Showing posts with label travel. Show all posts
Showing posts with label travel. Show all posts

Wednesday, June 6, 2012

सह्याद्रीच्या कुशीत वसलेला शिमोगा

     मेमध्ये लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कुठेतरी फिरायला जावे असे आमचे ठरले. "कुठे जावे?", विचार सुरु झाला. शिमोग्याबद्दल बरेच ऐकले होते. "शिमोग्यालाच जाऊया मग!", आम्ही ठरवून टाकले. शिमोगा हा जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्यात जोग फॉल्स, अगुंबे वगरे बरीच पर्यटन स्थळे आहेत. आमच्याकडे दोनच दिवस होते. आधीच्या होम स्टेजच्या सुखद अनुभवामुळे राहण्यासाठी होम स्टेच पहायचा हे नक्की ठरलेले होते. शिवाय फार धावपळ न करता निवांत वेळ घालवावा अशी आम्हा दोघांचीही इच्छा होती. त्यामुळे आधी जागा निवडून मग होम स्टे शोधण्याऐवजी आधी चांगलासा होम स्टे शोधून मग जागा फायनलाइझ  करूया असे ठरले.
नेहमी प्रमाणे ब्लॉग्सच्या मदतीने शिमोग्याचा अभ्यास सुरु झाला. दर, एकंदरीत सोयी, रिव्यूव्ज ह्यांची चाळणी लावून अनेक होम स्टेजपैकी ३-४ होम स्टेजना शॉर्टलिस्ट केले. त्यांच्या मालकांशी झालेल्या टेलिफोनिक इंटरव्यूतून  'कोळवारा हेरीटेज होम स्टे' ची निवड केली गेली. बुकिंग झाले. बंगलोर-कुप्पळ्ळी ह्या रात्री १०.३० ला निघणाऱ्या बसचे बुकिंगसुद्धा झाले.
    पाहता पाहता जायचा दिवस उजाडला. ऑफिसची कामे आटोपून धावत पळत घरी आलो. औक्षणाचा कार्यक्रम पार पडला. जेऊन मॅजेस्टिक गाठले. आमची बस स्लीपर होती. के. एस. आर. सी. टी. च्या इतर बसेसप्रमाणेच ही बसही कम्फर्टेबल होती. छान झोप लागली. सकाळी ६ ला कुप्पळ्ळीच्या अलीकडे असणाऱ्या गडिकलला आम्ही पोहोचलो. तिथून होम स्टेला आम्हाला न्यायला होम स्टेचा मालक निश्चल आला होता. गडिकल  ते कोळवारामध्ये साधारण ७-८ कि. मी. चे अंतर आहे. रस्ता मस्त होता. छोटासा रस्ता, दोन्ही बाजूला नारळ-सुपारीच्या बागा, साहजिकच कोकणाची आठवण झाली.
     'कोळवारा हेरीटेज होम स्टे'  ही जागा अप्रतिम होती. मुळात १०४ वर्षे जुने असलेले हे घर त्या लोकांनी छान जतन केलेले आहे. कौलारू, लाकडी वासे असलेले घर, मध्ये अंगण, बाजूला पडवी, पडवीला लागून खोल्या...पण कुठेही भिंतीला एक पोपडा गेलेला नाही. भिंती पांढऱ्या रंगाने व्यवस्थित रंगवलेल्या, वाश्यांना साजेसे पॉलिश लावलेले! विजेच्या वायर्सही भिंतीवरून  न घेता वाश्यांवरून घेऊन त्यांना वाश्यांच्याच रंगाचे पॉलिश लावलेले असल्याने घराच्या सौंदर्यात कुठेही बाधा येत नव्हती. घरात फर्निचरही जुन्या पद्धतीचे पण चांगले दणकट होते.
कोळवारा हेरीटेज होम स्टे
 
घराच्या बाजूने कोकणासारखी नारळ-सुपार्यांची बाग. शिवाय घराभोवती असंख्य कुंड्यांतून रंगीबेरंगी फुलझाडे, शोभेची झाडे, बोन्साय कलात्मकतेने मांडलेली.  बागेत छोटी तळी, करंजी, दगडी टेबले आणि त्यांना लावलेल्या गवताने शाकारलेल्या छत्र्या..एका बाजूला जेवणासाठीचा ओपन हॉल. त्यात अनेक टेबले, टी. व्ही., वर्तमानपत्रे, कॅरम, डार्ट गेम,  लहान मुलांची खेळणी इत्यादीची सोय होती. तिथे टेबल टेनिसचीही सोय होती.
वडाचे  बोन्साय

जेवणाची जागा

 बागेत मागच्या बाजूला छोटासा नैसर्गिक तलाव आहे. पुढे जाऊन छोटा धबधबा आहे. पावसाळ्यात तलावात कोरॅकल (एका प्रकारची बोट) राईडची सोय केली जाते. बागेतच कॅम्प फायर ची सोय आहे. कोणाला रात्री तंबूत झोपायचे असेल तर तंबूही बांधून ठेवलेला आहे. अशाप्रकारे जुन्या-नव्याचा सुरेख संगम असलेला हा होम स्टे आम्हाला पाहता क्षणीच फार आवडला.
     आम्हाला मिळालेली खोलीही छान होती. छोटीशी, लाकडी दारे-खिडक्यांची, पुण्याच्या आजीच्या घराची आठवण आली. फ्रेश झाल्यावर गरमा गरम कॉफीवर तुटून पडलो. मग जवळच्याच एका छोट्याश्या टेकडीवर फिरून आलो. त्यानंतर गरमा गरम भरपेट नाश्ता झाला. मग नदीकाठी फिरून आलो. उन्हाळ्यामुळे ह्या नदीला पाणी कमी होते. त्यामुळे चक्क पायी नदीपार जाता येत होते, त्यामुळे पाण्यात न भिजता मस्त मजा घेता आली. होम स्टेवर परत येऊन थोडा वेळ कॅरम  आणि थोडा वेळ टेबल टेनिस खेळलो. आता मात्र पोटात कावळे ओरडायला लागले. परत जाऊन चविष्ट अन्नावर ताव मारला आणि तासभर मस्त झोप काढली.
     उठल्यावर कॉफी घेऊन होम स्टेच्या आजोबांसोबत बागेत एक चक्कर मारून आलो. वाटेत आमच्या जमीन किती आहे, कोणती झाडे आहेत,  बागेत किती लोक काम करतात अशा अनेक गप्पा झाल्या. आजोबांनीही घरची माणसे असल्यासारखी मोठ्या उत्साहाने सगळी माहिती दिली. चक्कर मारून अंगणात परत आलो आणि बागेतल्या टेबलावर बसून आजोबा आणि आम्ही अनेक विषयांवर गप्पा मारल्या. मला थोडे फार कन्नड काळात असल्याचे ऐकून आजोबांना बरे वाटले. रात्री जेवण करून गाढ झोपून गेलो.

    सकाळी उठून आवरून झाल्यावर परत खादाडीची वेळ आली. कर्नाटकाच्या ह्या भागास मालनाड असे म्हणतात. त्यामुळे होम स्टेमध्ये मालनाड पद्धतीचे जेवण होते. अतिशय स्वादिष्ट आणि भरपेट असे जेऊन आम्ही अगदी तृप्त झालो. एक दिवसात डोसे, आप्पे, शाविगे (ओल्या शेवया) -नारळाचे गोड दूध, कडबू (भाताच्या गोळ्यासारखा पदार्थ), अक्की रोटी (तांदळाची भाकरी), रसम-हातसडीचा भात, मालनाड  पद्धतीची भाजी, ब्रेडचा अतिशय स्वादिष्ट असा हलवा, गुलाब जॅम, फ्रुट सलाड असे अनेक पदार्थ वात्सल्याने (निश्चलची बायको) आम्हाला प्रेमाने खाऊ घातले.
     आम्ही निघालो तेव्हा आजोबांचे डोळे भरून आले. मला पाहून त्यांच्या मुलीची त्यांना आठवण झाली असे ते म्हणाले. त्यामुळे एखाद्या मुलीची सासरी पाठवण करताना केले जाणारे सोपस्कार पार पाडून, आठवण म्हणून एक उदबत्तीचे घर देऊन त्यांनी आम्हाला निरोप दिला. आम्हालाही अतिशय जवळच्या माणसांपासून दूर जात असल्यासारखे वाटले.
     उरलेला दिवस आम्ही साईट सीइंगसाठी ठेवला होता. सगळ्यात आधी आम्ही कुवेंपू नावाच्या प्रसिद्ध कन्नड कवीच्या २५० वर्षे जुन्या घरास भेट दिली. तिथे त्यांनी वापरलेल्या वस्तूही ठेवलेल्या होत्या. नंतर कविशैल ह्या कुवेम्पुच्या स्मारकास भेट दिली. मग एका पारंपारिक दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या संग्रहालयास भेट दिली. तिथून श्रुन्गेरीच्या देवळात गेलो. नंतर अगुंबे आणि मग कुन्दाद्रीला भेट दिली. ही दोन्ही ठिकाणे सूर्यास्तासाठी प्रसिद्ध आहेत असे ऐकले होते. पण आम्ही दुपारीच्या तिथे पोहोचल्याने फारशी मजा आली नाही. मग आम्ही तीर्थहळ्ळी ह्या तालुक्याच्या ठिकाणी पोहोचलो. दुपारचे चार वाजले होते. आमची बस तिथून रात्री १० ला निघणार होती.
कविशैल
पुरातन वस्तूंचे संग्रहालय


 आधी आम्ही रसम मसाला, मालनाड पद्धतीचे कैरीचे लोणचे इत्यादी लोकल गोष्टींची खरेदी केली. मग टाईम पास म्हणून २-४ दुकानात शिरलो. एका दुकानात नारळाच्या काथ्यांच्या टोप्या, पर्सेस, बॅग्स आणि इतर कितीतरी वस्तू विकायला ठेवलेल्या होत्या. मग एके ठिकाणी बसून मिल्क शेक प्यायले. एवढे सगळे करूनही तासभराच संपला होता. वेळ तर बराच उरला होता. "काय करावे?" असा वोचार चालू असताना वात्सल्याने इथे एक नदी आहे असे सांगितल्याचे आठवले. चालत चालत नदीकाठी गेलो. ह्या नदीत परशुरामाने आपली कुर्हाड धुतली होती अशी काहीतरी कथा ऐकायला मिळाली.
तुंगा नदीवरील सुंदर पूल
      नदीकाठी वेळ मस्त गेला. फोटो काढले, वाळूत नक्षीकाम केले, भेळ खाल्ली. ७.३० वाजता उठून बस स्थानकाकडे चालायला सुरवात केली. जेवण केले. ८.१५ च वाजले होते. मग काही वेळ स्थानकावरच गप्पा मारत बसलो. मग आईस्क्रीम खाल्ले. तरीही अजून अर्धा तास उरला होता. आता मात्र वेळ जाता जाईना. एकेक मिनिट मोजत अर्धा तास घालवल्यावर शेवटी बस आली. दिवसभर फिरून दमलेले आम्ही मस्त झोपून गेलो. आदल्या दिवशी पक्षांची किलबिल ऐकत जागे झालेलो आम्ही बंगलोरच्या गर्दीच्या, गाड्यांच्या कलकलाटाने जागे झालो. घरी येऊन परत रोजचे राहत गाडगे सुरु झाले. पोस्ट लिहिता लिहिता आठवणी ताज्या होतायत, मनात गाणे रेंगाळते आहे:
दिल ढ़ूंढता है फिर वही फुरसत के रात दिन|
बैठे रहे तसव्वुर-ए-जाना किये हुए|
दिल ढ़ूंढता है ...
(फोटोग्राफी: मी आणि अभिजीत)

Saturday, December 31, 2011

नागरहोळे-कुट्टा-वायनाड ट्रीप


    सध्या कामाची, घरातली  अशी थोडी धावपळ चालू असल्याने डिसेंबर एंडला कितपत सुट्ट्या घेता येतील ह्याची आम्हाला आधी कल्पना येत नव्हती. पण ऑफिसमiध्ये बऱ्याच जणांनी सुट्टी घेतल्याने तिथेही अचानक वर्कलोड कमी झाले आणि घरातली कामेही अनपेक्षितपणे मार्गी लागली. त्यामुळे दोन दिवस तरी सुट्टी घेता येईल असे एकदम लक्षात आले. कुठेतरी मस्त फिरून यावे असे वाटू लागले. लागलीच 'बंगलोरजवळील २७८ पर्यटन स्थळे' (एक्सेल शीट) उघडून जागांचा अभ्यास सुरु झाला. हातात दोनच दिवस आहेत म्हणल्यावर जागा २००-२५० किलोमीटर्सच्या टप्प्यात असणे गरजेचे होते. लिस्ट स्कॅन करता करता नजर नागरहोळे अभयारण्यावर येऊन थांबली. २-४ ब्लॉगपोस्ट्समध्ये नागरहोळेचे चांगले वर्णन दिसले तेव्हा नागरहोळेला जायचे नक्की केले. ख्रिसमसच्या सुट्ट्या चालू आहेत म्हणाल्यावर अभयारण्यातले जंगल लॉजेस आधीच बुक झालेले असणार हे सरळ दिसत होते. त्यामुळे होम स्टे शोधायला सुरवात केली. नागरहोळेजवळच्या कुट्टा गावी चांगले होम स्टेज आहेत अशी माहिती नेटवर मिळाली. कुट्टातील बऱ्याच होम स्टेजना फोन लावले, पण सगळे आधीच बुक्ड होते.शेवटी १-२ ब्लॉग्समध्ये नमूद केलेल्या विमला इस्टेटला फोन केला. तिथे राहण्याची सोय होऊ शकते हे कळले आणि आम्ही "ट्रीप-ए-नागरहोळे" साठी सज्ज झालो.
    आम्ही सकाळी ६.३० च्या सुमारास घरून निघालो. वाटेत कदंबमला मस्त गरमागरम ब्रेकफास्ट केला. तिथून मैसूर, मैसुरहून हुणसूर असा प्रवास झाला. हुणसुरहून कुट्टाला जायला दोन रस्ते आहेत. एक गोनिकोप्पलहून आणि दुसरा नागरहोळेच्या जंगलातून. आम्ही जंगलातून जाणार्या रस्त्याने जायचे ठरवले. ह्या रस्त्यावरून जाताना फार मजा आली. वाटेत मुक्तपणे भटकणार्या हरणांचे आणि शांतपणे गवत खात बसलेल्या एका हत्तीचे दर्शन झाले. नागरहोळेतून बाहेर पडल्यावर २ की.मी.चे अंतर कापल्यावर लगेच विमला इस्टेट लागले.
विमला इस्टेट ही मुळात कॉफीची बाग आहे. इस्टेटचे मालक श्री.पट्टू हे बागेतच घर बांधून राहतात. इस्टेटच्या आवारातच पर्यटकांना राहण्यासाठी खोल्या बांधलेल्या आहेत. आम्हाला दिलेली खोली एकदम मस्त होती. बेडवर अंथरलेली ब्लॅंकेट्स थंड हवेमुळे एकदम टेम्प्टिंग वाटत होती. गॅस गिझर असल्याने २४ तास गरम पाण्याची सोय होती. खोलीत सामान ठेऊन आम्ही कॉफीची बाग पहायला गेलो. कॉफीच्या बागेत फिरण्याचा अनुभव वेगळाच होता. बागेत कॉफीबरोबरच सुपारी, नारळ, पपनस, मिरे, मिरची, इडलिंबू, रामफळ इत्यादीची झाडे होती. पट्टून्नी  घरासमोर अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांची झाडे लावलेली होती. वेगवेगळ्या रंगांच्या जास्वंदी, बोगनवेल, बाल्सम,  गुलाब आणि नावे माहिती नसलेलीही कित्येक झाडे! अंगणात झोपाळे बांधलेले होते. खेळायला बास्केट बॉल, बॅडमिंटन  इत्यादीचीही सोय केलेली होती. थंड हवेत झोपाळ्यावर बसून कोवळ्या सूर्यकिरणांशी मारलेल्या गप्पा वेगळाच आनंद देऊन गेल्या.
कॉफी
काही वेळातच पट्टून्नी जेवणासाठी बोलावले. जेवणात घी राईस, साधा भात, कोशिंबीर, सांभार, रसम, कच्च्या केळ्याची भाजी, पापड, लोणचे, पायसम असा टिपिकल साऊथ इंडिअन मेनू होता. अंगणातच टेबल लावून  जेवायला वाढलेले होते. कोकणाची आठवण आली. गुलाबी थंडी, कोवळे उन्ह आणि गरमा गरम जेवण, आयुष्यात मजा अशी अजून काय पाहिजे? जेवण झाल्यावर उरलेल्या वेळात कोणत्या स्थळांना भेटी देता येतील त्याची पट्टून्कडे चौकशी केली.
    कुट्टा कर्नाटक आणि केरळच्या बॉर्डरवर आहे. काही की.मी. कुट्टापासून काही अंतरावरच केरळमधील वायनाड लागते. त्यामुळे जवळच 'वायनाड अभयारण्य' आणि तिरुनल्लीचे देऊळ अशा दोन पाहण्यासारख्या जागा आहेत. वायनाड अभयारण्यातर्फे जंगल सफारीची सोय केलेली आहे. सकाळी ६ ते ८ आणि दुपारी ३ ते ५ अशा दोन वेळी सफारीसाठी जीप्स मिळतात. ३ वाजता सफारी करायची आणि मग तिरुनल्ली मंदिर पाहून परत यायचे असा प्लान ठरला. 
    २.४५ ला निघालो, १० मिनिटांत वायनाड अभयारण्याला पोचलो. पाहतो तर तिथे सफरीच्या तिकिटासाठी आधीच मोठी रांग लागलेली. रांगेत अर्धा-पाऊण तास उभे राहिल्यावर नंबर आला तेव्हा "तिकिटे संपली" असे उत्तर मिळाले. आणखी चौकशी केली असता लक्षात आले की दुपारच्या वेळेला फक्त २० जीपच सोडल्या जातात. सकाळच्या वेळी मात्र ४० जीप्स असतात ही माहिती कळली तेव्हा दुसऱ्या दिवशी पहाटे उठून रांगेत उभे राहायचे असे ठरवून आम्ही तिथून देवळाकडे प्रस्थान केले.
    तिरुनल्लीचे देऊळ छान आहे असे पट्टून्नी सांगितले होते. देवळाकडे जाणारा रस्ता अतिशय भयंकर होता. धक्के खात खात कसे बसे देवळाच्या पायथ्याशी पोचलो. पायथ्याहून देवळाकडे जायला काही पायऱ्या आहेत.
वर गेलो तर देवळाचे दार बंद दिसले. ५ वाजता देऊळ दर्शनासाठी उघडले जाईल असे कळले. आता देऊळ बंदचे म्हणल्यावर आम्ही आजूबाजूच्या पाट्या वाचायला सुरवात केली. ह्या देवळाला दक्षिण भारतीय लोकांमध्ये धार्मिक दृष्ट्या फार माह्त्त्व आहे असे पाट्या वाचून कळले. देवळाजवळील तीर्थात स्नान केले असता पापनाशन होते असेही वाचनात आले. त्याच्या पुढे देवळात जाताना पाळण्याच्या नियमांची भली मोठी यादीही लिहिलेली होती. हिंदू नसलेल्या माणसांना प्रवेश निषिद्ध होता. पुरुषांनी देवळात शर्ट घालून गेलेले चालणार नाही इत्यादी नियम त्यात होते. "भलताच स्पेशल देव आहे!", मनात विचार आला. अशा स्पेशल देवाला आपल्यासारख्या ऑलमोस्ट नास्तिक माणसाला दर्शन द्यायलाही नकोसे वाटत असावे ह्या विचाराने आम्ही देवळाच्या आत जाऊन त्याला त्रास न द्यायचे ठरवले.
    देवळाच्या दोन बाजूंना पायऱ्या होत्या. एक बाजूने खाली गेलो, थोडे चाललो तरी ती वाट कुठे जात आहे ते न कळल्याने परत आलो. दुसर्या बाजूने गेल्यावर एक हॉटेल दिसले, त्यात देवाच्या भक्तांसाठी स्पेशल प्रसादाची सोय केलेली दिसली. चाफ्याच्या फुलांच्या मंद, मधुर दरवळाने आणि देवळाच्या छपरावर बहरलेल्या, केशरी फुलांनी लगडलेल्या वेलाने मात्र आम्ही रिकाम्या मनाने परत जाणार नाही ह्याची काळजी घेतली. पायऱ्या उतरेस्तोवर अंधार झाला होता. गाडीने होम स्टेला परत आलो.
    पट्टून्नी दिलेल्या गरमागरम कॉफीने संध्याकाळची मस्त सुरवात करून दिली.थंडी जरा जास्तच असल्याने मेंढी कोटाचे डाव खेळून एकावर एक कोट चढवले. साधारण ८ च्या सुमारास पुन्हा खोलीबाहेर पडलो. पाहतो तर सगळीकडे गुडुप्प अंधार होता. खोलीबाहेरचा दिवा तेवढा पाऊलवाट दाखवायचे काम करत होता. आमची खोली ते पट्टून्चे घर अशा फेऱ्या मारायला सुरवात केली. फेऱ्या मारता मारता सहज नजर आकाशाकडे गेली. आकाश इतके सुंदर दिसत होते. शहरातल्या दिव्यांच्या उजेडामुळे , प्रदूषणामुळे आणि भरीत भर म्हणून बंगलोरच्या ढगाळ वातावरणामुळे स्वच्छ , काळेभोर आकाश आणि त्यावरची ताऱ्यांची नक्षी न्याहाळण्याची संधी मिळतच नाही. निसर्गाच्या ह्या अजून एका मोहक रुपाकडे समाधान होईस्तोवर पाहून घेतले.
    ८.४५ च्या सुमारास मध्येच पट्टून्नी जेवणासाठी हाक मारली. जेवण छानच होते. ह्यावेळी त्यांनी पोळी-भाजी-भात वगरे उत्तर भारतीय पद्धतीचा स्वयंपाक केला होता. रात्रीच्या थंडीत अंगणात बसून गरम गरम जेवण जेवताना फार मजा आली. जेऊन खोलीत परत आलो. सकाळपासून प्रेमाने बोलावणाऱ्या ब्लॅंकेट्सना आता मात्र मान द्यायलाच हवा असे ठरवून आम्ही स्वतःला त्यांच्या हवाली करून टाकले.
    सकाळी ५ ला जेव्हा मोबाईलचा अलार्म वाजला तेव्हा मोबाईल फेकून द्यावासा वाटला खरेतर...मस्त थंडी होती, ब्लॅंकेटची ऊब सोडून उठायची अजिबात इच्छा होत नव्हती. पण मग एकदम लक्षात आले की आज जर सफारीची तिकिटे मिळायला हवी असतील तर ६च्या आत काउंटर पोहोचावे लागणार होते. पटापट आवरून तिकिटाची खिडकी गाठली. ह्यावेळी मात्र आमचा अपेक्षाभंग झाला नाही. तिकिटे मिळाली.
    जंगलात फिरण्याचा अनुभव अनोखा होता. जीप्स जाऊन जाऊन एक कच्चा रस्ता तयार झालेला होता. काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूने इतकी घनदाट झाडी वाढलेली होती की पलीकडचे काही दिसत नव्हते. काही ठिकाणी मोकळे मैदान होते, त्यावर बारीकशी हिरवळ वाढलेली होती, झाडांमधून डोकावणारी सूर्यकिरणे हिरवळीवर निरनिराळे रंग भरण्याचे काम करत होती. अगदी परीकथेत वर्णन केल्यासारखे दृष्य साक्षात डोळ्यांसमोर चित्रित झालेले होते. जीपच्या दरवाज्यातून दिसणारी प्रत्येक फ्रेम डोळ्यात साठवून ठेवावी अशी होती. सफरीत कोणते प्राणी दिसले असा प्रश्न विचाराल तर मात्र एकही प्राणी दिसला नाही असा कबुली जवाब द्यावा लागेल. आमचा अगदीच हिरमोड होऊ नये म्हणून असावे बहुधा, काही हरणे, एक साप आणि एक मोर आम्हाला दर्शन देते झाले.
जंगलातील मोहक दृष्य
 सफारी आटोपून खोलीत परत आलो. अंघोळी आटपेस्तोवर पट्टून्नी गरमा गरम कॉफी आणली. कॉफी झाली, सामान आवरले, इतक्यात पट्टून्नी गरमा गरम नाश्ता आणला. नाश्त्यात पुट्टू-चण्याची उसळ, पोहे, केसरी बात (आपल्या भाषेत गोडाचा शिरा) आणि सोबत कॉफी असा मेनू होता.खाता खाता पट्टून्शी त्यांच्या बागेविषयी, कॉफीच्या व्यवसायाविषयी गप्पा झाल्या. त्यांनीही आमची विचारपूस केली. चोपून नाश्ता केल्याने पोटोबा खुश आणि पट्टून्च्या पाहुणचाराने दिल खुश! सुखद आठवणींचा आहेर घेऊन आम्ही विमला इस्टेटला अलविदा केले.
    पुढचे ठिकाण होते इर्पू फॉल्स! इर्पू फॉल्सला पोहोचण्यासाठी गाडी पार्क केल्यानंतर सुमारे अर्धा की.मी. चालत जावे लागते. मग पर्वतीसारख्या पायऱ्या लागतात. पायथ्यापासून येणारा पाण्याचा आवाज सस्पेन्स निर्माण करतो. खूप पायऱ्या चढून गेल्या की धबधबा दिसतो. वाटेत एके ठिकाणी वेगळी वाट धरून ट्रेक पण करता येतो. वेळेअभावी आम्ही ट्रेक केला नाही.
इर्पू फॉल्स
 धबधब्याला पुरेसे पाणी होते. काठाशी उभे राहून दिसणारे दृश्यही फार रमणीय होते. मुख्य म्हणजे दारू पिऊन नाचणारे उघडे पुरुष तिथे नव्हते. त्यामुळे धबधब्याचे पाणी, आवाज ह्यांचा निखळ आनंद घेता आला. धबधब्याचे पाणी प्रचंड गार होते. पाण्यात पाय घालताक्षणीच पायात कळ येत होती.
    पाण्यात पाय सोडून बसलेले असताना पाण्यावर तरंगणारा किडा दिसला. त्याचे नाव मला आठवत नाहीये, पण बारावीच्या फिजिक्सच्या पुस्तकात त्याचा उल्लेख होता. (विकिपीडियावरील माहितीवरून त्याला स्ट्रायडर  म्हणतात असे कळले). हा किडा धबधब्याच्या जोरदार प्रवाहाच्या उलट दिशेला जायचा प्रयत्न करत होता. खूप कष्टाने हात-पाय मारत तो एखाद-दोन से.मी. पुढे जायचा आणि पाण्याच्या जोराने परत तितकाच मागे यायचा. हा प्रकार मी तिथे बसलेली असेस्तोवर चालू होता. ह्या किड्याला नक्की कुठे जायचे होते कोण जाणे? ह्यापद्धतीने तो कुठेच पोहोचण्याची काहीच चिन्हे दिसत नव्हती. पण तरी त्याची धडपड मात्र चालू होती. आपले आयुष्य ह्या किड्यासारखेच असते नाही का?
    धबधब्याच्या पायथ्याशी एक देऊळ आहे. रम्य, शांत, साधे! आत जाऊन छान वाटले. दर्शन घेऊन परतीच्या वाटेला लागलो. कॉफीच्या बागांमधून जाणारा रस्ता छानच दिसत होता. गाडी कुट्टामधून निघून परत नागरहोळे अभयारण्यात शिरली. सफारीत प्राणी न बघायला मिळाल्याने आलेल्या निराशेची तीव्रता नागरहोळेतल्या प्राण्यांनी थोडीफार कमी केली. जाता जाता आम्हाला गवा दिसला, माकडे दिसली आणि पुन्हा अनेक हरणे दिसली.
   पुढचा थांबा होता मैसूर. मैसूरला जेऊन आम्ही वृंदावन गार्डनचा संध्याकाळचा म्युझिकल फाउंटनचा शो पाहिला गेलो. वृंदावन गार्डनमध्ये  खूप जास्त गर्दी होती. एक वेगळा अनुभव म्हणून शो छान वाटला. शो पाहण्यासाठी आत जायला जेवढी फाईट मारावी लागली तेवढीच बाहेर यायलाही लागली.
    आता मात्र आम्ही पुरते दमलो होतो. गाडीत बसलो आणि जे डोळे मिटले ते डायरेक्ट घर आल्यावरच उघडले.दोन दिवसात कॉफीची बाग, चांदण्यांनी भरलेले आकाश, अभयारण्यातले प्राणी, जंगलातील सफारी, धबधबा,  म्युझिकल फाउंटन अशा वैविध्यपूर्ण गोष्टींची सफर घडवून आणणारी अचानक ठरलेली ही ट्रीप आमच्या कायम लक्षात राहील!
(Photography by Abhijeet)

Monday, September 19, 2011

पॉँडिचेरी-महाबलीपुरम ट्रीप

पॉँडिचेरीला जायचे आमचे तसे अचानकच ठरले. एका मित्राने "पुढे दोन दिवस सुट्टी आहे तर कुठे फिरायला जायचे का?" असे विचारले. "जायला हरकत नाही पण कुठे जायचे? आणि पुढे लॉंग वीकेंड असताना राहण्याची आणि फिरायला गाडीची सोय होईल का?" हे प्रश्न अगदी ओघानेच आले. "पाहू..झाली सोय तर जाऊ... पटापट ठिकाणे सुचव बरे.."- मित्र म्हणाला. दुसऱ्या दिवशीच निघायचे असल्याने ह्यावेळी वेगवेगळ्या जागांचा नेटवरून अभ्यास करून ठिकाण निवडत बसण्याइतका वेळ नव्हता.
"कशाप्रकारच्या ठिकाणी जायचेय? हिल-स्टेशन, समुद्र-किनारा, ..?" 
"मम... समुद्र किनार्यावर जाऊ.."
"मग मंगलोर, कोझिकोड, पॉँडिचेरी, ...?" (जी ठिकाणे तोंडाला आली ती सांगितली.)
"पॉँडिचेरी छान आहे म्हणे."
"ठीक आहे! राहण्याची आणि गाडीची सोय होतीये का पाहूया ते नाहीतर दुसरे काहीतरी शोधूया!"
संवाद रॅपिड फायरसारखे झाडले जात होते. नेटवर हॉटेलची शोधाशोध सुरु झाली. एका हॉटेलमध्ये सोय होतीये म्हणल्यावर ड्रायवरची चौकशी करायला सुरवात केली. आधी ओळखीच्या ड्रायवऱ्सशी कॉन्टॅक्ट होत नव्हता.
 बरेच प्रयत्न केल्यावर एक ड्रायवर सापडला.तोवर पाहून ठेवलेल्या हॉटेलच्या रूम्स संपल्या असे कळले. मग परत दुसरे हॉटेल शोधले. तोवर सापडलेला ड्रायवर एंगेज झाला होता. शेवटी एकदा हॉटेल, एकदा ड्रायवर, एकदा हॉटेल, एकदा ड्रायवर असे हो, नाही, हो, नाही होत संध्याकाळी ७ वाजता दोन्ही गोष्टी फायनलाईझ झाल्या. रात्री १० ला निघायचे ठरले होते. प्रवासाची तयारी, जेवण-खाण वगरे पटापट आवरले आणि गाडीत बसलो. आम्ही एकूण ३ जोडपी होतो. हसत-खेळत गप्पा मारत प्रवास सुरु झाला. पाहता पाहता तमिळनाडूची बॉर्डर आली. तिकडे टोल आणि इतर कामे करायला ड्रायवर गाडीतून उतरला. परत येऊन म्हणे "तिथे कंप्यूटरमध्ये काहीतरी बिघाड आहे, अर्धा तास लागेल दुरुस्त व्हायला,  तोवर मी झोपतो",  अन सरळ झोपून गेला. "असेल बुवा खरच" असा विचार करून महाशय उठेस्तोवर आम्ही जवळच्या टपरीवरुन  गरमा गरम चहा घेतला, थोडा टाईमपास केला. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, महाशय उठायची चिन्हे दिसेनात. अजून ५ मिनिटे वाट पाहून आम्ही उठवले तेव्हा २ मिनिटांत जावून ते कागद-पत्रे घेऊन आले. प्रवास परत सुरु झाला. २-३ तास झाले तशी ड्रायवर साहेब म्हणाले की ते २ दिवस झोपलेले नाहीत तेव्हा गाडी चालवणे त्यांना जमत नाहीये आणि ते अर्धा तास झोप घेऊ इच्छितात. आता आम्ही काय म्हणणार ह्यावर! झोपच येतीये म्हणल्यावर काय करणार. तशा अवस्थेत त्याने गाडी चालवणे आमच्या दृष्टीने धोकादायक होते. "झोप" म्हणालो आणि परत टाईमपास करत बसलो. अर्धा तास झाला- एक तास झाला महाराज उठायची चिन्हे दिसेनात तेव्हा बऱ्याच प्रयत्नांनी आम्ही त्याला उठवले. प्रवास परत सुरु झाला (असे वाटले). रस्त्याची परिस्थिती फार वाईट होती. अगदी डोके जागेवर असणाऱ्या माणसालाही गाडी चालवणे अवघड होते. ड्रायवर महाशय झोपेच्या नशेत! गाडी ५ मिनिटे चालली नसेल तो परत मध्येच थांबवत म्हणाले "नाही नाही...मला जमत नाहीये आत्ता गाडी चालवायला, मी झोपतो..."  आणि झोपले . पुढचे २ तास ड्रायवर झोपलेला आणि आम्ही अधून मधून डुलक्या खातोय, कसे बसे जागे राहण्याचा प्रयत्न करतोय अशा अवस्थेत गेले. हे रामायण घडता घडताच सकाळचे ५ वाजले. ५ वाजता मात्र ड्रायवरला परत उठवले. म्हणाला मला अजूनही झोप येतीये. आता मात्र आम्ही चिडलो. त्याला जाऊन तोंडावर पाणी मारून, चहा पिऊन यायला सांगितले आणि आम्हाला लवकर पॉँडिचेरीला पोहोचवायची धमकी दिली. ड्रायवर फ्रेश होऊन आल्यावर आमचा प्रवास परत सुरु झाला. ८.३०-९ च्या सुमारास आम्ही पॉँडिचेरीला पोहोचलो. हॉटेलवर जाऊन आवरले, नाश्ता केला आणि आता फिरायला जाणार एवढ्यात ड्रायवर साहेब गायब असल्याचे दिसले! फोनच उचलेनात. महत्कष्टांनी त्यांना शोधून काढल्यावर शेवटी आम्ही फिरायला निघालो. 
सगळ्यात आधी आम्ही गेलो Chunnambar Boat House ला. बोट हाउसहून बॅकवॉटरचे मनोरम दृष्य नजरेस पडते. निळे आकाश, हिरवीगार झाडे अन निळेशार पाणी...डोळ्यांना मेजवानीच.
 बोट हाउसला वॉटर स्पोर्टस, खाणे-पिणे, खेळणे ह्यांची सोय आहे. बॅकवॉटरमधून बोटीने पॅराडाईझ बीचला जाता येते. बोटीतून जाताना चारीही दिशांना छान दृश्य दिसते. बोट हाउसहून किनार्यावर पोहोचायला साधारण अर्धा तास लागतो. समुद्र किनारा फारच छान , स्वच्छ आहे. आम्ही बराच वेळ समुद्रात खेळलो. परत नावेत बसून बोट हाउसला आलो.
        संध्याकाळ झाली होती. ऑरोबिंदाश्रमात जाऊन आलो. जवळच समुद्र होता. समुद्र पाहून मला मरीन ड्राईव्हची आठवण झाली. रस्ता, त्याला जोडून फुटपाथ, मग दगडांनी भरलेला किनारा अन अथांग समुद्र. फरक एवढाच की मरीन ड्राईव्हचा किनारा उंचच उंच इमारती, दिव्यांचा झगमगाट ह्यांना मिरवणारा, दिमाखदार तर इथला समुद्र साधा तरीही सुंदर! 
 अंधार पडू लागला तशी हॉटेलवर परत आलो ,जेवलो, दुसर्या दिवशीचे प्लानिंग केले आणि झोपून गेलो.
 तशा पॉँडिचेरीमध्ये पाहण्यासारख्या ऑरोविले, म्युझिअम, बोटॅनिकल गार्डन, काही मंदिरे इत्यादी बऱ्याच जागा आहेत. पण पॉँडिचेरीहून सुमारे ८० की.मी. वर असणारे महाबलीपुरमही छान आहे असे ऐकलेले होते. त्यामुळे दुसर्या दिवशी महाबलीपुरमला जायचे ठरवले. सकाळी ८ ला हॉटेल सोडले. पॉँडिचेरी ते महाबलीपुरम रस्ता फार सुंदर होता. अधून-मधून दिसणारी समुद्राची खाडी फारच सुंदर दिसत होती. दिल चाहता है, कैसी है ये ऋत की जिस मी, देखा ना हाय रे सोचा ना इत्यादी टिपिकल  पिकनिक मूडची गाणी म्हणत म्हणत महाबलीपुरमला कधी पोचलो तेच कळले नाही. 
महाबलीपुरम हा एक awesome अनुभव होता. आमची गाडी आधी थांबली ती लेण्यांजवळ. ह्या लेण्या बऱ्याच मोठ्या परिसरात पसरलेल्या आहेत. 

लेण्यांमध्ये वेगवेगळे ऐतिहासिक प्रसंग चितारलेले आहेत. सुरेख असे कोरीव काम मन मोहून टाकते.

लेण्यांच्या बाजूने समुद्राचे मोहक दर्शन घडते. थोडे पुढे जाऊन लाईट-हाउस लागते.  

 लाईट-हाउसच्या पायथ्याहून दिसणारे दृष्य अप्रतिम होते. त्या दिवशी तरी लाईट-हाउसवरती जाऊ देत नव्हते.पण पायथ्याहूनच दिसणारा देखावा इतका छान होता की वरून तर फार फार अप्रतिम दृष्य दिसत असावे एवढे नक्की!

लेण्यांहून निघून पुढे आम्ही समुद्र किनार्यावर गेलो...समुद्राच्या काठी सुंदर असे देऊळ आहे. समुद्राच्या पार्श्वभूमीवर छोटेसे दगडी देऊळ, त्याच्याभोवती नक्षीदार दगडी कुंपण हा एक वेगळा अनुभव होता.
त्या दिवशीसमुद्रात खेळायची इच्छा नाही झाली. दूरवर नजर टाकावी तिथे निळे पाणी, पाण्यातून अलगद डोके वर काढलेले निळे आकाश, समुद्राच्या सामर्थ्याची झलक देणाऱ्या, गरजत येणाऱ्या उसळत्या लाटा. लाटांकडे पाहून पांढऱ्या शुभ्र, तगड्या घोड्यांची फौजच कोणावर चाल करून जात आहे की काय असे वाटत होते. निसर्गाच्या ह्या आगळ्या-वेगळ्या अवताराला निरखत न्याहाळत हळू हळू किनार्यावरून चालायला सुरवात केली. गर्दीपासून दूर अशा ठिकाणी जाऊन बसलो. तपकिरी रेती, शंख-शिंपले, आपापल्या उद्योगात मग्न असलेले खेकडे, त्यांच्या चालण्याने रेतीवर तयार झालेली नक्षी, दूरवर दिसणारी हळू हळू ठिपक्यात परिवर्तीत झालेली एखादी नाव, समुद्राकडे पाहून जोर-जोरात ओरडत बसलेला कावळा, किती गोष्टी होत्या रमून जाण्यासारख्या. एका खेकड्याला च्या मागे मागे नजर परत समुद्रावर गेली. समुद्राच्या लाटांकडे पाहताना सावरकरांच्या 'सागरास' मधल्या ओळी हळू हळू नजरेतून मनात उतरू लागल्या.  
भू मातेच्या चरणतला तुज धूता मी नित्य पाहिला होता...
ह्या फेनमिषे हससि निर्दया कैसा का वचन भंगिसी ऐसा...
त्या लाटांच्या हालचालींना, त्यांवर येणाऱ्या फेसाला सावरकरांनी किती वेगळा अर्थ दिलाय.
'सागरास' मधील प्रत्येक ओळ त्यादिवशी समुद्रकिनार्यावर बसून मी अनुभवली. डोळ्यांतून पाणी आले. केवढे हे देशप्रेम, स्वदेशी परत जाण्याची केवढी ही तळमळ, आणि ती व्यक्त करण्याचा किती प्रभावी प्रयत्न. इंग्रजांविरुद्ध कडवी झुंज देणाऱ्या, अंदमानच्या तुरुंगात काळ्या-पाण्याच्या शिक्षेला निडरपणाने सामोर्या जाणार्या ह्या वीराचे तेच कणखर मन मातृभूमीच्या विरहाने  एवढे हळवे झालेले दिसते. सावरकरांच्या चतुरस्र व्यक्तिमत्त्वाबद्दल वाटणारे आश्चर्य, आदर मनात मावत नव्हता. विचार इथेच थांबले असते तर बरे झाले असते. पण देशासाठी संपूर्ण आयुष्याचे बलिदान देणाऱ्या ह्या माणसाची भारत मातेने काय किंमत केली ह्या विचारांनी मन खिन्न झाले. 
समुद्राहून निघून, जेवून चारच्या सुमारास महाबलीपुरम सोडले. भेंड्यांचा कार्यक्रम सुरु झाला. ३-४ तास सलग भेंड्या खेळत होतो. हसत-खेळत मजेत प्रवास चालला होता. १० च्या सुमारास गाडी धक्के खात खात रस्त्यात थांबली. गाडीतले पेट्रोल संपल्याची घोषणा ड्रायवर महाशयांनी  केली. कमाल माणूस होता तो! प्रवासात पेट्रोल पूर्णपणे संपून गाडी थांबेपर्यंत ह्या ड्रायवरला कळलेच नाही ही कल्पनाच मोठी आश्चर्यकारक होती! ड्रायवर महाशय गाडीतून उतरले. पुढे जाऊन पंप मारून थोडे पेट्रोल चढवले. गाडी २ मिनिटे चालून परत थांबली. जवळ पास एक चिटपाखरुही दिसत नव्हते. परत पंप मारला, परत गाडी थोडी पुढे जाऊन कुरकुरत थांबली असे ४-५ वेळा झाल्यावर शेवटी एक पेट्रोल पंप दिसला आणि आम्हाला हुश्श वाटले. कॅनमधून थोडेसे पेट्रोल आणून गाडीत भरले. समाधानाचा निश्वास टाकत गाडी पुढे निघाली. ह्या सगळ्या गोंधळात जेवण झालेच नव्हते. पुढे एक छोटे शहर लागले. जेवणासाठी हॉटेल मिळते का पाहू लागलो. खूप शोधल्यावर एक हॉटेल मिळाले. तिथे जे काही उरले-सुरलेले मिळाले ते जेवलो. पेट्रोल भरले. गाडीचे पोट भरल्यावर गाडीला तरतरी आली आणि ती सुसाट निघाली. आमच्या पोटोबाची पूजा झाल्याने आम्हाला पेंग यायला लागली. कसे-बसे डोळे उघडे ठेवत, जागे राहण्याचा प्रयत्न करत आणखी काही वेळ गेला आणि अजून काही आश्चर्यकारक घटना न घडता आम्ही बंगलोरला आलो. 
ही ट्रीप आत्तापर्यंतच्या ट्रिप्स मधली सगळ्यात कमी प्लानिंग केलेली अशी ट्रीप होती. मजा आली, पण पॉँडिचेरी, महाबलीपुरम मध्ये बघण्यासारख्या, ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा इतरही जागा आहेत त्या पाहता आल्या नाहीत. ह्या जागा पाहण्यासाठी, आणि ह्या ट्रीपमध्ये पाहिलेल्या जागांविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी अजून एकदा पॉँडिचेरी-महाबलीपुरमला भेट द्यायला मला नक्की आवडेल. 
(Photography: Abhijeet)  



Sunday, June 12, 2011

शांत, सुंदर कूर्ग



कूर्गची तारीफ लोकांकडून पुष्कळदा ऐकली होती. २-३ वेळा जायचे बर्यापैकी नक्कीही केले होते. पण काही ना काही कारणाने दरवेळी कुर्गची ट्रीप रद्द होत होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत अभिजीतचे आई-बाबा यायचे ठरले. आता मात्र नक्की जायचेच असे ठरवले. मॅजेस्टिक, बंगलोरहून कुर्गला बऱ्याच गाड्या असतात असे कळले. संदीपकडून 'अपना घर' ह्या होमे-स्टेची माहिती मिळाली होती. लगोलग बुकिंग्स करून टाकली.
शुक्रवारी रात्री ११च्या गाडीने कुर्गला निघालो. तिथे पहाटे ४.३० ला पोहोचलो. होमे-स्टेतर्फेच बस-स्टॅंडहून कॉम्प्लिमेंटरी पिक-अप, ड्रॉपची सोय होती. होमे-स्टेचा मालक रशीन ह्याला फोन लावला. १५ मिनिटात तो घ्यायला आला. होमे-स्टेवर जावून थोडा आराम केला. रशीननेच साईट-सीइंगसाठी गाडीची सोय आणि प्लानिंग करून दिले. नाश्त्याला गरमा-गरम पुट्टू, सांभार आणि कॉफी असा बेत होता. पुट्टू आम्ही वायनाड ट्रीपमध्येही खाल्ले होते. तांदळाचा हा पदार्थ सांभारसोबत भारी लागतो.


कॉफीही मस्तच होती. पोटोबाची पूजा सकाळी सकाळी आटोपल्यावर फिरायला बाहेर पडलो.
पहिली जागा होती Bhagamandala (मला इथल्या जागांच्या नावांचे उच्चार कधीच समजत नाहीत, त्यामुळे इंग्लीशमधूनच लिहिते). इथे कावेरी, सुज्योती आणि कनिके ह्या नद्यांचा संगम होतो. शिवाय इथे Bhagundeshwara Kshetra हे मंदिरही आहे. मंदिराच्या आवारात मुख्य देवळासोबत इतर छोटी छोटी ५-६ देवळे आहेत. देउळ दगडी आहे. आजूबाजूचा निसर्गही रम्य आहे. थोडा वेळ तिथे घालवून पुढे निघालो.


पुढचे ठिकाण होते तलकावेरी. ब्रह्मगिरी पर्वतात वसलेले असे हे ठिकाण. इथे कावेरी नदी उगम पावते. छोट्या झर्याच्या रुपात इथे जन्मास आलेली कावेरी लगेचच भूमिगत होऊन काही अंतरावर आपल्या डौलदार रुपात पुन्हा प्रकटते. ह्या जागेला विशेष धार्मिक   महत्त्व आहे. शंकराचे आणि गणपतीचे देउळ आहे. देवळाच्या बाजूने ब्रह्मगिरी पर्वताचे मोहक सौष्टव नजरेस येते. डावीकडे दरी. हिरव्यागार झाडांनी नटलेली, धुक्याची शाल ल्यालेली.


कितीतरी वेळ ह्या सौंदर्याला डोळ्यात साठवत राहिलो. पुढे सुमारे ४०० पायऱ्या वरती जाताना दिसल्या. एक-एक पायरी चढत जेव्हा वरती पोहोचलो तेव्हा एका क्षणात अंगाला आलेला क्षीण नाहीसा झाला. आम्ही ब्रह्मगिरीच्या शिखरावर होतो. चारीही दिशांनी दरी...पायथ्याच्या गावांचे मनोरम दृश्य. छोटी घरे, शेते...पलीकडे आणखी काही पर्वत. हिरवीगार जमीन. एके ठिकाणी पर्वताच्या सावलीने लीफ ग्रीन कलरचा पॅच निर्माण झाला  होता. सूर्याच्या किरणांमुळे त्याच्या मधोमध लिरील ग्रीन कलरचा आणखी एक पॅच तयार झाला होता. फारच सुरेख दृश्य होते ते. ढगात बसलोय की काय असे वाटत होते. 


काही वेळ तिथे घालवून खाली आलो. गरमा-गरम चहा प्यायला आणि पुढच्या प्रवासाला निघालो.  
पुढची जागा होती Abbi Falls. ह्या धबधब्याकडे जाणारा रस्ता एका खासगी कॉफीच्या प्लांटेशनमधून जातो. पायऱ्या उतरत खाली जाताना  आपल्या डोळ्यांना काय आनंद मिळणार आहे ह्याची पूर्ण कल्पना येत नाही. धबधबा जसा जसा जवळ येतो तसा तसा आपल्या आवाजाने आपले अस्तित्त्व जाणवून देऊ लागतो. पहिल्यांदा नजरेस पडतो तो झुलता पूल. ह्या पुलावर उभे राहून धबधब्याचे सौंदर्य न्याहाळत बसण्याचा आनंदच अवर्णनीय. समोर मोठीच्या मोठी खडकाची भिंत न तिच्या टोकावरून कोसळत खाली येणारा धबधबा. मुख्य म्हणजे धबधब्याच्या तिन्ही बाजूंना रेलिंग घातल्याने लोक दारू पिऊन धिंगाणा इथे घालून शकत नाहीत त्यामुळे निसर्गप्रेमींना येथील मनोरम दृश्याचा पुरेपूर आस्वाद घेता येतो. रस्त्यापासून दूर अशा ह्या ठिकाणी धबधब्याचा आवाजही अगदी वेगळ्या प्रकारचा अनुभव देऊन जातो. निसर्ग म्हणत असावा अशी काही काहीच तर ठिकाणे आहेत जिथे मी मोकळेपणाने बोलू शकतो आणि माझे शब्द माणसांपर्यंत पोचू शकतात. खरच हा धबधबा आपल्याशी काहीतरी बोलत आहे असे वाटते. त्याचे रूप डोळ्यात साठवत आणि आवाज कानांमध्ये ऐकत तिथेच बसून राहावे असे वाटले.


थोड्या वेळाने मन भानावर आल्यावर पुढे जायला हवेय ह्याची जाणीव झाली. परत निघालो. वर जावून ताक, तिखट लावलेली कैरी खाल्ल्यावर सिंहगडाची आठवण झाली. नॉस्टॅल्जिक वाटले.   शेवटी ''जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी|". असो. तिथून निघालो आणि 'Raja's Sit' नावाच्या ठिकाणी गेलो. इथे एक बाग होती. बागेतून आणखी आत गेल्यावर दरीचा व्ह्यू होता. थोडावेळ तिथे बसलो. ढगांनी पावसाचे काही थेंब सांडून 'चला घरी जा बरे' असे शांत आवाजात सांगितले. जोरात पाऊस पडून त्यांनी हाकलण्याची आणखी पुढची स्टेप घेण्याआधी आम्हीच तिथून पळ काढला.रूमवर परत आल्यावर रशीनने गरमा-गरम कॉफी दिली. मग आराम करून जेऊन आलो. पत्ते खेळले. झोपून गेलो. 
दुसऱ्या दिवशी सकाळी ८ ला निघायचे होते. नाश्त्यात गरमा-गरम इडली-सांभार-कॉफी होते. त्यावर तव मारून निघालो ते एलिफंट कॅम्पकडे. गाडीतून जाताना जे दृश्य दिसत होते ते अप्रतिम होते. पावसाळी हवा. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरव्यागार बागा कॉफीच्या, नारळाच्या, आंब्याच्या, निलगिरीच्या न आणखीही ना माहिती असलेल्या कसल्या कसल्या झाडांच्या. काही काही बागांमधली झाडे तर इतकी उंच होती की जणू काही त्यांच्यात आभाळाला टेकण्यासाठी शर्यत लागली होती. ह्याच बागांमध्ये क्वचित दिसणाऱ्या केळीच्या झाडांच्या झावळ्याही जमिनीकडे झुकलेल्या नव्हत्या...त्याही ताठ होत्या. असे वाटत होते की जणू ही झाडे हात उंचावून इतर उंच झाडांना म्हणत आहेत की 'आम्हालाही कडेवर घेऊन आभाळाला हात लावू द्या की...' असे रम्य दृष्य पाहता पाहता एलिफंट कॅम्प कधी आले तेच कळले नाही. 
एलिफंट कॅम्प हे एक नदी ओलांडून पलीकडे आहे. ९.३०-११ ह्या वेळामध्ये हत्तींना नदीच्या किनार्याशी आणून त्यांना अंघोळ घालणे, मग त्यांना खाऊ पिऊ घालणे इत्यादी कार्यक्रम केले जातात. २० रुपयात बोटने नदी पार करून हा सगळा कार्यक्रम पाहण्याची सोय फॉरेस्ट डीपार्टमेंटने लोकांना करून दिली आहे. जर हत्तीला अंघोळ घालायची असले किंवा स्वतः खाऊ घालायचे असेल तर आणखी पैसे भरून तिकीट घेता येते. 


बोटने पलीकडे गेलो. हत्तींचे शांतपणे निरीक्षण करता येईल अशी मोक्याची जागा शोधून बसलो. कॅम्पची लोक एकेक करून हत्तींना अंघोळ घालायला आणत होते. हत्तींचे चालणे, वागणे ह्यावरून हत्तींचे वय लक्षात येत होते. सगळ्यात मोठे हत्ती शांतपणे येऊन किनार्यावर पडायचे. त्यांना अंघोळ घातली की माहुताच्या आदेशाप्रमाणे निघून जायचे. थोडे मध्यमवयीन हत्ती स्वतःला वाटले तर सोंडेने अंगावर पाणी घेत होते. एक हत्तीचे पिल्लूही तिथे होते. बाकीच्या हत्तींना साखळदंड बांधलेले होते. हे पिल्लू लहान असल्याने पाहिजे ते करायला मोकळे होते.


 ते आले, पळत पळत पाण्यात शिरले. पाण्यात वेगवेगळ्या हालचाली करून मजा करू लागले. मग त्याचा कंटाळा आल्यावरइतर हत्तींना त्रास देणे त्याने सुरु केले. ह्याला धक्का दे, त्याच्या पायाशी खेळ असे खूप वेळ केल्यावर मात्र माहुताने पाठीवर एक फटका मारला. 'आता आपली जाण्याची वेळ झाली' हे पिल्लाला समजले. नाखुशीनेच आपल्या आईच्या मागे मागे जाऊ लागले. चढ आल्यावर मात्र पिल्लाला काय करावे ते कळेना. तेव्हा पाय गुडघ्यात वाकवून सोंडेचा आधार घेऊन, अडखळत कडे बसे ते चढले. ५ मिनिटांपूर्वीच अंघोळ करून स्वच्छ झालेले पिल्लू परत मळले.


पुढचा कार्यक्रम होता हत्तींच्या नाश्त्याचा. कॅम्पच्या लोकांनी त्यांना भरवायला नाचणीचे गोळे केले होते. २-२ गोळे हे लोक हत्तीच्या तोंडात भरवत होते. एक गोळा लागलीच तोंडात टाकून, न दुसरा गोळा सोंडेत झेलून हत्तींची खादाडी सुरु झाली. पुढे हत्तींची सगळी माहिती तिथल्या माणसांनी दिली. कॅम्पला तशी मजा आली. पण अंकुशाकडे पाहून मला फार वाईट वाटले. हत्तींना वठणीवर आणण्यासाठी माहूत अंकुश आणि पायाचा वापर करतात. पायाने कानावर टोचून टोचून हत्तीला सूचना देतात. अंकुशाच्या काठीने डोक्यावर मारतात. टोकदार अंकुश डोक्याला टोचतात. त्या हत्तींना सारखे तसे करून दिखात नसेल काय? आपल्याला कोणी असे केले असते तर? केवळ बुद्धी कमी म्हणून तो विशालकाय हत्ती माणसाच्या मुठीत राहतो.   
एका माणसाने दुसर्या माणसाला अशा प्रकारे वागवले तर ती गुलामगिरी न माणसाने प्राण्यांना असे वागवले तर त्याला काय म्हणायचे? असे विचार मनात चालू असताना नजर वेधली ती पलीकडच्या सुरेख दृश्याने. मस्त हिरवळ, भरपूर झाडे, त्यांमधली काही गुलमोहोराची होती..हिरवा आणि केशरी रंगांनी रंगून गेली होती.


डोळ्यांना तृप्ती मिळाली. निसर्गाचे हे वैभव डोळ्यात साठवत बोटीने परत पलीकडे गेलो. गाडीत बसलो ते 'निसर्ग धाम' ला जाण्यासाठी.
परत एकदा झुलत्या पुलाने झुलून दाखवून आमचे स्वागत केले. पूल बांधलेला आहे कावेरी नदीवर. नदीच्या पाण्यात बोटिंग करायची सोयही आहे. पूल पार करून आत गेल्यावर आपण बांबूच्या बेटावर आहोत असे वाटते. जिकडे तिकडे बांबूच्या झाडांचे पुंजके. 


आत गेल्या गेल्या एका मोठ्या कुंपण घातलेल्या जागी नांदणारे असंख्य ससे नजर वेधून घेतात. खूप वेगवेगळ्या रंगांचे नि वयाचे ससे आहेत. मी बराच वेळ त्यांचे निरीक्षण करत बसले. पुण्याच्या मांजरांची आठवण झाली. काही ससे झोपले होते. काही बसल्या बसल्या डुलक्या मारत होते तर काही मस्त पाय पसरून, एकमेकांच्या अंगावर लुडकून झोपले होते. 


काही सशांची खादाडी चालली होती. कसली घाई असते ह्या सशांना काय माहित. खातानाही तोंड ते इतके भरभर भरभर हलवत होते की दुखत कसे नाही असे वाटत होते. थोड्या वेळानंतर सशांचा खेळण्याचा कार्यक्रम सुरु झाला. सुरवात झाली ती अशी. एका सशाला अचानक काय वाटले त्याने भराभरा जाऊन दुसर्या सशाच्या अंगावर उडी मारली. खो मिळाल्यासारखा हा ससाही दुसर्या सशाच्या दिशेने पळाला. त्याचा खो मिळताच तिसर्या सशाने हेच केले. ह्या खो-खोचा कंटाळा आल्यावर परत खादाडी आणि झोपेचा प्रोग्राम सुरु झाला.
हे पाहत असतानाच खुराड्यातून अचानक छोटेसे हरणाचे पिल्लू बाहेर आले. बॅम्बीची आठवण झाली त्याला पाहून. थोडावेळ आपला गेस्ट अपिअरन्स देऊन ते परत खुराड्यात जाऊन बसले. 
'स्वीट कॉर्न' चा आस्वाद घेत घेत आत जायला निघालो. वाटेत एके ठिकाणी दिवसभर वन्य प्राण्यांवर आधारित फिल्म्स दाखवण्याची सोय केलेली दिसली. पुढे जाऊन हरणांच्या पिंजर्याला भेट दिली. भरपूर हरणे होती. त्यांचा पिंजराही मोठा होता. गरज लागेल तेव्हा हरणांना विश्रांती घेता यावी म्हणून छान अडोश्याचीही सोय होती. 
तिथेच पुढे हत्तीवर सैर करण्याची सोय होती. पण मला तो प्रकार विशेष आवडला नाही.हत्तींविषयी फारच वाईट वाटले. 


फोटोत दाखवल्याप्रमाणे त्या प्लाटफॉर्मखाली मान घालून आधी हत्तीला उभे करायचे. मग लोक त्यावर बसणार. मग हत्ती ठरलेल्या वाटेवर ५ मिनिटे हिंडवून आणणार. हे दिवसातून अनेक वेळा रिपीट झाल्यावर हत्तीला कंटाळा नसेल येत का? बर वाट फार निमुळती होती. त्यामुळे दोन हत्ती विरुद्ध दिशेने आले की जॅमचा प्रोब्लेम सोडवण्यासाठी परत हत्तींच्या कानाला अंकुश लावून त्यांना वळवले जायचे. कानामागे पायाने टोचून टोचून हत्तीला वाट दाखवली जायची. अंकुश आणि पायाचा सारखा वापर करूनच बहुदा एका हत्तीचा कान अक्षरशः फाटला होता. 
चालत चालत आणखी थोडे पुढे गेल्यावर नदी लागते पुन्हा. निसर्गधाम ही जागा बरीचशी वायनाड च्या 'kuruwa irland' सारखी आहे. तपकिरी रंगाचे पाणी, फारसे वाहते नाही. भोवताली हिरवी झाडे. आकाश दिसताच नाही. गूढ वातावरण एकदम. 


इथे एका माकडाने धुमाकूळ घातला होता. लोकांच्या पिशव्या उचकून त्यातून जर खाण्यासारखा पदार्थ बाहेर आला तर त्याचा फन्ना उडवायचा नाहीतर कपड्यांसारख्या निरुपयोगी वस्तू बाहेर आल्या तर भिरकावून द्यायच्या असा प्रकार चालला होता. २-३ माणसांनी हुसकावून लावायचा प्रयत्न केला असता ह्या माकडाने त्या माणसांच्या अंगावर धावून जायचेही कमी केले नाही. 


काही वेळ पाण्यात पाय सोडून बसलो न निघालो. आतच छोटेसे हॉटेल आहे तिथे जेऊन निसर्गाधामला अलविदा म्हणले.
पुढे गोल्डन टेम्पलला गेलो. दारातून प्रवेश केल्या केल्या स्वच्छ आणि सुंदर असे प्रांगण लागले. प्रांगणातून अजून आत गेल्यावर एक छोटी वाट लागली. दोन्ही बाजूंनी हिरवळ होती. हिरवळीवर वेगवेगळे पक्षी दिसत होते. सतत जाग असलेल्या ह्या ठिकाणीही एका बदकोबांचे मस्त डुलक्या घेणे चालले होते. 


मुख्य मंदिर बंद दिसले. आणखी आत गेले असता "Padmasambhava Buddhist Vihara" नावाची मंदिरासारखीच जागा दिसली. आत गेलो तर एका वेगळ्याच दुनियेत असल्यासारखे वाटले. मोठाच्या मोठा हॉल. समोर बुद्ध देवतांच्या तीन प्रचंड मोठ्या मूर्ती होत्या. हॉलच्या भिंतींवर बौद्ध इतिहासावर आधारित काही चित्र होती. खांबांना आणि छपराला पाच रंगांच्या कापडांच्या झालरींनी सजवलेले होते.


त्या मूर्ती, सजावट आणि शांतता ह्यांमुळे नकळतच जमिनीवर बसून ध्यानमग्न व्हावे अशी इच्छा झाली. ५ मिनिटे डोळे मिटून बसल्यावर शांतीचा अनुभव आला. डोळे उघडवेसेच वाटेना. काही वेळानी बळेच डोळे उघडले. शांतपणे मंदिराबाहेर पावले टाकली. प्रांगणाच्या बाहेर पावले टाकू इतक्यात मुसळधार पाऊस आला. पळत पळत एका हॉटेलात जाऊन बसलो. गरमागरम चहाने रंगत वाढवली. कसे बसे गाडीत बसलो आणि होम-स्टे वर पळालो. 

रशीनने परत गरमागरम कॉफी आणून दिली. कॉफीचा आस्वाद घेत घेत पत्ते खेळलो. होम-स्टेतच गॅस आणि भांड्यांची सोय असल्याने तिथेच सूप, नूडल्स, सॅन्डविचेस तयार करून त्याचा फन्ना उडवला. परत पत्ते खेळलो. अभिजीतच्या आई-बाबांच्या लग्नाचा वाढदिवस होता दुसर्या दिवशी. रात्री १२ ला केक कापून त्यांना सरप्राईझ द्यायचे ठरवले होते. रशीनला सांगून केक मागवून ठेवला होता. पत्ते खेळता खेळता ११.३० वाजले सगळ्यांना झोप आली होती. सगळे आपापल्या रूम्सवर गेलो. मधल्या काळात केक आणि ग्रीटिंग कार्ड काढून ठेवले. १२ वाजता जाऊन आई-बाबांचे दर वाजवले. घाबरतच त्यांनी दर उघडले. अशा नवीन ठिकाणी केकचे सरप्राईझ मिळण्याची त्यांची पहिलीच वेळ होती. एकदम खुश झाले. थोड्या वेळ गप्पा मारून झोपलो. 
दुसर्या दिवशी नाश्त्यात रशीनने उपमा दिला होता. त्यावर तव मारून झाल्यावर रशीनने स्टेशनवर सोडले. गाडी वेळेवर आली. गाडी निघाली आणि पुन्हा सुंदर रस्त्यावरून पळायला लागली. पण २-३ दिवसांच्या धावपळीमुळे आता मात्र डोळे मिटू लागले. स्वप्नातही नारळाच्या बागा येऊ लागल्या. गाडी बंगलोरला आल्यावर मात्र जाग आली. आधी भराभर अंतर कापणारी गाडी आता मात्र गोगलगायीच्या वेगाने चालू लागली. कसे बसे मॅजेस्टिक आले. तिथून पकडलेली घरासाठीची बस जॅममधून वाट काढत काढत कशीबशी स्टेशनच्या दाराशी पोचेस्तोवर बंद पडली. परत आतपर्यंत चालत जाऊन दुसरी बस पकडली. पुन्हा तिकीट काढावे लागले. ट्रीपच्या शेवटी  मनस्तापाचा काळा तीट लागल्याने इतक्या सुरेख झालेल्या ट्रीपला आपलीच नजर लागायची भीती गेली. घरी येऊन खिचडी करून खाल्ली आणि झोपून गेलो. 
२-३ दिवसांची ही ट्रीप इतकी रेफ्रेशिंग होती की तिने पुढले अनेक दिवस बंगलोरमधल्या धावपळीला तोंड देण्यासाठीचे इंधन पुरवले....
(Photos By: Abhijeet and Me)

Thursday, March 17, 2011

वायनाड (केरळ) ट्रीप

    ऑक्टोबरचा लाँग वीकेंड जवळ येत होता. रोजच्या रुटीन मधून ब्रेक हवा होता. "आपण कुठेतरी फिरायला जाऊया मस्त!", अभिजीतला सुचवले. तोही लगेच तयार झाला. वेगवेगळ्या जागांची माहिती काढणे सुरु झाले. कूर्गबद्दल खूप लोकांकडून ऐकलेले असल्याने त्याच्याबद्दल सर्च करायला लागलो. दक्षिण भारतातील हिल-स्टेशन्सवर राहण्यासाठी "होम-स्टे" हा उत्तम पर्याय असतो. त्या ठिकाणचे लोक आपल्या घरीच राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय करतात, उत्तम पाहुणचार करतात. फायदा असा की ह्यामुळे जिथे जाऊ त्या ठिकाणाची राहणी, खान-पान, घरे इत्यादीन्बद्दलही कल्पना येते. आम्ही कूर्गमधील होम-स्टेजना कॉल करू लागलो. दसरा जवळ आला होता. ह्या काळात कूर्गमध्ये जत्र भरते. त्यामुळे तिथे भरपूर गर्दी असते. असंख्य कॉल्स केले. सगळे होम-स्टेज बुक झालेले होते. त्यातच एका मित्राने सांगितले की त्या जत्रेमुळे कूर्ग ही आत्ता जाण्यासाठी योग्य जागा नाही. आमचा कूर्गविषयीचा सगळा अभ्यास वाया गेला. बर... मग आता कुठे जायचे हा प्रश्न होताच. http://www.mustseeindia.com/places-around-bangalore  ही एक अतीशय माहितीपूर्ण साईट मिळाली. अनेक जागांविषयी चर्चा करता करता गाडी वायनाडला पोहोचली. वायनाड- केरळ मधील एक पर्यटनासाठी प्रसिद्ध असा जिल्हा. कसे जावे, कुठे राहावे परत शोध सुरु झाला.
    हल्ली travelogs, tourism-related sites वरचे हॉटेल्सविषयींचे रिव्ह्यूज ह्यांमुळे ट्रिपचे प्लानिंग करणे फार सोप्पे झाले आहे. अनेक ठिकाणी 'Tropical Forrest' ह्या होम-स्टे विषयी चांगले रिव्ह्यूज लिहिलेले दिसले. त्यांना फोन केल्यावर एका बंगल्यात जागा आहे असेही कळले. आम्ही फार विचार न करता बुकिंग करून टाकले. बुकिंग केल्यावर प्रवास कसा करावा ह्याचा विचार सुरु झाला. दोन माणसांसाठी स्वतंत्र गाडी करणे हा पर्याय खर्चिक आणि कंटाळवाणा वाटला. कोणत्यातरी न आठवणार्या कारणाने बसने जायचाही पर्याय रद्द केला. "बाईकने जावे का?", अभिजीतने योग्य वेळ पाहून हळूच पिल्लू सोडले. आम्ही आधी मुन्नारला गेलो होतो तेव्हा तिथल्या कॉफी-इस्टेट्स पाहून तशा रस्त्यांवर गाडी चालवायला मिळाली तर किती मजा येईल असे अभिजीतने म्हणाल्याचेही मला आठवले. माझ्या तोंडातून पटकन हो निघाले.
     त्यावेळी काही जाणवले नाही. पण आम्हाला ३०० की.मी.चे अंतर कापायचे होते. मी कधी बाईक वरून इतक्या लांब गेलेली नव्हते. शिवाय आम्ही दोघाच जाणार होतो. तेव्हा काही झाले तर सोबत कोणीच असणार नव्हते. मला जरा भीती वाटायला लागली. बस मिळू शकेल का त्याची चौकशीही केली. पण लाँग वीकेंड सुरु व्हायला एकाच दिवस उरला असल्याने बुकिंग फूल झाले होते. पर्यायाच नाही म्हणल्यावर भगवान-भरोसे बाईक-ट्रीप करूनच पाहू असे ठरवले.
     सकाळी ५ ला घरून निघालो. तासा-दीड तासाचे ब्रेक घेत घेत अंतर कापू लागलो. दर वेळी ब्रेअक घेतला की पुढच्या स्ट्रेचमध्ये किती वेळात कुठे पोहोचायला हवे ते ठरवायचो. जस-जसे पुढे जाउ लागलो तस-तसा माझाही कॉन्फिडन्स वाढून भीती नाहीशी झाली. मजा यायला लागली. वार्याच्या आवाजात आवाज मिळवून अनेक गाणी म्हणाली.
यूं ही चला चाल राही, यूं ही चला चाल राही..कितनी हसीन ही ये दुनिया...
भूल सारे झमेले देख फुलों के मेलें, बाडी रंगीन ही ये दुनिया...
   वातावरण अगदी हे गाणे आठवावे असे होते. निमा-पाऊण प्रवास एकदमच मस्त झाला. रस्ता एकदमच मस्त होता. वरुणराजाची कृपा म्हणून पाऊसही पडत नव्हता. पण मध्येच एका स्ट्रेचमध्ये रस्ता अस्तीशय वाईट होता."रस्त्यात खड्डा, की खड्ड्यात रस्ता" अशी परिस्थिती होती. कंबरडे पार मोडले. बराच वेळ प्रवास झाल्याने दुखणे जास्तच तीव्र वाटत होते. आधी आम्ही १-१ गाव मागे टाकण्यासाठी झुंजत होतो न आता १-१ १-१ की.मी पार पाडण्यासाठी झुन्जतोय असे वाटू लागले. एवढा केलेला प्रवास पाहता डेस्टीनेशन तसे जवळ आले होते, पण आता आम्हाला जास्त विचारात विचारात जायला लागत असल्याने जास्त वेळ लागत होता. तेवढ्यात पावसाने हजेरी लावली. वाटेत थांबून रेन-कोट घालण्याचा कार्यक्रम आटपायला लागला. दमलेले आम्ही, पाऊस अशा परिस्थितीत आमची गाडी कशी-बशी पुढे सरकू लागली. "Tropical ForRest" हे ठिकाण पहायला आपले प्राण तरी शिल्लक राहणार आहेत का?" असले बालिश विचार मनात यायला लागले. एवढ्यात "Tropical ForRest" च्या पाट्या दिसू लागल्या. आमच्या जिवात जीव आला. चहाचे मळे लागले. जिवाला आणखी छान वाटले आणि असे छान वाटत असतानाच "Tropical ForRest" सापडले. तिथला व्यवस्थापक साजी ह्याला फोन केला. होम-स्टे छोटीशी टेकडी चढून गेल्यावर होता. पाऊस पडत होता. तरी साजी आम्हाला घ्यायला आला. साजीने आमचे छानसे स्वागत केले. टपरीवर चहा पाजला. पाऊस थांबताच आम्ही वरती गेलो.
वायनाडला पावसाळ्यात थोडा लवकर अंधार पडतो, धुकेही पडते. त्यामुळे सर्व हालचाल बंद होते. चार वाजले होते. त्यामुळे कुठेही न जाता तिथेच थोडे इकडे तिकडे फिरून मग आराम करायचा निर्णय घेतला.
    घराच्या आजूबाजूला चालायला सुरवात केली. थोडासा चढ चढून गेलो न वरून मस्त दृश्य दिसत होते. हलकेसे धुके, वळणं-वळणांचा रस्ता, त्यापलीकडे दरी! परत येताना आजूबाजूच्या झाडांकडे लक्ष गेले. रानफुले उत्साहाने डुलत होती. जिकडे तिकडे भरपूर लाजाळूची झाडे उगवलेली होती. एका लाजाळूच्या पानांना हात लावून लावून त्याला इतके लाजवले की बिचार्याने स्वतःला जमिनीवर झोकुनच दिले. फोटो-बिटो काढले.


आता मात्र थकवा जाणवू लागला. मस्त कट्ट्यावर बसलो. पत्ते खेळलो. अंधार झाला तशी आत गेलो. साजीने मस्त गरमा-गरम जेवण आणले. त्यात काही पदार्थ आपले नेहमीचे अन काही केरळी पद्धतीचे होते. केरळी पदार्थांमध्ये नारळ बर्याच प्रमाणात वापरतात असे कुठेतरी वाचलेले प्रत्ययास आले. हवा थंड होती. दिवसभराचा थकवा, पाऊस, थंडी, गरम चहा, पत्ते, गरम जेवण..मस्त झोपेसाठी अजून चांगले औषध ते काय असणार? पांघरुणात डोके खुपसून मस्त झोपून गेलो.
     येऊन-जाऊन ६०० की,मी, असा बाईकचा प्रवास खूप होणार होता. त्यामुळे त्यादिवशीच्या साईट-सीइंगसाठी जीप केली. सकाळी लवकर निघालो. आम्ही केरळला दोनदा गेलोय. दोन्हीवेळा आम्हाला हॉटेल आणि ड्रायव्हरचा अनुभव छान आलेला आहे. समोरच्या माणसाची ट्रीप जमेल तेवढी सोयीची, आनंददायक करावी हा त्यांचा हेतू त्यांच्या वागण्या-बोलण्यातून सतत प्रत्ययास आला. साजीने सकाळी मस्त ब्रेकफास्ट आणून दिला. ब्रेकफास्टमध्ये चहा-कॉफी, पुट्टू, सांबार न केळी होती. पुट्टू हा केरळातील ब्रेकफास्ट स्पेशल आयटम आहे. तिखट आवडत असेल तर साम्बारासोबत खावा. गोड आवडत असेल तर केळी आणि साखर घालून खावा. ब्रेकफास्टने ट्रीपच्या मजेत भर घातली.  
     पहिली भेट दिली Banasura Sagar Dam ला. नाव मराठीत लिहिणे अशक्य आहे कारण त्यांचे खरे उच्चार काही आम्हाला कळले नाहीत. हा भारतातील सर्वात मोठा आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा earthen dam आहे असे कळले. बाहेर गाड्यांवर तिखट-मीठ लावलेला अननस, कैरीच्या फोडी, आवळे अशा गोष्टी दिसल्या. त्यांचा आस्वाद घेत घेत धरणाच्या दिशेने चालू लागलो. तिथे पोहोचल्यावर जे दृश्य दिसले ते अजूनही माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट येते. हिरवी जमीन, निळे पाणी, पलीकडे डोंगर..पाण्यामध्ये patch-work करावे तसे क्चोते-छोटे हिरवेगार जमिनीचे तुकडे..छोटी बेटेच जणू. ह्या बेटांची शोभा वाढवली होती ती त्यांवर हिंडणार्या बगळ्यांनी. पाण्यात बदके पोहत होती. आहाहा. शेजारीच एक छोटीशी हट होती. तिथे काही काळ नुसते हे दृश्य पाहत बसलो. पलीकडे छोटीशी बाग होती. उंच झोके झाडाला बांधले होते. काही काळ झोका घेतला. न निसर्गाची शोभा पाहत पाहत तिथून Kuruva Dweep पाहण्यासाठी निघालो.



केरळ टूरिझमच्या चिन्हाखाली "Gods own country" असे वाक्य लिहिलेले आहे. केरळच्या रस्त्यांवरून जायला लागले की ह्या वाक्यात किती तथ्य आहे ते प्रत्ययास येते. चांगले रस्ते. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला चहा-कॉफीच्या किंवा नारळांच्या बागा. सीझनमध्ये गेल्यास मस्त हवा...कोणत्याही ठिकाणाला भेट न देता नुसती भटकंती केली तरी डोळ्यांना सुख आणि जीवाला समाधान मिळते. बराचसा रस्ता असाच गेला. "कुरुवा द्वीप" कडे जाणारा रस्ता मात्र भयंकर होता. भूकंप होतोय की काय असे वाटावे तशी गाडी हलत होती. १०-१५ मिनिटांचा असा भयंकर प्रवास झाल्यावर कुरुवा द्वीपला पोहोचलो. ही जागा एकदम रहस्यमय किंवा भूत-खेतांच्या सिनेमात शोभून दिसावी अशी होती. हे एक छोटेसे बेत आहे. ह्या बेटाच्या चारीही बाजूंना चॉकलेटी रंगाचे पाणी आहे! बेटावर चित्र-विचित्र आकारांची  झाडे आहेत. उंच बांबूंची झुडुपे आहेत. बाम्बूतून वाहणार्या वार्याचा गंभीर आवाज येत असतो. हिरवा रंग असा नजरेसाच येत नाही. पाणी चॉकलेटी, जमीन चॉकलेटी,  गूढ दिसणारी झाडे! बेटाच्या एका बाजूने चालत निघायचे न बेटाच्या काठाने संपूर्ण प्रदक्षिणा पूर्ण करायची. एका वेगळ्याच वातावरणाचा अनुभव आला.

      तिथून आम्ही निघालो Poolot Lake ला. आता मला ह्याचाही उच्चार माहित नाही. ही जागाही छान होती. तलाव,  त्याच्या बाजूने चक्कर मारायला वाट केलेली होती. बाजूला झाडे. आम्ही संध्याकाळी ५ च्या सुमारास तिकडे पोचलो. अंधार पडत आला होता. किंचितसा पाऊसही होता. त्यामुळे इथेही एक गूढ-गंभीर असे वातावरण अनुभवास आले.

     दिवसभर मस्त फिरणे झाले. तसे वायनाड पूर्ण फिरायला २-३ दिवस लागतात. ठिकाणे लांब लांब आहेत. पण एक दिवसात ह्या तीन ठिकाणी जाता आले आणि फार मजा आली.
घरी परतलो. थोडा आराम, खेळ, गरमा-गरम जेवण आणि मग मस्त झोप असा दिवस म्हणता म्हणता संपला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघालो. आता रस्त्याची पूर्ण कल्पना होती. त्यामुळे कुठे कुठे विश्रांतीला थांबायचे ते आधीच ठरवले. त्यामुळे प्रवास सुखकर झाला.
येता येता चिन्नपट्टणंला मुद्दाम ब्रेक घेतला. बेंगलोरजवळील हे गाव रंगीत लाकडी खेळणी आणि वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. एका दुकानाला भेट दिली. रंगीत खेळण्यांच्या दुनियेत अक्षरशः हरवून गेल्यासारखे वाटले. थोडी खरेदी करून निघालो. बंगलोर गाठले.
     केरळचा हिरवागार निसर्ग, जेवण, पाहुणचार आणि बाईक..कॉम्बीनेशन मस्त होते. ट्रीप अविस्मरणीय होती. सहा महिन्यांनी मी तिच्यावर पोस्ट लिहू शकत आहे त्यातच सगळे आले.