Monday, September 19, 2011

पॉँडिचेरी-महाबलीपुरम ट्रीप

पॉँडिचेरीला जायचे आमचे तसे अचानकच ठरले. एका मित्राने "पुढे दोन दिवस सुट्टी आहे तर कुठे फिरायला जायचे का?" असे विचारले. "जायला हरकत नाही पण कुठे जायचे? आणि पुढे लॉंग वीकेंड असताना राहण्याची आणि फिरायला गाडीची सोय होईल का?" हे प्रश्न अगदी ओघानेच आले. "पाहू..झाली सोय तर जाऊ... पटापट ठिकाणे सुचव बरे.."- मित्र म्हणाला. दुसऱ्या दिवशीच निघायचे असल्याने ह्यावेळी वेगवेगळ्या जागांचा नेटवरून अभ्यास करून ठिकाण निवडत बसण्याइतका वेळ नव्हता.
"कशाप्रकारच्या ठिकाणी जायचेय? हिल-स्टेशन, समुद्र-किनारा, ..?" 
"मम... समुद्र किनार्यावर जाऊ.."
"मग मंगलोर, कोझिकोड, पॉँडिचेरी, ...?" (जी ठिकाणे तोंडाला आली ती सांगितली.)
"पॉँडिचेरी छान आहे म्हणे."
"ठीक आहे! राहण्याची आणि गाडीची सोय होतीये का पाहूया ते नाहीतर दुसरे काहीतरी शोधूया!"
संवाद रॅपिड फायरसारखे झाडले जात होते. नेटवर हॉटेलची शोधाशोध सुरु झाली. एका हॉटेलमध्ये सोय होतीये म्हणल्यावर ड्रायवरची चौकशी करायला सुरवात केली. आधी ओळखीच्या ड्रायवऱ्सशी कॉन्टॅक्ट होत नव्हता.
 बरेच प्रयत्न केल्यावर एक ड्रायवर सापडला.तोवर पाहून ठेवलेल्या हॉटेलच्या रूम्स संपल्या असे कळले. मग परत दुसरे हॉटेल शोधले. तोवर सापडलेला ड्रायवर एंगेज झाला होता. शेवटी एकदा हॉटेल, एकदा ड्रायवर, एकदा हॉटेल, एकदा ड्रायवर असे हो, नाही, हो, नाही होत संध्याकाळी ७ वाजता दोन्ही गोष्टी फायनलाईझ झाल्या. रात्री १० ला निघायचे ठरले होते. प्रवासाची तयारी, जेवण-खाण वगरे पटापट आवरले आणि गाडीत बसलो. आम्ही एकूण ३ जोडपी होतो. हसत-खेळत गप्पा मारत प्रवास सुरु झाला. पाहता पाहता तमिळनाडूची बॉर्डर आली. तिकडे टोल आणि इतर कामे करायला ड्रायवर गाडीतून उतरला. परत येऊन म्हणे "तिथे कंप्यूटरमध्ये काहीतरी बिघाड आहे, अर्धा तास लागेल दुरुस्त व्हायला,  तोवर मी झोपतो",  अन सरळ झोपून गेला. "असेल बुवा खरच" असा विचार करून महाशय उठेस्तोवर आम्ही जवळच्या टपरीवरुन  गरमा गरम चहा घेतला, थोडा टाईमपास केला. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, महाशय उठायची चिन्हे दिसेनात. अजून ५ मिनिटे वाट पाहून आम्ही उठवले तेव्हा २ मिनिटांत जावून ते कागद-पत्रे घेऊन आले. प्रवास परत सुरु झाला. २-३ तास झाले तशी ड्रायवर साहेब म्हणाले की ते २ दिवस झोपलेले नाहीत तेव्हा गाडी चालवणे त्यांना जमत नाहीये आणि ते अर्धा तास झोप घेऊ इच्छितात. आता आम्ही काय म्हणणार ह्यावर! झोपच येतीये म्हणल्यावर काय करणार. तशा अवस्थेत त्याने गाडी चालवणे आमच्या दृष्टीने धोकादायक होते. "झोप" म्हणालो आणि परत टाईमपास करत बसलो. अर्धा तास झाला- एक तास झाला महाराज उठायची चिन्हे दिसेनात तेव्हा बऱ्याच प्रयत्नांनी आम्ही त्याला उठवले. प्रवास परत सुरु झाला (असे वाटले). रस्त्याची परिस्थिती फार वाईट होती. अगदी डोके जागेवर असणाऱ्या माणसालाही गाडी चालवणे अवघड होते. ड्रायवर महाशय झोपेच्या नशेत! गाडी ५ मिनिटे चालली नसेल तो परत मध्येच थांबवत म्हणाले "नाही नाही...मला जमत नाहीये आत्ता गाडी चालवायला, मी झोपतो..."  आणि झोपले . पुढचे २ तास ड्रायवर झोपलेला आणि आम्ही अधून मधून डुलक्या खातोय, कसे बसे जागे राहण्याचा प्रयत्न करतोय अशा अवस्थेत गेले. हे रामायण घडता घडताच सकाळचे ५ वाजले. ५ वाजता मात्र ड्रायवरला परत उठवले. म्हणाला मला अजूनही झोप येतीये. आता मात्र आम्ही चिडलो. त्याला जाऊन तोंडावर पाणी मारून, चहा पिऊन यायला सांगितले आणि आम्हाला लवकर पॉँडिचेरीला पोहोचवायची धमकी दिली. ड्रायवर फ्रेश होऊन आल्यावर आमचा प्रवास परत सुरु झाला. ८.३०-९ च्या सुमारास आम्ही पॉँडिचेरीला पोहोचलो. हॉटेलवर जाऊन आवरले, नाश्ता केला आणि आता फिरायला जाणार एवढ्यात ड्रायवर साहेब गायब असल्याचे दिसले! फोनच उचलेनात. महत्कष्टांनी त्यांना शोधून काढल्यावर शेवटी आम्ही फिरायला निघालो. 
सगळ्यात आधी आम्ही गेलो Chunnambar Boat House ला. बोट हाउसहून बॅकवॉटरचे मनोरम दृष्य नजरेस पडते. निळे आकाश, हिरवीगार झाडे अन निळेशार पाणी...डोळ्यांना मेजवानीच.
 बोट हाउसला वॉटर स्पोर्टस, खाणे-पिणे, खेळणे ह्यांची सोय आहे. बॅकवॉटरमधून बोटीने पॅराडाईझ बीचला जाता येते. बोटीतून जाताना चारीही दिशांना छान दृश्य दिसते. बोट हाउसहून किनार्यावर पोहोचायला साधारण अर्धा तास लागतो. समुद्र किनारा फारच छान , स्वच्छ आहे. आम्ही बराच वेळ समुद्रात खेळलो. परत नावेत बसून बोट हाउसला आलो.
        संध्याकाळ झाली होती. ऑरोबिंदाश्रमात जाऊन आलो. जवळच समुद्र होता. समुद्र पाहून मला मरीन ड्राईव्हची आठवण झाली. रस्ता, त्याला जोडून फुटपाथ, मग दगडांनी भरलेला किनारा अन अथांग समुद्र. फरक एवढाच की मरीन ड्राईव्हचा किनारा उंचच उंच इमारती, दिव्यांचा झगमगाट ह्यांना मिरवणारा, दिमाखदार तर इथला समुद्र साधा तरीही सुंदर! 
 अंधार पडू लागला तशी हॉटेलवर परत आलो ,जेवलो, दुसर्या दिवशीचे प्लानिंग केले आणि झोपून गेलो.
 तशा पॉँडिचेरीमध्ये पाहण्यासारख्या ऑरोविले, म्युझिअम, बोटॅनिकल गार्डन, काही मंदिरे इत्यादी बऱ्याच जागा आहेत. पण पॉँडिचेरीहून सुमारे ८० की.मी. वर असणारे महाबलीपुरमही छान आहे असे ऐकलेले होते. त्यामुळे दुसर्या दिवशी महाबलीपुरमला जायचे ठरवले. सकाळी ८ ला हॉटेल सोडले. पॉँडिचेरी ते महाबलीपुरम रस्ता फार सुंदर होता. अधून-मधून दिसणारी समुद्राची खाडी फारच सुंदर दिसत होती. दिल चाहता है, कैसी है ये ऋत की जिस मी, देखा ना हाय रे सोचा ना इत्यादी टिपिकल  पिकनिक मूडची गाणी म्हणत म्हणत महाबलीपुरमला कधी पोचलो तेच कळले नाही. 
महाबलीपुरम हा एक awesome अनुभव होता. आमची गाडी आधी थांबली ती लेण्यांजवळ. ह्या लेण्या बऱ्याच मोठ्या परिसरात पसरलेल्या आहेत. 

लेण्यांमध्ये वेगवेगळे ऐतिहासिक प्रसंग चितारलेले आहेत. सुरेख असे कोरीव काम मन मोहून टाकते.

लेण्यांच्या बाजूने समुद्राचे मोहक दर्शन घडते. थोडे पुढे जाऊन लाईट-हाउस लागते.  

 लाईट-हाउसच्या पायथ्याहून दिसणारे दृष्य अप्रतिम होते. त्या दिवशी तरी लाईट-हाउसवरती जाऊ देत नव्हते.पण पायथ्याहूनच दिसणारा देखावा इतका छान होता की वरून तर फार फार अप्रतिम दृष्य दिसत असावे एवढे नक्की!

लेण्यांहून निघून पुढे आम्ही समुद्र किनार्यावर गेलो...समुद्राच्या काठी सुंदर असे देऊळ आहे. समुद्राच्या पार्श्वभूमीवर छोटेसे दगडी देऊळ, त्याच्याभोवती नक्षीदार दगडी कुंपण हा एक वेगळा अनुभव होता.
त्या दिवशीसमुद्रात खेळायची इच्छा नाही झाली. दूरवर नजर टाकावी तिथे निळे पाणी, पाण्यातून अलगद डोके वर काढलेले निळे आकाश, समुद्राच्या सामर्थ्याची झलक देणाऱ्या, गरजत येणाऱ्या उसळत्या लाटा. लाटांकडे पाहून पांढऱ्या शुभ्र, तगड्या घोड्यांची फौजच कोणावर चाल करून जात आहे की काय असे वाटत होते. निसर्गाच्या ह्या आगळ्या-वेगळ्या अवताराला निरखत न्याहाळत हळू हळू किनार्यावरून चालायला सुरवात केली. गर्दीपासून दूर अशा ठिकाणी जाऊन बसलो. तपकिरी रेती, शंख-शिंपले, आपापल्या उद्योगात मग्न असलेले खेकडे, त्यांच्या चालण्याने रेतीवर तयार झालेली नक्षी, दूरवर दिसणारी हळू हळू ठिपक्यात परिवर्तीत झालेली एखादी नाव, समुद्राकडे पाहून जोर-जोरात ओरडत बसलेला कावळा, किती गोष्टी होत्या रमून जाण्यासारख्या. एका खेकड्याला च्या मागे मागे नजर परत समुद्रावर गेली. समुद्राच्या लाटांकडे पाहताना सावरकरांच्या 'सागरास' मधल्या ओळी हळू हळू नजरेतून मनात उतरू लागल्या.  
भू मातेच्या चरणतला तुज धूता मी नित्य पाहिला होता...
ह्या फेनमिषे हससि निर्दया कैसा का वचन भंगिसी ऐसा...
त्या लाटांच्या हालचालींना, त्यांवर येणाऱ्या फेसाला सावरकरांनी किती वेगळा अर्थ दिलाय.
'सागरास' मधील प्रत्येक ओळ त्यादिवशी समुद्रकिनार्यावर बसून मी अनुभवली. डोळ्यांतून पाणी आले. केवढे हे देशप्रेम, स्वदेशी परत जाण्याची केवढी ही तळमळ, आणि ती व्यक्त करण्याचा किती प्रभावी प्रयत्न. इंग्रजांविरुद्ध कडवी झुंज देणाऱ्या, अंदमानच्या तुरुंगात काळ्या-पाण्याच्या शिक्षेला निडरपणाने सामोर्या जाणार्या ह्या वीराचे तेच कणखर मन मातृभूमीच्या विरहाने  एवढे हळवे झालेले दिसते. सावरकरांच्या चतुरस्र व्यक्तिमत्त्वाबद्दल वाटणारे आश्चर्य, आदर मनात मावत नव्हता. विचार इथेच थांबले असते तर बरे झाले असते. पण देशासाठी संपूर्ण आयुष्याचे बलिदान देणाऱ्या ह्या माणसाची भारत मातेने काय किंमत केली ह्या विचारांनी मन खिन्न झाले. 
समुद्राहून निघून, जेवून चारच्या सुमारास महाबलीपुरम सोडले. भेंड्यांचा कार्यक्रम सुरु झाला. ३-४ तास सलग भेंड्या खेळत होतो. हसत-खेळत मजेत प्रवास चालला होता. १० च्या सुमारास गाडी धक्के खात खात रस्त्यात थांबली. गाडीतले पेट्रोल संपल्याची घोषणा ड्रायवर महाशयांनी  केली. कमाल माणूस होता तो! प्रवासात पेट्रोल पूर्णपणे संपून गाडी थांबेपर्यंत ह्या ड्रायवरला कळलेच नाही ही कल्पनाच मोठी आश्चर्यकारक होती! ड्रायवर महाशय गाडीतून उतरले. पुढे जाऊन पंप मारून थोडे पेट्रोल चढवले. गाडी २ मिनिटे चालून परत थांबली. जवळ पास एक चिटपाखरुही दिसत नव्हते. परत पंप मारला, परत गाडी थोडी पुढे जाऊन कुरकुरत थांबली असे ४-५ वेळा झाल्यावर शेवटी एक पेट्रोल पंप दिसला आणि आम्हाला हुश्श वाटले. कॅनमधून थोडेसे पेट्रोल आणून गाडीत भरले. समाधानाचा निश्वास टाकत गाडी पुढे निघाली. ह्या सगळ्या गोंधळात जेवण झालेच नव्हते. पुढे एक छोटे शहर लागले. जेवणासाठी हॉटेल मिळते का पाहू लागलो. खूप शोधल्यावर एक हॉटेल मिळाले. तिथे जे काही उरले-सुरलेले मिळाले ते जेवलो. पेट्रोल भरले. गाडीचे पोट भरल्यावर गाडीला तरतरी आली आणि ती सुसाट निघाली. आमच्या पोटोबाची पूजा झाल्याने आम्हाला पेंग यायला लागली. कसे-बसे डोळे उघडे ठेवत, जागे राहण्याचा प्रयत्न करत आणखी काही वेळ गेला आणि अजून काही आश्चर्यकारक घटना न घडता आम्ही बंगलोरला आलो. 
ही ट्रीप आत्तापर्यंतच्या ट्रिप्स मधली सगळ्यात कमी प्लानिंग केलेली अशी ट्रीप होती. मजा आली, पण पॉँडिचेरी, महाबलीपुरम मध्ये बघण्यासारख्या, ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा इतरही जागा आहेत त्या पाहता आल्या नाहीत. ह्या जागा पाहण्यासाठी, आणि ह्या ट्रीपमध्ये पाहिलेल्या जागांविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी अजून एकदा पॉँडिचेरी-महाबलीपुरमला भेट द्यायला मला नक्की आवडेल. 
(Photography: Abhijeet)  



5 comments:

  1. Winee and I had done the same trip (but spread over 3 days instead of 2)...parat nakki ja! :)

    ReplyDelete
  2. Ekach number.. Ha driver cha anubhav mhanje farach bhayanak ahe.. "Mala zopaychay" hyala kay artha ahe!

    ReplyDelete
  3. हे हे, ड्रायव्हरचा किस्सा मजेदार सुद्धा आहे आणि भयावह सुद्धा. पण seasonच्या वेळेस ड्रायव्हर लोकांना त्यांचे कार मालक असेच राबवून घेतात. आणि ड्रायव्हरला नाही म्हणता येत नाही. कारण पापी पेट का सवाल है.

    असो, ट्रीपचे वर्णन मस्तच आहे. मी एकदाच महाबलीपुरमला गेलो आहे. पण त्याला सुद्धा बरीच वर्षं झाली.

    सावरकरां बद्दल वाचून खरंच गहीवरून आले. खरंच त्या माणसाने किती केले देशासाठी.

    एकंदर तुमची ट्रीप खूपच eventful झाली.

    ReplyDelete
  4. Khoopach bhari lihila ahes... samudracha varnan aikun mala tikde javasa watat ahe :)

    ReplyDelete
  5. Thanks all for all your comments :)
    @Neha, Bangalore la ya...apan jau :p

    ReplyDelete