Tuesday, December 13, 2011

उन्हाळा

    पुण्याचा रखरखीत आणि मुंबईचा दमट उन्हाळा सोसल्यावर उन्हाळ्याविषयी मी फार प्रेमाने लिहीन असे काही मला बंगलोरला येण्याआधी वाटले नव्हते. माणसाला कोणत्या गोष्टीची किंमत कधी समजेल काही सांगता येत नाही. गेल्या वर्षी कांद्याचे भाव ६०-७० झाल्यावर आणि अजिबात कांदा न घातलेले जेवण जेवल्यावर जशी कांद्याची किंमत कळली तसे बंगलोरमध्ये आल्यावर मला उन्हाळ्याची किंमत कळली.
उन्हाळा म्हणले की माझ्या डोक्यात आंबा, सरबते, कलिंगडे, द्राक्षे, करवंदे, जांभळे, कैऱ्या, वाळवणे (कुरडया, पापड, लोणची), माठातले पाणी, वाळा, पांढरा कांदा, पिवळ्या फुलांनी लगडलेली टबूबियाची झाडे, थोडे दिवस परीक्षा; मग उन्हाळ्याची सुट्टी आणि दिवसभर मजा (फक्त शाळेत असेपर्यंत) असे वेगवेगळे शब्द येतात. उन्हाळ्याची सुट्टी तर माझ्यासारख्या घोडीला आता कोणी देणार नाही पण बंगलोरमध्ये उरलेल्यापैकीही एकही गोष्टीची मजा उन्हाळ्यात अनुभवता आली नाही.
     उन्हाळा सुरु होऊन बरेच दिवस होत आल्यावर दशेहरी, नीलम, रसपुरी, बदामी अशा नावांचे आंबे बंगलोरमध्ये दिसू लागले. ह्यातला बदामी सोडून कुठलाच आंबा आधी चाखलेला नसल्याने आंब्याकडे बोट दाखवून हा ०.५/१ किलो द्या (हे आंबे किलोवर मिळतात) असे सांगून आंबे घेतले आणि खाल्ले. पण हापूसची सर एकालाही नाही. त्यामुळे पुण्यात असतानासारखी सकाळ-संध्याकाळच्या जेवण्यातली आंब्याच्या रसाची मजा काही इकडे घेता आली नाही. "काळी मैना डोंगरची मैना", "काळे काळे जांभूळ, लय गोड जांभूळ" अशी हाक कानावर आल्याक्षणी पळत पळत जाऊन करवंदे, जांभूळ घरी आणून मिटक्या मारत खाण्यातली गम्मतही इथे घेता आली नाही. कलिंगडांची खरी मजा येते ती उकाड्यात! सरबतांचेही तेच! भयंकर उकडतेय, डोक्यावर पंखा गरागरा फिरतोय, घामाच्या धारा वाहतायत आणि अशात कोणी कलिंगडाच्या फोडी खायला दिल्या, सरबत दिले काय समाधान मिळते! पन्ह्याची, ताज्या-ताज्या उसाच्या रसाची, कोकमाच्या,  लिंबाच्या,  रसनाच्या सरबतांची खरी मजा कडक उन्हाळ्यातच येते. होलसेल मार्केटातून १०० पेप्सिकोल्यांचे पाकीट आणून येता-जाता पेप्सीकोले खाणे हे उन्हाळ्यातच आनंद देऊ शकते. चैत्राच्या हळदी-कुन्कवानिम्मित बनणारे डाळ-पन्हेही उन्हाळ्यातच खायला छान वाटते. बंगलोरला उन्हाळ्यातही उकडतंय अशी परिस्थिती क्वचितच निर्माण होते. वर्षातले १० महिने तर इथे पाऊसच असतो. थंडी-उन्ह-पावसाचा खेळ तर दिवसभर चालू असतो. एकंदरीत बंगलोरचे हवामान चांगले आहे. पण ४ महिने उन्हाळ्याने त्रासलेल्या जिवाला पहिल्या पावसाने मिळणारा आनंद इथे नाही की सततच्या पावसाने  कंटाळलेल्या लोकांना दिवाळीच्या सुमारास अलगद येणाऱ्या थंडीने मिळणारा गारवा नाही. स्वेटर, छत्र्या ह्या वस्तू इथे कधी माळ्यावर जातच नाहीत!
   लहानपणी गच्चीत आईने धान्ये, वाळवणे घातली की त्यांची पक्ष्यांपासून राखण करण्याचे काम माझ्याकडे असायचे. वाळवणे घातली की गच्चीच्या समोरच्या पोर्चमध्ये एखादी सतरंजी पांघरून, सोबत द्राक्षे-दाणे-खाऊचा खुराक घेऊन फास्टर फेणे, टारझन, शरलॉक होम्स वगरे दिवसभर वाचत  बसायची मजा वेगळीच होती. इथे उन्हाळा असा विशेष वेगळा नसल्याने वाळवणे घालण्याचा प्लान करणेच अवघड! भर उन्हात मंडईत जाऊन लिंबे, माठ, पांढरे कांदे, वाळे, रसाची गुऱ्हाळे, शिकेकाई, मसाले ह्यांनी भरलेला बाजार नुसता पाहण्यातली एक मजा होती हे इथे उन्हाळा घालवल्यानंतर कळले.
     गेल्या मार्चमध्ये उकाडा जाणवला तशी मी मोठ्या हौसेने माठ घेऊन आले. पुण्याला गेले असताना माठात घालायला वाळा घेऊन आले. थोडे दिवस माठातले पाणी प्यायले, पण कसले काय! थोड्याच दिवसात पावसाने उन्हाळ्याला पळवून लावले, विशेष उकडेनासे  झाले आणि माठातले पाणी प्यायचे थांबवून नॉर्मल पाणी प्यायला सुरवात करावी लागली.
   थोडक्यात बंगलोरच्या लाईफमध्येही भरपूर (महागड्या?) मजा मिळतात. पण आपल्या देशीच्या ह्या बारीक सारीक माजांची सर त्यांना नाही. पुढच्यावेळी ही सगळी मजा घेण्यासाठी आवर्जून उन्हाळ्यातच पुण्याला जायचे मी ठरवले आहे.

10 comments:

  1. :) awadla warnan! khara ahe ...chhotya chhotya goshti astat pan baher gelyawarach tyanchi khari maja kalate!

    ReplyDelete
  2. ऐन थंडीत उन्हाळा का आठवावा? बाकी बंगलोरचा पाऊस मात्र अक्षरश: अंत बघतो!! उन्हाळा बंगलोरला फार अनुभवला नाही. पण थंडी अनुभवली आहे. मजा येते थंडीत. आणि हो, बंगलोरला महाराष्ट्र सदन (की भवन) आहे, तिकडे उन्हाळ्यात रत्नागिरीचे हापूस आंबे मिळतात असं ऐकलं आहे. एकदा चौकशी करून बघ.

    ReplyDelete
  3. @vinay, gelya unhalyapasun dokyat mazya hota hyawar lihaycha, pan rahun jat hota. parwa suchal so lihila. dusre mhanje atta ithe thandi wagare ajibat nahiye! gelya warshi bari hoti thandi...pan hyaweli ajun tari disat nahiye...
    hapus ambyanchya suggestions sathi thanks...chaukashi karen...

    ReplyDelete
  4. मस्तच ! शून्याखाली दिवस काढत असणाऱ्या माझ्यासारख्या मूळ नागपुरकराला 'उन्हाळा' हा केवळ शब्द वाचूनच किती मस्त वाटलं काय सांगू !! :-)

    ReplyDelete
  5. कालंच माझे दिल्लीचे मित्र बेंगलोरच्या थंडीला दिल्लीची सर नाही ... असं म्हणत होते.

    थोडक्यात काय ... मिट्टी की है जो ख़ुश्बू, तू कैसे भुलायेगा :)

    ReplyDelete
  6. Khoopach masta lihila ahes, as usual!
    Ani Faster Fene awadNari pahili mulgi tu bhetlis mala!! Great! :)

    ReplyDelete
  7. mala sudha tujhya ghari khalele pepsi cola, panha athavla he vachun. kaku kiti bhari panha karaychya.... ani barfache gole athavat ahet ka tula.

    ReplyDelete
  8. @Neha, ho gole athawatayt na...project chya kamatun break ghetla ki he sagle udyog chalayche aple :D hi post lihun zalyawar mala lakshatach ala ki barfacha gola hyacha nawahi ghetla nahiye! n ikde blore la direct mall madhye miltat te jyachi maja gadiwarchya golyala nahi...miss it!

    ReplyDelete
  9. ulta lihaycha hota...mall chya golyane gadiwarchya golyasarkhi maja yet nahi!

    ReplyDelete