळी परिस्थिती पाहता मराठी माणसाच्या हातून सगळे व्यवसाय जात चाललेत, जिथे पाहू तिथे बिहारी, मारवाड़ी, गुजराती, भैये लोक दिसतात अश्या बोम्बा मारण्यात काही तथ्य आहे का? उद्या चितले, मेहेंदले, नवरत्न भेळवाले ह्यांच्या क्वालिटीचे प्रोडक्टस बनवून एखादा मारवाड़ी विकू लागला न स्वभावधर्मानुसार गिर्हाइकानशी गोडीने वागू लागला तर आपण तरी त्यांच्याकडे जाऊ का?
पुण्याच्या मराठी माणसांनी खरेच "जागे" व्हायची गरज आहे. पुण्याची मुंबई व्हायला फारसा वेळ उरलेला नाही...