Saturday, December 31, 2011

नागरहोळे-कुट्टा-वायनाड ट्रीप


    सध्या कामाची, घरातली  अशी थोडी धावपळ चालू असल्याने डिसेंबर एंडला कितपत सुट्ट्या घेता येतील ह्याची आम्हाला आधी कल्पना येत नव्हती. पण ऑफिसमiध्ये बऱ्याच जणांनी सुट्टी घेतल्याने तिथेही अचानक वर्कलोड कमी झाले आणि घरातली कामेही अनपेक्षितपणे मार्गी लागली. त्यामुळे दोन दिवस तरी सुट्टी घेता येईल असे एकदम लक्षात आले. कुठेतरी मस्त फिरून यावे असे वाटू लागले. लागलीच 'बंगलोरजवळील २७८ पर्यटन स्थळे' (एक्सेल शीट) उघडून जागांचा अभ्यास सुरु झाला. हातात दोनच दिवस आहेत म्हणल्यावर जागा २००-२५० किलोमीटर्सच्या टप्प्यात असणे गरजेचे होते. लिस्ट स्कॅन करता करता नजर नागरहोळे अभयारण्यावर येऊन थांबली. २-४ ब्लॉगपोस्ट्समध्ये नागरहोळेचे चांगले वर्णन दिसले तेव्हा नागरहोळेला जायचे नक्की केले. ख्रिसमसच्या सुट्ट्या चालू आहेत म्हणाल्यावर अभयारण्यातले जंगल लॉजेस आधीच बुक झालेले असणार हे सरळ दिसत होते. त्यामुळे होम स्टे शोधायला सुरवात केली. नागरहोळेजवळच्या कुट्टा गावी चांगले होम स्टेज आहेत अशी माहिती नेटवर मिळाली. कुट्टातील बऱ्याच होम स्टेजना फोन लावले, पण सगळे आधीच बुक्ड होते.शेवटी १-२ ब्लॉग्समध्ये नमूद केलेल्या विमला इस्टेटला फोन केला. तिथे राहण्याची सोय होऊ शकते हे कळले आणि आम्ही "ट्रीप-ए-नागरहोळे" साठी सज्ज झालो.
    आम्ही सकाळी ६.३० च्या सुमारास घरून निघालो. वाटेत कदंबमला मस्त गरमागरम ब्रेकफास्ट केला. तिथून मैसूर, मैसुरहून हुणसूर असा प्रवास झाला. हुणसुरहून कुट्टाला जायला दोन रस्ते आहेत. एक गोनिकोप्पलहून आणि दुसरा नागरहोळेच्या जंगलातून. आम्ही जंगलातून जाणार्या रस्त्याने जायचे ठरवले. ह्या रस्त्यावरून जाताना फार मजा आली. वाटेत मुक्तपणे भटकणार्या हरणांचे आणि शांतपणे गवत खात बसलेल्या एका हत्तीचे दर्शन झाले. नागरहोळेतून बाहेर पडल्यावर २ की.मी.चे अंतर कापल्यावर लगेच विमला इस्टेट लागले.
विमला इस्टेट ही मुळात कॉफीची बाग आहे. इस्टेटचे मालक श्री.पट्टू हे बागेतच घर बांधून राहतात. इस्टेटच्या आवारातच पर्यटकांना राहण्यासाठी खोल्या बांधलेल्या आहेत. आम्हाला दिलेली खोली एकदम मस्त होती. बेडवर अंथरलेली ब्लॅंकेट्स थंड हवेमुळे एकदम टेम्प्टिंग वाटत होती. गॅस गिझर असल्याने २४ तास गरम पाण्याची सोय होती. खोलीत सामान ठेऊन आम्ही कॉफीची बाग पहायला गेलो. कॉफीच्या बागेत फिरण्याचा अनुभव वेगळाच होता. बागेत कॉफीबरोबरच सुपारी, नारळ, पपनस, मिरे, मिरची, इडलिंबू, रामफळ इत्यादीची झाडे होती. पट्टून्नी  घरासमोर अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांची झाडे लावलेली होती. वेगवेगळ्या रंगांच्या जास्वंदी, बोगनवेल, बाल्सम,  गुलाब आणि नावे माहिती नसलेलीही कित्येक झाडे! अंगणात झोपाळे बांधलेले होते. खेळायला बास्केट बॉल, बॅडमिंटन  इत्यादीचीही सोय केलेली होती. थंड हवेत झोपाळ्यावर बसून कोवळ्या सूर्यकिरणांशी मारलेल्या गप्पा वेगळाच आनंद देऊन गेल्या.
कॉफी
काही वेळातच पट्टून्नी जेवणासाठी बोलावले. जेवणात घी राईस, साधा भात, कोशिंबीर, सांभार, रसम, कच्च्या केळ्याची भाजी, पापड, लोणचे, पायसम असा टिपिकल साऊथ इंडिअन मेनू होता. अंगणातच टेबल लावून  जेवायला वाढलेले होते. कोकणाची आठवण आली. गुलाबी थंडी, कोवळे उन्ह आणि गरमा गरम जेवण, आयुष्यात मजा अशी अजून काय पाहिजे? जेवण झाल्यावर उरलेल्या वेळात कोणत्या स्थळांना भेटी देता येतील त्याची पट्टून्कडे चौकशी केली.
    कुट्टा कर्नाटक आणि केरळच्या बॉर्डरवर आहे. काही की.मी. कुट्टापासून काही अंतरावरच केरळमधील वायनाड लागते. त्यामुळे जवळच 'वायनाड अभयारण्य' आणि तिरुनल्लीचे देऊळ अशा दोन पाहण्यासारख्या जागा आहेत. वायनाड अभयारण्यातर्फे जंगल सफारीची सोय केलेली आहे. सकाळी ६ ते ८ आणि दुपारी ३ ते ५ अशा दोन वेळी सफारीसाठी जीप्स मिळतात. ३ वाजता सफारी करायची आणि मग तिरुनल्ली मंदिर पाहून परत यायचे असा प्लान ठरला. 
    २.४५ ला निघालो, १० मिनिटांत वायनाड अभयारण्याला पोचलो. पाहतो तर तिथे सफरीच्या तिकिटासाठी आधीच मोठी रांग लागलेली. रांगेत अर्धा-पाऊण तास उभे राहिल्यावर नंबर आला तेव्हा "तिकिटे संपली" असे उत्तर मिळाले. आणखी चौकशी केली असता लक्षात आले की दुपारच्या वेळेला फक्त २० जीपच सोडल्या जातात. सकाळच्या वेळी मात्र ४० जीप्स असतात ही माहिती कळली तेव्हा दुसऱ्या दिवशी पहाटे उठून रांगेत उभे राहायचे असे ठरवून आम्ही तिथून देवळाकडे प्रस्थान केले.
    तिरुनल्लीचे देऊळ छान आहे असे पट्टून्नी सांगितले होते. देवळाकडे जाणारा रस्ता अतिशय भयंकर होता. धक्के खात खात कसे बसे देवळाच्या पायथ्याशी पोचलो. पायथ्याहून देवळाकडे जायला काही पायऱ्या आहेत.
वर गेलो तर देवळाचे दार बंद दिसले. ५ वाजता देऊळ दर्शनासाठी उघडले जाईल असे कळले. आता देऊळ बंदचे म्हणल्यावर आम्ही आजूबाजूच्या पाट्या वाचायला सुरवात केली. ह्या देवळाला दक्षिण भारतीय लोकांमध्ये धार्मिक दृष्ट्या फार माह्त्त्व आहे असे पाट्या वाचून कळले. देवळाजवळील तीर्थात स्नान केले असता पापनाशन होते असेही वाचनात आले. त्याच्या पुढे देवळात जाताना पाळण्याच्या नियमांची भली मोठी यादीही लिहिलेली होती. हिंदू नसलेल्या माणसांना प्रवेश निषिद्ध होता. पुरुषांनी देवळात शर्ट घालून गेलेले चालणार नाही इत्यादी नियम त्यात होते. "भलताच स्पेशल देव आहे!", मनात विचार आला. अशा स्पेशल देवाला आपल्यासारख्या ऑलमोस्ट नास्तिक माणसाला दर्शन द्यायलाही नकोसे वाटत असावे ह्या विचाराने आम्ही देवळाच्या आत जाऊन त्याला त्रास न द्यायचे ठरवले.
    देवळाच्या दोन बाजूंना पायऱ्या होत्या. एक बाजूने खाली गेलो, थोडे चाललो तरी ती वाट कुठे जात आहे ते न कळल्याने परत आलो. दुसर्या बाजूने गेल्यावर एक हॉटेल दिसले, त्यात देवाच्या भक्तांसाठी स्पेशल प्रसादाची सोय केलेली दिसली. चाफ्याच्या फुलांच्या मंद, मधुर दरवळाने आणि देवळाच्या छपरावर बहरलेल्या, केशरी फुलांनी लगडलेल्या वेलाने मात्र आम्ही रिकाम्या मनाने परत जाणार नाही ह्याची काळजी घेतली. पायऱ्या उतरेस्तोवर अंधार झाला होता. गाडीने होम स्टेला परत आलो.
    पट्टून्नी दिलेल्या गरमागरम कॉफीने संध्याकाळची मस्त सुरवात करून दिली.थंडी जरा जास्तच असल्याने मेंढी कोटाचे डाव खेळून एकावर एक कोट चढवले. साधारण ८ च्या सुमारास पुन्हा खोलीबाहेर पडलो. पाहतो तर सगळीकडे गुडुप्प अंधार होता. खोलीबाहेरचा दिवा तेवढा पाऊलवाट दाखवायचे काम करत होता. आमची खोली ते पट्टून्चे घर अशा फेऱ्या मारायला सुरवात केली. फेऱ्या मारता मारता सहज नजर आकाशाकडे गेली. आकाश इतके सुंदर दिसत होते. शहरातल्या दिव्यांच्या उजेडामुळे , प्रदूषणामुळे आणि भरीत भर म्हणून बंगलोरच्या ढगाळ वातावरणामुळे स्वच्छ , काळेभोर आकाश आणि त्यावरची ताऱ्यांची नक्षी न्याहाळण्याची संधी मिळतच नाही. निसर्गाच्या ह्या अजून एका मोहक रुपाकडे समाधान होईस्तोवर पाहून घेतले.
    ८.४५ च्या सुमारास मध्येच पट्टून्नी जेवणासाठी हाक मारली. जेवण छानच होते. ह्यावेळी त्यांनी पोळी-भाजी-भात वगरे उत्तर भारतीय पद्धतीचा स्वयंपाक केला होता. रात्रीच्या थंडीत अंगणात बसून गरम गरम जेवण जेवताना फार मजा आली. जेऊन खोलीत परत आलो. सकाळपासून प्रेमाने बोलावणाऱ्या ब्लॅंकेट्सना आता मात्र मान द्यायलाच हवा असे ठरवून आम्ही स्वतःला त्यांच्या हवाली करून टाकले.
    सकाळी ५ ला जेव्हा मोबाईलचा अलार्म वाजला तेव्हा मोबाईल फेकून द्यावासा वाटला खरेतर...मस्त थंडी होती, ब्लॅंकेटची ऊब सोडून उठायची अजिबात इच्छा होत नव्हती. पण मग एकदम लक्षात आले की आज जर सफारीची तिकिटे मिळायला हवी असतील तर ६च्या आत काउंटर पोहोचावे लागणार होते. पटापट आवरून तिकिटाची खिडकी गाठली. ह्यावेळी मात्र आमचा अपेक्षाभंग झाला नाही. तिकिटे मिळाली.
    जंगलात फिरण्याचा अनुभव अनोखा होता. जीप्स जाऊन जाऊन एक कच्चा रस्ता तयार झालेला होता. काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूने इतकी घनदाट झाडी वाढलेली होती की पलीकडचे काही दिसत नव्हते. काही ठिकाणी मोकळे मैदान होते, त्यावर बारीकशी हिरवळ वाढलेली होती, झाडांमधून डोकावणारी सूर्यकिरणे हिरवळीवर निरनिराळे रंग भरण्याचे काम करत होती. अगदी परीकथेत वर्णन केल्यासारखे दृष्य साक्षात डोळ्यांसमोर चित्रित झालेले होते. जीपच्या दरवाज्यातून दिसणारी प्रत्येक फ्रेम डोळ्यात साठवून ठेवावी अशी होती. सफरीत कोणते प्राणी दिसले असा प्रश्न विचाराल तर मात्र एकही प्राणी दिसला नाही असा कबुली जवाब द्यावा लागेल. आमचा अगदीच हिरमोड होऊ नये म्हणून असावे बहुधा, काही हरणे, एक साप आणि एक मोर आम्हाला दर्शन देते झाले.
जंगलातील मोहक दृष्य
 सफारी आटोपून खोलीत परत आलो. अंघोळी आटपेस्तोवर पट्टून्नी गरमा गरम कॉफी आणली. कॉफी झाली, सामान आवरले, इतक्यात पट्टून्नी गरमा गरम नाश्ता आणला. नाश्त्यात पुट्टू-चण्याची उसळ, पोहे, केसरी बात (आपल्या भाषेत गोडाचा शिरा) आणि सोबत कॉफी असा मेनू होता.खाता खाता पट्टून्शी त्यांच्या बागेविषयी, कॉफीच्या व्यवसायाविषयी गप्पा झाल्या. त्यांनीही आमची विचारपूस केली. चोपून नाश्ता केल्याने पोटोबा खुश आणि पट्टून्च्या पाहुणचाराने दिल खुश! सुखद आठवणींचा आहेर घेऊन आम्ही विमला इस्टेटला अलविदा केले.
    पुढचे ठिकाण होते इर्पू फॉल्स! इर्पू फॉल्सला पोहोचण्यासाठी गाडी पार्क केल्यानंतर सुमारे अर्धा की.मी. चालत जावे लागते. मग पर्वतीसारख्या पायऱ्या लागतात. पायथ्यापासून येणारा पाण्याचा आवाज सस्पेन्स निर्माण करतो. खूप पायऱ्या चढून गेल्या की धबधबा दिसतो. वाटेत एके ठिकाणी वेगळी वाट धरून ट्रेक पण करता येतो. वेळेअभावी आम्ही ट्रेक केला नाही.
इर्पू फॉल्स
 धबधब्याला पुरेसे पाणी होते. काठाशी उभे राहून दिसणारे दृश्यही फार रमणीय होते. मुख्य म्हणजे दारू पिऊन नाचणारे उघडे पुरुष तिथे नव्हते. त्यामुळे धबधब्याचे पाणी, आवाज ह्यांचा निखळ आनंद घेता आला. धबधब्याचे पाणी प्रचंड गार होते. पाण्यात पाय घालताक्षणीच पायात कळ येत होती.
    पाण्यात पाय सोडून बसलेले असताना पाण्यावर तरंगणारा किडा दिसला. त्याचे नाव मला आठवत नाहीये, पण बारावीच्या फिजिक्सच्या पुस्तकात त्याचा उल्लेख होता. (विकिपीडियावरील माहितीवरून त्याला स्ट्रायडर  म्हणतात असे कळले). हा किडा धबधब्याच्या जोरदार प्रवाहाच्या उलट दिशेला जायचा प्रयत्न करत होता. खूप कष्टाने हात-पाय मारत तो एखाद-दोन से.मी. पुढे जायचा आणि पाण्याच्या जोराने परत तितकाच मागे यायचा. हा प्रकार मी तिथे बसलेली असेस्तोवर चालू होता. ह्या किड्याला नक्की कुठे जायचे होते कोण जाणे? ह्यापद्धतीने तो कुठेच पोहोचण्याची काहीच चिन्हे दिसत नव्हती. पण तरी त्याची धडपड मात्र चालू होती. आपले आयुष्य ह्या किड्यासारखेच असते नाही का?
    धबधब्याच्या पायथ्याशी एक देऊळ आहे. रम्य, शांत, साधे! आत जाऊन छान वाटले. दर्शन घेऊन परतीच्या वाटेला लागलो. कॉफीच्या बागांमधून जाणारा रस्ता छानच दिसत होता. गाडी कुट्टामधून निघून परत नागरहोळे अभयारण्यात शिरली. सफारीत प्राणी न बघायला मिळाल्याने आलेल्या निराशेची तीव्रता नागरहोळेतल्या प्राण्यांनी थोडीफार कमी केली. जाता जाता आम्हाला गवा दिसला, माकडे दिसली आणि पुन्हा अनेक हरणे दिसली.
   पुढचा थांबा होता मैसूर. मैसूरला जेऊन आम्ही वृंदावन गार्डनचा संध्याकाळचा म्युझिकल फाउंटनचा शो पाहिला गेलो. वृंदावन गार्डनमध्ये  खूप जास्त गर्दी होती. एक वेगळा अनुभव म्हणून शो छान वाटला. शो पाहण्यासाठी आत जायला जेवढी फाईट मारावी लागली तेवढीच बाहेर यायलाही लागली.
    आता मात्र आम्ही पुरते दमलो होतो. गाडीत बसलो आणि जे डोळे मिटले ते डायरेक्ट घर आल्यावरच उघडले.दोन दिवसात कॉफीची बाग, चांदण्यांनी भरलेले आकाश, अभयारण्यातले प्राणी, जंगलातील सफारी, धबधबा,  म्युझिकल फाउंटन अशा वैविध्यपूर्ण गोष्टींची सफर घडवून आणणारी अचानक ठरलेली ही ट्रीप आमच्या कायम लक्षात राहील!
(Photography by Abhijeet)

Tuesday, December 13, 2011

उन्हाळा

    पुण्याचा रखरखीत आणि मुंबईचा दमट उन्हाळा सोसल्यावर उन्हाळ्याविषयी मी फार प्रेमाने लिहीन असे काही मला बंगलोरला येण्याआधी वाटले नव्हते. माणसाला कोणत्या गोष्टीची किंमत कधी समजेल काही सांगता येत नाही. गेल्या वर्षी कांद्याचे भाव ६०-७० झाल्यावर आणि अजिबात कांदा न घातलेले जेवण जेवल्यावर जशी कांद्याची किंमत कळली तसे बंगलोरमध्ये आल्यावर मला उन्हाळ्याची किंमत कळली.
उन्हाळा म्हणले की माझ्या डोक्यात आंबा, सरबते, कलिंगडे, द्राक्षे, करवंदे, जांभळे, कैऱ्या, वाळवणे (कुरडया, पापड, लोणची), माठातले पाणी, वाळा, पांढरा कांदा, पिवळ्या फुलांनी लगडलेली टबूबियाची झाडे, थोडे दिवस परीक्षा; मग उन्हाळ्याची सुट्टी आणि दिवसभर मजा (फक्त शाळेत असेपर्यंत) असे वेगवेगळे शब्द येतात. उन्हाळ्याची सुट्टी तर माझ्यासारख्या घोडीला आता कोणी देणार नाही पण बंगलोरमध्ये उरलेल्यापैकीही एकही गोष्टीची मजा उन्हाळ्यात अनुभवता आली नाही.
     उन्हाळा सुरु होऊन बरेच दिवस होत आल्यावर दशेहरी, नीलम, रसपुरी, बदामी अशा नावांचे आंबे बंगलोरमध्ये दिसू लागले. ह्यातला बदामी सोडून कुठलाच आंबा आधी चाखलेला नसल्याने आंब्याकडे बोट दाखवून हा ०.५/१ किलो द्या (हे आंबे किलोवर मिळतात) असे सांगून आंबे घेतले आणि खाल्ले. पण हापूसची सर एकालाही नाही. त्यामुळे पुण्यात असतानासारखी सकाळ-संध्याकाळच्या जेवण्यातली आंब्याच्या रसाची मजा काही इकडे घेता आली नाही. "काळी मैना डोंगरची मैना", "काळे काळे जांभूळ, लय गोड जांभूळ" अशी हाक कानावर आल्याक्षणी पळत पळत जाऊन करवंदे, जांभूळ घरी आणून मिटक्या मारत खाण्यातली गम्मतही इथे घेता आली नाही. कलिंगडांची खरी मजा येते ती उकाड्यात! सरबतांचेही तेच! भयंकर उकडतेय, डोक्यावर पंखा गरागरा फिरतोय, घामाच्या धारा वाहतायत आणि अशात कोणी कलिंगडाच्या फोडी खायला दिल्या, सरबत दिले काय समाधान मिळते! पन्ह्याची, ताज्या-ताज्या उसाच्या रसाची, कोकमाच्या,  लिंबाच्या,  रसनाच्या सरबतांची खरी मजा कडक उन्हाळ्यातच येते. होलसेल मार्केटातून १०० पेप्सिकोल्यांचे पाकीट आणून येता-जाता पेप्सीकोले खाणे हे उन्हाळ्यातच आनंद देऊ शकते. चैत्राच्या हळदी-कुन्कवानिम्मित बनणारे डाळ-पन्हेही उन्हाळ्यातच खायला छान वाटते. बंगलोरला उन्हाळ्यातही उकडतंय अशी परिस्थिती क्वचितच निर्माण होते. वर्षातले १० महिने तर इथे पाऊसच असतो. थंडी-उन्ह-पावसाचा खेळ तर दिवसभर चालू असतो. एकंदरीत बंगलोरचे हवामान चांगले आहे. पण ४ महिने उन्हाळ्याने त्रासलेल्या जिवाला पहिल्या पावसाने मिळणारा आनंद इथे नाही की सततच्या पावसाने  कंटाळलेल्या लोकांना दिवाळीच्या सुमारास अलगद येणाऱ्या थंडीने मिळणारा गारवा नाही. स्वेटर, छत्र्या ह्या वस्तू इथे कधी माळ्यावर जातच नाहीत!
   लहानपणी गच्चीत आईने धान्ये, वाळवणे घातली की त्यांची पक्ष्यांपासून राखण करण्याचे काम माझ्याकडे असायचे. वाळवणे घातली की गच्चीच्या समोरच्या पोर्चमध्ये एखादी सतरंजी पांघरून, सोबत द्राक्षे-दाणे-खाऊचा खुराक घेऊन फास्टर फेणे, टारझन, शरलॉक होम्स वगरे दिवसभर वाचत  बसायची मजा वेगळीच होती. इथे उन्हाळा असा विशेष वेगळा नसल्याने वाळवणे घालण्याचा प्लान करणेच अवघड! भर उन्हात मंडईत जाऊन लिंबे, माठ, पांढरे कांदे, वाळे, रसाची गुऱ्हाळे, शिकेकाई, मसाले ह्यांनी भरलेला बाजार नुसता पाहण्यातली एक मजा होती हे इथे उन्हाळा घालवल्यानंतर कळले.
     गेल्या मार्चमध्ये उकाडा जाणवला तशी मी मोठ्या हौसेने माठ घेऊन आले. पुण्याला गेले असताना माठात घालायला वाळा घेऊन आले. थोडे दिवस माठातले पाणी प्यायले, पण कसले काय! थोड्याच दिवसात पावसाने उन्हाळ्याला पळवून लावले, विशेष उकडेनासे  झाले आणि माठातले पाणी प्यायचे थांबवून नॉर्मल पाणी प्यायला सुरवात करावी लागली.
   थोडक्यात बंगलोरच्या लाईफमध्येही भरपूर (महागड्या?) मजा मिळतात. पण आपल्या देशीच्या ह्या बारीक सारीक माजांची सर त्यांना नाही. पुढच्यावेळी ही सगळी मजा घेण्यासाठी आवर्जून उन्हाळ्यातच पुण्याला जायचे मी ठरवले आहे.

Wednesday, November 16, 2011

बंगलोरचे घरमालक

    तसे बंगलोरमध्ये नव्याने राहू लागलेल्या माणसाला बंगलोरचे लेक, बंगलोरचे लोक, बंगलोरचा आय.टी. व्यवसाय, बंगलोरमधील भ्रष्टाचार, बंगलोरचे ट्राफिक हे आणि ह्यासारख्या असंख्य विषयांवर तासंतास बोलता येईल! इन फॅक्ट, गेल्या वर्षी कधी तरी 'नम्म बंगळूरू' नावाची पोस्ट लिहिली होती त्याच आधारावर बंगलोरचे नवनवीन, वेगळे, मजेदार अनुभव अजून एका पोस्टमध्ये नमूद करून ठेवण्याचा माझा विचारही आहे. पण, बंगलोरमध्ये अशी एक जमात अस्तित्त्वात आहे जिच्याबद्दल लिहायचे तर एक अख्खी पोस्ट लिहिल्याशिवाय तिला योग्य तो न्याय मिळणार नाही म्हणून इतर सगळे सोडून मी लिहायला घेतीये बंगलोरच्या घरमालकांबद्दल! 
    घर शोधायला लागलो तेव्हा घराचे लोकेशन, एरिया, हवा-पाणी-वारा, भाडे इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी बघायच्या इथपर्यंतच ह्या विषयावरचे आमचे ज्ञान सीमित होते. पण ह्या सगळ्यांपेक्षाही घरमालक नावाचा प्राणी निरखून घेणे हे किती महत्त्वाचे आहे हे आमच्या पहिल्या भाड्याच्या घराने आम्हाला शिकवले. ते घर आम्हाला मिळाले होते सुलेखातून. तीन मजली घरात मालक मधल्या मजल्यावर आणि भाड्याने द्यायचे घर त्यावरती अशी रचना होती. घर दाखविले ते घरमालकांच्या मुलाने. त्यानेच त्यावेळी करारातले मुद्दे, राहताना कोणत्या छोट्या-मोठ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे  कल्पना दिली. मुलगा सेन्सिबल वाटला. त्याने सांगितलेल्या गोष्टीही अगदी सहज पाळण्यासारख्या होत्या. घर छान होते, भाडे पटेलसे होते. घरावर शिक्कामोर्तब केले आणि ठरलेल्या तारखेला राहायला गेलो. "घरमालक बाई" हा काय प्रकार असेल ही कल्पना आम्हाला तेव्हा नव्हती.
     घरात गेलो तेव्हा आमच्याकडे १ गादी, १ कॉम्पुटर, १ टी. वी., कपडे, एखादे पाणी पिण्याचे भांडे-वाटी-ताटली एवढेच सामान होते. बाकीचे सामान अजून यायचे होते. पहिल्या फेरीत इंदोरहून पाठवलेले समान आले. दुसर्या फेरीत पुण्याहून. हे समान म्हणजेही मुख्यतः भांडीच होती. थोडेच सामान होते, बाई खुश होती. पहिल्या दिवशी आमच्याकडे भांडी-कुंडी काहीच नाही हे पाहून तिने आम्हाला जेवणही पाठविले.
थोड्या दिवसांनी आम्ही टी. वी. आणि फ्रीज घेतला. बाईने आम्हाला आधी जेऊ घातल्याने म्हणले जाऊन तिला मिठाईतरी देऊ. बाईच्या हाती मिठाई ठेवतो तोच म्हणे 'इथली मिठाई नका खात जाऊ हा! चांगली नसते, तब्येत बिघडेल.' म्हणालो असेल बुवा आला अनुभव एखादवेळी. परत आलो. आपला आनंद दुसर्याला वाटावा म्हणून मिठाई द्यायला गेलेलो आम्ही स्वतःच्या तब्येतीची चिंता करत परत आलो.
     ह्या काळात मी घरीच होते.  जॉब सुरु व्हायचा होता, वेळ असायचा, त्यामुळे कामाला बाई लावली नव्हती. जॉब सुरु व्हायची वेळ आल्यावर बाईची चौकशी कोणाकडे बरे करावी असा विचार केल्यावर साहजिकच मालकीण बाईंना विचारावे हे डोक्यात आले. बाईला विचारले. चौकशी करते म्हणाली पण म्हणे 'इथे मोलकरणी चांगल्या नसतात, हजार हजार रुपये मागतात आणि काहीच करत नाहीत, मलापण अजूनही मनासारखी बाई मिळालेली नाही' इत्यादी पाल्हाळ तिने ऐकविले. दोन दिवसानंतर विचारले असता म्हणाली 'नाहीच मिळाली कोणी!' मग मी समोरच्या दुकानदाराकडे चौकशी करायचे ठरवले. सकाळी विचारले, संध्याकाळी त्याने बाई पाठवली. ६०० रुपयात काम करणारी, चांगली अशी बाई मला मिळाली. सेल्वी माझ्याकडे मी त्या घरी असेपर्यंत काम करत होती. नंतर मी घर सोडताना जेव्हा घर तपासायला ह्या बाईने पोराला पाठवले तेव्हा त्याने घर फारच स्वच्छ ठेवलेले आहे असा रिपोर्ट तिला दिला. त्यानंतर मी २ दिवस गावाला गेले असताना मालकिणीने ह्या बाईला परस्पर गाठून 'पुढे येणाऱ्या भाडेकरूंसाठी काम करशील का?'  असे आम्ही त्या घरात राहत असतानाच विचारून ठेवले. हा एवढा सगळा खटाटोप करण्याचे कारण: तिने तिच्या अविश्वासू स्वभावामुळे आजपर्यंत बाई लावलेली नव्हती, चांगली बाई शोधण्याची तिची इच्छा नव्हती, पण आम्ही शोधलीच आहे, काम चांगले आहे, आपले घरही चांगले राहील आणि पैसे पुढेच्या भाडेकरुच्याच खिशातले जातील म्हणाल्यावर फायदाच आहे म्हणल्यावर माझ्याच घरी काम करणाऱ्या बाईशी माझ्या अपरोक्ष मी गेल्यानंतरचे काम करण्याबद्दल चर्चा करायलाही ह्या बाईला काही वाटले नाही.
     पुढे आम्ही घरी ओव्हन आणला. दुकानात डिलिव्हरी बॉय नसल्याने घराच्या पहिल्या पायरीपासून तिसर्या मजल्यापर्यंत अभिजीत तो अवजड ओव्हन कसा बसा वरती नेत होता. एकतर बंगलोरमध्ये जुन्या घरांचे जिने असतात जेमतेम १.५ फुट रुंदीचे. त्यातून त्या ओव्हनसाठी वाट काढत, ओझे सांभाळत वरती जाणारा  अभिजीत आणि मागून त्याचा तो सगळा गोंधळ पाहून जरा जीव मुठीत धरून जाणारी मी अशी आमची वरात दुसर्या मजल्यावर पोचते तोचर बाईच्या घराचे दार उघडले गेले, बाईने डोके बाहेर काढले, म्हणाली, "ओव्हन आणि गिझर एकत्र चालवू नका हा! वायरिंग उडेल!" आता ह्या क्षणी आमच्या मनातल्या ओव्हन सुखरूप घरी पोचण्याविषयीची काळजी, नवीन ओव्हन घेतल्याचा आनंद इत्यादी भावनांची जागा आपल्या ओव्हनमुळे  ह्या बाईच्या घराचे वायरिंग उडायला नको ह्या नवीन काळजीने घेतली. त्या बाईचे बोलणे असे असायचे की अशी काळजी वाटताना आपण इंजिनियर आहोत, असे ओव्हनमुळे वायरिंग उडत नसते हेही आम्ही क्षणभर विसरून गेलो. 
   ओव्हन घेतल्यानंतर ह्या बाईने अजून एक हिट दिली. विजेचे बिल येईस्तोवर थांबली. ओव्हन घेतल्यावरही ह्यांचे बिल जुन्याएवढेच आले आहे  ही खात्री करून घेतली. बिल तेवढेच आहे ह्याअर्थी  ओव्हनचा वापर फारसा करत नाहीयेत. म्हणजे ह्यांच्या ओव्हनचा घराला काही धोका नाही ह्याची खात्री केली. बिल देताना म्हणाली; "बिलमध्ये फरक झालेला नाहीये तुमच्या ओव्हनमुळे, पण कसंय हल्लीच इलेक्ट्रीकल डिपार्टमेंटने नवे नाटक सुरु केले आहे. लोकांच्या घरी चेकिंग केले जाते. वीज बिल कितीही असो, त्यांनी ठरविलेल्या लिमिटच्या पलीकडे तुमच्याकडे जास्त अप्लायन्सेस असतील तर ते दंड लावतात. " मनात म्हणाले "आवरा हिला! पहिलीतल्या मुलाला जाऊन असले बावळटासारखे काहीतरी सांगितले तरी तोही ऐकून घेणार नाही आजकाल." पण घरमालकीण आहे उगाच कशाला कटकट ओढवून घ्यायची म्हणून आम्ही काही बोललो नाही दुर्लक्ष केले.
     पुढे आमच्याकडे दिवाण आला तेव्हा ह्या बाईने तो घरी आणताना  तिच्या घराला काही इजा तर नाही ना झाली ह्यासाठी शोधमोहीमच हाती घेतली होती. जसजसे समान वाढू लागले तसतसे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस कशी काही उपयोगाची नसतात, घरात फर्निचर वाढले की धूळ होऊन अस्थमा वागरेची भीती कशी वाढते ह्याविषयी अनेकदा ह्या बाईने मला रस्त्यात गाठून लेक्चर दिले. हे सगळे का तर, घरात फर्निचर वाढवले असते आणि नीट काळजी घेतली नसती तर हिचे घर खराब झाले असते. शिवाय अप्लायन्सेस मुळे वायरिंग जाळायची भीती वेगळी. आम्ही आणत असलेले समान हे आमच्या सोयीसाठी नसून तिच्या घराला नुकसान करण्यासाठीच मुद्दाम घेतोय असे तिच्या वागण्यामुळे कोणालाही वाटावे असे ही बाई वागू लागली
    आम्हाला घर आवडत होते. शिवाय इतर काही प्लान्समुळे केवळ बाईच्या कटकटीमुळे शिफ्टिंग वगरेचे कष्ट घेण्याची तेव्हा आमची इच्छा नव्हती म्हणून आम्ही बाईने कितीही बडबड केली तरी दुर्लक्ष करायचे ठरवले. शिवाय आपण स्वच्छ राहतोय, घर नीट ठेवतोय, वीज-पाणी नीट वापरतोय हे पाहून आपोआपच ती बडबड बंद करेल असेही आम्हाला वाटले. पण नाही. घरात राहून ८-१० महिने झाले तरी बाईची बडबड सुरूच.
कपडे वळत घालण्यासाठी बाईने गच्चीवर दोर्या टाकून दिलेल्या होत्या. तिच्या सांगण्यावरून आम्हीही कपडे तिथेच वळत घालत होतो. पण मार्चमध्ये सततचा पाऊस चालू होता (बंगलोरमध्ये कधीही पाऊस पडतो.) म्हणून काही दिवस आम्ही घरातील स्टॅंडवर कपडे वळत घालत होतो. ह्या बाईने महिनाभर निरीक्षण केले की कपडे गच्चीत दिसत नाहीत, त्याअर्थी घरी वाळत घातले जातायत. ती एक दिवस विचारात आली. आम्ही घरी घालतोय म्हणालो असता म्हणे "घरी कपडे वाळत घालायचे नाहीत. भिंतीला ओल येते. बुरशी लागते." आता हे ऐकून मात्र आम्हाला किळस वाटली. माझ्या मते, दुसर्याचे घर म्हणून नाही तरी किमान आपण राहतोय ते घर आणि आपले आरोग्य पाहून तरी माणूस भिंतीला ओल येईल आणि बुरशी येईल असे काही करणार नाही! किती आणि काय काय ऐकून घ्यायचे ह्याची लिमिट झाली होती. आम्ही घरात काय विकत घेतले, फर्निचर काय आहे, अप्लायन्सेस काय आहेत, आम्ही कपडे कुठे वळत घालतो हे सगळे ही बाई पाहणार, का तर घरमालक आहे. महिना दहा हजार भाड्यात हिने आम्हाला विकत घेतलेय असे मला वाटले. आता मात्र मी तिला म्हणाले, "तुम्ही घर चेक करा. काही ओल आलेली नाही. घराला कुठे काहीही नुकसानही झालेले नाही. आम्ही चांगल्या घरातून आलेले आहोत. तुम्ही सारखी असली विचारपूस, सूचना करत असता ते आम्हाला आवडत नाही. घर कसे ठेवायचे ह्याचे संस्कार आमच्यावर आमच्या आई-वडिलांनी केलेत."   बाईला काही बोलता येईना. पाय आपटत ती खाली निघून गेली. आता आपल्याला ह्या घरातून हलावे लागणार ह्याची आम्हालाही कल्पना आली. अपेक्षेनुसार बाईने वन-मंथ नोटीस धरून पुढच्या महिन्यात घर खाली करण्याचे फर्मान काढले. घर सोडण्याच्या दिवशीपर्यंत आणखीही अनेक मजेदार किस्से झाले ज्यांच्याबद्दल लिहावयास घेतले तर अजून एक वेगळी पोस्ट तयार होईल. पण दुसरी घरे शोधताना सापडलेले घरमालक आणखी मनोरंजक गप्पा मारत असल्याने आपण मोर्चा तिकडे वळवू.
     आम्ही घर शोधायला लागलो. ज्येष्ठ महिना चालू होता (हे आम्हाला आम्हाला नव्याने शोधात असलेल्या घरांच्या मालकांमुळेच कळले!!). सुलेखावरून चौकशी करण्यासारखे एक घर दिसले. फोन केला, घराची चौकशी करायची आहे असे म्हणाले. मालक म्हणे "कधी हवे आहे घर तुम्हाला?" म्हणाले "पुढल्या महिन्यात.." तिकडून आवाज आला "हिंदू ना तुम्ही? (आश्चर्याच्या सुरात)." आता हा प्रश्न ऐकून मी गेल्या वाक्यात काहीतरी भयंकर म्हणाले की काय हे आठवू लागले. मालक म्हणे "अहो आषाढ लागतोय पुढच्या महिन्यात." मी म्हणाले "पण आम्हाला पहिले घर सोडायचे असल्याने पुढच्याच महिन्यात शिफ्ट व्हावे लागणार आहे."  "नाही तुम्ही श्रावण लागला की या!" "अरे! ह्यांनापण आवरा!" असे म्हणावेसे वाटले. आम्हाला पुढच्याच महिन्यात घर हवे असल्याने पुढे बोलण्यात अर्थच नव्हता. नंतर २-४ वेळा अनुभव आल्यावर असे लक्षात आले की इथे आषाढ महिना कोणतीही नवी गोष्ट करण्यास शुभ मानला जात नाही. आता बंगलोरमध्ये घराची जाहिरात दिली की घर जास्तीत जास्त एका महिन्यात जातेच इतकी डिमांड आहे. शिवाय घर ज्याला भाड्याने घ्यायचे असते त्याही माणसाच्या हाती एका महिन्यापेक्षा जास्त बफर नसतो. कारण तो एकतर बंगलोरमध्ये नवा तरी असतो किंवा जुने घर सोडायचे असते त्यामुळे वन-मंथ नोटीस पिरीयडमध्ये तो घर शोधत असतो. ह्या हिशोबानुसार आषाढात घर द्यायचे नव्हते तर ह्या लोकांनी जाहिरातीच द्यायला नको होत्या.
     पुढे आणखी एक घर पाहायला गेलो. मी जीन्स मध्ये होते, कपाळाला टिकली नव्हती. अभिजीतनेही फ्रेंच कटसारखी थोडी दाढी ठेवली होती. घराच्या बाहेर मालकाची वाट पाहत उभे होतो. आम्हाला पाहून लांबूनच मालक म्हणे "हिंदू ना?" परत तेच! आम्ही "हो" म्हणालो. "नाही, ह्या बाईंच्या कपाळावर कुंकू नाही, तुमचीही दाढी वाढलेली. मला वाटले की मुसलमान आहात की काय?" परत "आवरा" असे झाले. "आम्ही असेच राहतो" असे म्हणालो, ह्यावर "असू द्या! हरकत नाही!" असे तो म्हणाला. (म्हणजे आता बंगलोरसारख्या शहरातही आम्ही कसे राहतो हेही मालक तपासणार!) "बाकी तुमचे लग्न वगरे खरेच झाले आहे ना? मी लग्नाचे सर्टीफिकेट वगरे चेक करतो बरे का! आजकाल काही सांगता येत नाही. लोक आपले खोटे खोटे नवरा-बायको म्हणून येतात. कसेही राहतात. उद्या माझ्या घरात नवरा बायकोचा खून करून जाईल. मला प्रोब्लेम येईल ना!" आम्ही परत आवक. आता अशी काळजी वाटणे चुकीचे नाही. पण समोर उभी असलेली माणसे कशी दिसतायत, त्यांच्यासमोर काय बोलावे इत्यादी तरी ताळमेळ राखावा. मागितले असते तर दाखवले असते ना सर्टीफिकेट पण त्यासाठी खून इत्यादी इत्यादी बोलायचे म्हणजे जरा फारच झाले नाही का? म्हणजे आधीची मालकीण बाई फक्त तिच्या घरात आम्ही काय नेतोय-आणतोय हे पाहत होती. हा बाबा तर रोज सकाळी संध्याकाळी चेक करेल की आम्ही दोघही जिवंत आहोत ना. ह्या माणसाने पुढे त्याने हे घर कसे बांधले, किती कष्ट आणि विचार त्यामागे आहेत, पूर्वेला पाणी असल्याने इथे राहून यु. एस. ला  जायचा योग कसा येतो, आधी इथे राहून गेलेले लोक कसे सगळे आता यु. एस. ला गेलेत, माझ्या मुलांना मी कसे सगळ्यांसारखे कॉम्पुटरला न घालता वेगळ्या शाखांना घातलेय इत्यादी अनेक गोष्टींवर न विचारताच व्याख्यान दिले. आधीच्या बाईची बडबड ह्याच्यापुढे कमी वाटू लागली. घर खूप छान असून आणि बाकी सगळे पटत असून हा बाबा बडबड करून करून नको जीव करेल ह्या कल्पनेने आम्ही त्या घरावरही फुली लावली.
     ह्या सगळ्या अनुभवांनंतर घराच्या क्रायटेरियामध्ये 'सेन्सिबल घरमालक' हाही नवा मुद्दा आम्ही जोडला. थोड्याच दिवसात अजून एक घर सुलेखावर सापडले. घर पहिले, आवडले. घरमालकाशी बोललो. तोही नशिबाने सेन्सिबल वाटला, साधारण ३०-३५ चा सॉफ्टवेयर इंजिनियर होता. आधीच्या अनुभवावरून आम्हीच त्याला प्रश्न विचारले "घर कसे ठेवावे ह्याबद्दल तुमच्या अपेक्षा काय अपेक्षा आहेत? घर दिल्यावर तुमचा कितपत हस्तक्षेप असेल? " आम्ही विचारलेले हे प्रश्न पाहून तो सेन्सिबल माणूस चाट पडला. "हे लोक असे प्रश्न का विचारतायत?" असे भाव त्याच्या चेहऱ्यावर आले असता आम्ही त्याला आमचा आधीचा अनुभव सांगितला तेव्हा ते सगळे ऐकून तो हसायला लागला. "तुमचेच घर आहे असे समजून तुम्ही माझे घर वापरा, म्हणजे आपोआपच नीट राहील." असे त्याचे उद्गार ऐकून आम्हाला हायसे वाटले. आणि बाकीचे मुद्दे+सेन्सिबल घरमालक असे सगळे क्रायटेरीया पूर्ण झाल्याने आम्ही ह्या घरावर शिक्कामोर्तब केले. आता दर महिन्याला एकदा ऑनलाईन  भाडे भरणे ह्यापलीकडे आमचा घरमालक ह्या प्राण्याशी अजिबात संबंध येत नाही. ह्यासाठी आम्ही परमेश्वराचे आभारी आहोत.
    (पोस्टमध्ये मी जे लिहिले आहे ते माझ्या व्यक्तिगत अनुभवांवर आधारित आहे. बंगलोरमध्ये भाड्याने घर शोधणार्यांना माझ्या अनुभवावरून काही शिकता यावे आणि बाकीच्यांना मजेदार अनुभव वाचायला मिळावे हाच ह्या पोस्टचा हेतू आहे. कोणत्याही भाषा-विभाग-धर्मावरून कोणताही मतभेद करण्याचा ह्यामागे कोणताही हेतू नाही.काही लोकांना चांगले घरामालकही इथे मिळतात. शिवाय पुण्याबाहेरून येणाऱ्या लोकांचे पुण्यातील घरामालकांविषयी असे मत असू शकते ही शक्यताही नाकारता येत नाही आणि त्याबद्दल माझे काहीही म्हणणे नाही (ही टीप पुण्याचा राग येणाऱ्या लोकांसाठी)).

Tuesday, October 4, 2011

दिवाळी आठवणीतली

    पावसाळा संपून हिवाळ्याची सुरुवात होऊ लागलीये. दिवस लवकर मावळायला लागलाय. हवेतला गारवा वाढतोय. हिवाळा हळू हळू आपले अस्तित्त्व जाणवून देतोय. पेपरमध्ये निरनिराळ्या ऑफर्सच्या जाहिराती येऊ लागल्या आहेत. नवरात्र संपत आले आहे, दसरा दोन दिवसांवर आलाय. दिवालीसाठीचा माहोलच जणू हळू हळू तयार होतोय. उणीव आहे फक्त आपल्या भूमीची, आपल्या माणसाची...आपलेपणाची! त्यामुळेच जस-जशी दिवाळी जवळ येत आहे तसतसे लहानपणी साजऱ्या केलेल्या दिवाळीच्या आठवणी मनात गर्दी करतायत.
   दिवाळीच्या दोन-चार दिवस आधीपर्यंत परीक्षा चालू असायची. शेवटचा पेपर बाईंच्या हातात दिल्या क्षणीच "आता दिवाळीची सुट्टी सुरु!" ह्या कल्पनेनेच अंगात एकदम उत्साह यायचा. रिक्षातून घरी जाईपर्यंत सुट्टीत काय काय करायचे ह्याचे प्लान्स तयार व्हायचे. घरी पाऊल टाकल्याक्षणीच आई करत असलेल्या फराळाच्या एखाद्या पदार्थाचा खमंग वास यायचा. आता पंधरा-वीस दिवस तरी दप्तर नावाच्या गोष्टीला हात लावायचा नाहीये असा विचार करत त्याला कपाटात कोंडून टाकताना होणारा आनंद शब्दात वर्णन न करता येण्यासारखा! 
   जेवण खाण झाल्यावर आई परत पुढच्या पदार्थाच्या तयारीला लागलेली असायची. अर्धचंद्राकृती करंजी, गोल लाडू, वेटोळे घालून बसलेल्या सापासारखी चकली, चौकोनी शंकरपाळे आईला करताना पाहून आपणही काहीतरी करून पहावे अशी इच्छा व्हायची. कारटी कधी नव्हे तो काहीतरी मदत करायचे म्हणतीये तर करून घेऊ म्हणून आईही सुरवातीला उत्साहाने मदतीला बसवून घ्यायची. पण पहिल्याच चकली-करंजी-लाडवाची झालेली अवस्था पाहून "एक काम धड करेल तर शपथ... चल जा, मीच करते एकटी" असे म्हणत आई स्वयंपाक घरातून पळवून लावायची. नाही म्हणायला अधून मधून चव घेण्याच्या बहाण्याने स्वयंपाक घरात जाऊन एक-एक करत कितीतरी करंज्या-चकल्या-लाडवांना बघता बघता फस्त केले जायचे.  
   टी. व्ही. वर दिवाळी स्पेशल कार्यक्रमांच्या जाहिराती सारख्या चालू असायच्या. पेपरवाल्या काकांकडे आज कोणता नवीन दिवाळी अंक आला ते पाहण्यासाठी रोज एक चक्कर व्हायची. आमच्यासाठी चंपक, ठक-ठक, प्रबोधन आणि मोठ्यांसाठी साप्ताहिक सकाळ, हेर, धनंजय, नवल, लोकसत्ता असे अनेक फराळाइतकेच खुसखुशीत, खमंग दिवाळी अंक घरात यायचे. चंपक, ठक-ठक मधल्या  वेगवेगळ्या  स्पर्धा फार मनोरंजक असायच्या. पानापानावर कोडी, चित्र रंगवा, चित्रातला फरक ओळख, चित्रातील दिलेल्या अक्षरापासून सुरु होणाऱ्या सगळ्या वस्तूंची नावे लिहा अशा मजेदार खेळांची रेलचेल असायची. प्रबोधनमधल्या स्पर्धा, गोष्टी बुद्धीला चालना देणाऱ्या असत. दर वर्षी वेगळ्या प्रकारचा आकाश-कंदील बनवण्याची कृतीही प्रबोधनमध्ये यायची. आकाश कंदिलाचे साहित्य आणण्यापासून तो तयार होईपर्यंतचा प्रत्येक क्षण उत्साहाने भरलेला असायचा. एवढे सगळे लिहिण्यात किल्ला ही महत्त्वाची गोष्ट बाजूलाच राहिली!
   सकाळ झाली की अंघोळ करून बाहेर पडायचे किल्ला तयार करण्यासाठी. किल्ल्यासाठी दगड-विटा गोळा करून आणायच्या, माती आणायची, पोती गोळा करायची, मावळे-प्राणी विकत आणायचे, वरून पेरायला मोहरी, हळीव घेऊन यायचे, कितीतरी कामे असायची. किल्ला करण्यात इतके दंग होऊन जायचो की तहान-भूक विसरून जायची, चिखलात माखून जायचो. बरेच कष्ट केल्यावर दगडा-मातीचा तो ढीग कसा बसा किल्ल्यासारखा दिसायला लागायचा. मग त्यावर बिया पेरायच्या, रस्ता काढायचा, काच लावून एखादे तळे करायचे. वाघ-सिंह, घागर घेऊन जाणारी बाई, मावळे, तोफा ह्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मांडून, किल्ल्याचे टोक सपाट करून, तिथे पोहोचण्यासाठी थोड्या पायऱ्या करून, शिवाजी महाराजांना तिकडे एकदा बसवले की त्यांना तोरणा सर करून नसेल झाले इतके समाधान आम्हाला व्हायचे. 
   दिवाळीच्या गप्पा फटाक्यांशिवाय पूर्ण होतील कशा? लवंगी, ताज-महाल, लक्ष्मी बॉम्ब, सुतळी बॉम्ब, अनार, भुईचक्र, रॉकेट, फुलबाज्यांचे वेगवेगळे प्रकार दरवर्षी निघत असत. फटाक्यांची खरेदी करण्याची मजा औरच होती. कार्यानुभवात उटणे करायला शिकवल्यापासून दिवाळीसाठी उटणे घरी करायचो.सुगंधी तेल, साबण, छोटे आकाशकंदील, नवे कपडे, मिठाई ह्यांची खरेदी करायला मजा यायचीबाबांना कंपनीतून मिळालेला मिठाईचा बॉक्स ते आल्या आल्या उघडून पहायची केवढी उत्सुकता असायची. 
   दिवाळीची तयारी करता करता आलेला उत्साह दिवाळी सुरु झाली की शिगेला पोहोचायचा. वसू-बारस, धनात्रायोदशीपासूनच फटाके फोडायला सुरवात केली जायची. नरक चतुर्दशीच्या दिवशी लवकर उठून उटणे लावून अंघोळ केली जायची. नवीन कपडे घालायचे. आकाशवाणीवर लागलेला शास्त्रीय गायनाचा, भजन-कीर्तनाचा कार्यक्रम सुरेख वातावरण निर्मिती करायचा. असंख्य पणत्यांनी आसमंत उजळून निघायचा. रांगोळ्या घातल्या जायच्या. मग पोटभर फटाके फोडून घरी आल्यावर फराळाचे ताट तयार करून त्यावर ताव मारायचो. मग टी.व्ही. वरचे कार्यक्रम पाहत, दिवाळी अंक वाचत संध्याकाळ कधी व्हायची तेच कळायचे नाही. मग लक्ष्मी पूजनाची तयारी केली जायची. पणत्या आकाश कंदील लावायचो. लक्ष्मी पूजन झाल्यावर परत फटाके  फराळ व्हायचा. पाडव्याला आई बाबांना ओवाळायची आणि भाऊ-बिजेला मी भावाला. ओवाळणीत छान छान वस्तू मिळायच्या. 
   हे सगळे भूतकाळात लिहायचे कारण म्हणजे शाळेत असतानापर्यंत भरपूर वेळ मिळायचा आणि ह्या सगळ्या गोष्टींची मस्त मजा लुटता यायची. पुढे दहावी-बारावीत दिवाळीनंतर लगेच प्रिलिम्सची गडबड होती. नंतर घर बदलले. लहानपणीचे मित्र-मैत्रिणी दूर गेले. फटके उडवणेही  कमी झाले. तरीही बाकीची मजा चालू होतीच. आय. आय. टी. तल्या पहिल्या सेममध्ये आम्हाला दिवाळीची भेट म्हणून प्रत्येक प्रोफेसरने भरभरून प्रोजेक्ट, असाईन्मेंट्स दिल्या होत्या. इतर डिपार्टमेंट्सचे लोक घरी गेल्याने होस्टेल,  डिपार्टमेंट सुने वाटत होते. रस्त्यावरच्या दिव्यांचाच काय तो उजेड. दिवस रात्र मेहनत करून निम्मी दिवाळी संपवल्यावर कसे बसे घरी जायला निघाले तेव्हा गळा दाटून आला आणि दिवाळीची खरी किंमत कळली. पुढची दोन वर्षे परत घरी जाता आले आणि मजा करता आली. मग बंगलोरला आले.  गेल्या दिवाळीत आधी घरी दिवाळसण, मग इंदोरला घरची दिवाळी साजरी केली. पण ह्यावेळी मी फराळ चव घेण्याच्या बहाण्याने फस्त करणाऱ्यांच्या यादीत नसून फराळ तयार करणाऱ्यांच्या यादीत होते. पण त्यातही वेगळीच, मस्त मजा आली. मुख्य म्हणजे सोबत घरातली माणसे होती. सगळ्यांनी मिळून खूप धमाल केली. ह्या वर्षी बंगलोरमध्येच आहोत, बघू इथे दिवाळी कशी होतेय..
दिवाळीच्या ह्या पोस्टच्या निमित्ताने खूपच आधी तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देऊन ठेवते. ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखाची, आनंदाची, भरभराटीची, आरोग्याची जाओ. तुंबा एन्जॉय माडी! शुभ दीपावली!!

Monday, September 19, 2011

पॉँडिचेरी-महाबलीपुरम ट्रीप

पॉँडिचेरीला जायचे आमचे तसे अचानकच ठरले. एका मित्राने "पुढे दोन दिवस सुट्टी आहे तर कुठे फिरायला जायचे का?" असे विचारले. "जायला हरकत नाही पण कुठे जायचे? आणि पुढे लॉंग वीकेंड असताना राहण्याची आणि फिरायला गाडीची सोय होईल का?" हे प्रश्न अगदी ओघानेच आले. "पाहू..झाली सोय तर जाऊ... पटापट ठिकाणे सुचव बरे.."- मित्र म्हणाला. दुसऱ्या दिवशीच निघायचे असल्याने ह्यावेळी वेगवेगळ्या जागांचा नेटवरून अभ्यास करून ठिकाण निवडत बसण्याइतका वेळ नव्हता.
"कशाप्रकारच्या ठिकाणी जायचेय? हिल-स्टेशन, समुद्र-किनारा, ..?" 
"मम... समुद्र किनार्यावर जाऊ.."
"मग मंगलोर, कोझिकोड, पॉँडिचेरी, ...?" (जी ठिकाणे तोंडाला आली ती सांगितली.)
"पॉँडिचेरी छान आहे म्हणे."
"ठीक आहे! राहण्याची आणि गाडीची सोय होतीये का पाहूया ते नाहीतर दुसरे काहीतरी शोधूया!"
संवाद रॅपिड फायरसारखे झाडले जात होते. नेटवर हॉटेलची शोधाशोध सुरु झाली. एका हॉटेलमध्ये सोय होतीये म्हणल्यावर ड्रायवरची चौकशी करायला सुरवात केली. आधी ओळखीच्या ड्रायवऱ्सशी कॉन्टॅक्ट होत नव्हता.
 बरेच प्रयत्न केल्यावर एक ड्रायवर सापडला.तोवर पाहून ठेवलेल्या हॉटेलच्या रूम्स संपल्या असे कळले. मग परत दुसरे हॉटेल शोधले. तोवर सापडलेला ड्रायवर एंगेज झाला होता. शेवटी एकदा हॉटेल, एकदा ड्रायवर, एकदा हॉटेल, एकदा ड्रायवर असे हो, नाही, हो, नाही होत संध्याकाळी ७ वाजता दोन्ही गोष्टी फायनलाईझ झाल्या. रात्री १० ला निघायचे ठरले होते. प्रवासाची तयारी, जेवण-खाण वगरे पटापट आवरले आणि गाडीत बसलो. आम्ही एकूण ३ जोडपी होतो. हसत-खेळत गप्पा मारत प्रवास सुरु झाला. पाहता पाहता तमिळनाडूची बॉर्डर आली. तिकडे टोल आणि इतर कामे करायला ड्रायवर गाडीतून उतरला. परत येऊन म्हणे "तिथे कंप्यूटरमध्ये काहीतरी बिघाड आहे, अर्धा तास लागेल दुरुस्त व्हायला,  तोवर मी झोपतो",  अन सरळ झोपून गेला. "असेल बुवा खरच" असा विचार करून महाशय उठेस्तोवर आम्ही जवळच्या टपरीवरुन  गरमा गरम चहा घेतला, थोडा टाईमपास केला. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, महाशय उठायची चिन्हे दिसेनात. अजून ५ मिनिटे वाट पाहून आम्ही उठवले तेव्हा २ मिनिटांत जावून ते कागद-पत्रे घेऊन आले. प्रवास परत सुरु झाला. २-३ तास झाले तशी ड्रायवर साहेब म्हणाले की ते २ दिवस झोपलेले नाहीत तेव्हा गाडी चालवणे त्यांना जमत नाहीये आणि ते अर्धा तास झोप घेऊ इच्छितात. आता आम्ही काय म्हणणार ह्यावर! झोपच येतीये म्हणल्यावर काय करणार. तशा अवस्थेत त्याने गाडी चालवणे आमच्या दृष्टीने धोकादायक होते. "झोप" म्हणालो आणि परत टाईमपास करत बसलो. अर्धा तास झाला- एक तास झाला महाराज उठायची चिन्हे दिसेनात तेव्हा बऱ्याच प्रयत्नांनी आम्ही त्याला उठवले. प्रवास परत सुरु झाला (असे वाटले). रस्त्याची परिस्थिती फार वाईट होती. अगदी डोके जागेवर असणाऱ्या माणसालाही गाडी चालवणे अवघड होते. ड्रायवर महाशय झोपेच्या नशेत! गाडी ५ मिनिटे चालली नसेल तो परत मध्येच थांबवत म्हणाले "नाही नाही...मला जमत नाहीये आत्ता गाडी चालवायला, मी झोपतो..."  आणि झोपले . पुढचे २ तास ड्रायवर झोपलेला आणि आम्ही अधून मधून डुलक्या खातोय, कसे बसे जागे राहण्याचा प्रयत्न करतोय अशा अवस्थेत गेले. हे रामायण घडता घडताच सकाळचे ५ वाजले. ५ वाजता मात्र ड्रायवरला परत उठवले. म्हणाला मला अजूनही झोप येतीये. आता मात्र आम्ही चिडलो. त्याला जाऊन तोंडावर पाणी मारून, चहा पिऊन यायला सांगितले आणि आम्हाला लवकर पॉँडिचेरीला पोहोचवायची धमकी दिली. ड्रायवर फ्रेश होऊन आल्यावर आमचा प्रवास परत सुरु झाला. ८.३०-९ च्या सुमारास आम्ही पॉँडिचेरीला पोहोचलो. हॉटेलवर जाऊन आवरले, नाश्ता केला आणि आता फिरायला जाणार एवढ्यात ड्रायवर साहेब गायब असल्याचे दिसले! फोनच उचलेनात. महत्कष्टांनी त्यांना शोधून काढल्यावर शेवटी आम्ही फिरायला निघालो. 
सगळ्यात आधी आम्ही गेलो Chunnambar Boat House ला. बोट हाउसहून बॅकवॉटरचे मनोरम दृष्य नजरेस पडते. निळे आकाश, हिरवीगार झाडे अन निळेशार पाणी...डोळ्यांना मेजवानीच.
 बोट हाउसला वॉटर स्पोर्टस, खाणे-पिणे, खेळणे ह्यांची सोय आहे. बॅकवॉटरमधून बोटीने पॅराडाईझ बीचला जाता येते. बोटीतून जाताना चारीही दिशांना छान दृश्य दिसते. बोट हाउसहून किनार्यावर पोहोचायला साधारण अर्धा तास लागतो. समुद्र किनारा फारच छान , स्वच्छ आहे. आम्ही बराच वेळ समुद्रात खेळलो. परत नावेत बसून बोट हाउसला आलो.
        संध्याकाळ झाली होती. ऑरोबिंदाश्रमात जाऊन आलो. जवळच समुद्र होता. समुद्र पाहून मला मरीन ड्राईव्हची आठवण झाली. रस्ता, त्याला जोडून फुटपाथ, मग दगडांनी भरलेला किनारा अन अथांग समुद्र. फरक एवढाच की मरीन ड्राईव्हचा किनारा उंचच उंच इमारती, दिव्यांचा झगमगाट ह्यांना मिरवणारा, दिमाखदार तर इथला समुद्र साधा तरीही सुंदर! 
 अंधार पडू लागला तशी हॉटेलवर परत आलो ,जेवलो, दुसर्या दिवशीचे प्लानिंग केले आणि झोपून गेलो.
 तशा पॉँडिचेरीमध्ये पाहण्यासारख्या ऑरोविले, म्युझिअम, बोटॅनिकल गार्डन, काही मंदिरे इत्यादी बऱ्याच जागा आहेत. पण पॉँडिचेरीहून सुमारे ८० की.मी. वर असणारे महाबलीपुरमही छान आहे असे ऐकलेले होते. त्यामुळे दुसर्या दिवशी महाबलीपुरमला जायचे ठरवले. सकाळी ८ ला हॉटेल सोडले. पॉँडिचेरी ते महाबलीपुरम रस्ता फार सुंदर होता. अधून-मधून दिसणारी समुद्राची खाडी फारच सुंदर दिसत होती. दिल चाहता है, कैसी है ये ऋत की जिस मी, देखा ना हाय रे सोचा ना इत्यादी टिपिकल  पिकनिक मूडची गाणी म्हणत म्हणत महाबलीपुरमला कधी पोचलो तेच कळले नाही. 
महाबलीपुरम हा एक awesome अनुभव होता. आमची गाडी आधी थांबली ती लेण्यांजवळ. ह्या लेण्या बऱ्याच मोठ्या परिसरात पसरलेल्या आहेत. 

लेण्यांमध्ये वेगवेगळे ऐतिहासिक प्रसंग चितारलेले आहेत. सुरेख असे कोरीव काम मन मोहून टाकते.

लेण्यांच्या बाजूने समुद्राचे मोहक दर्शन घडते. थोडे पुढे जाऊन लाईट-हाउस लागते.  

 लाईट-हाउसच्या पायथ्याहून दिसणारे दृष्य अप्रतिम होते. त्या दिवशी तरी लाईट-हाउसवरती जाऊ देत नव्हते.पण पायथ्याहूनच दिसणारा देखावा इतका छान होता की वरून तर फार फार अप्रतिम दृष्य दिसत असावे एवढे नक्की!

लेण्यांहून निघून पुढे आम्ही समुद्र किनार्यावर गेलो...समुद्राच्या काठी सुंदर असे देऊळ आहे. समुद्राच्या पार्श्वभूमीवर छोटेसे दगडी देऊळ, त्याच्याभोवती नक्षीदार दगडी कुंपण हा एक वेगळा अनुभव होता.
त्या दिवशीसमुद्रात खेळायची इच्छा नाही झाली. दूरवर नजर टाकावी तिथे निळे पाणी, पाण्यातून अलगद डोके वर काढलेले निळे आकाश, समुद्राच्या सामर्थ्याची झलक देणाऱ्या, गरजत येणाऱ्या उसळत्या लाटा. लाटांकडे पाहून पांढऱ्या शुभ्र, तगड्या घोड्यांची फौजच कोणावर चाल करून जात आहे की काय असे वाटत होते. निसर्गाच्या ह्या आगळ्या-वेगळ्या अवताराला निरखत न्याहाळत हळू हळू किनार्यावरून चालायला सुरवात केली. गर्दीपासून दूर अशा ठिकाणी जाऊन बसलो. तपकिरी रेती, शंख-शिंपले, आपापल्या उद्योगात मग्न असलेले खेकडे, त्यांच्या चालण्याने रेतीवर तयार झालेली नक्षी, दूरवर दिसणारी हळू हळू ठिपक्यात परिवर्तीत झालेली एखादी नाव, समुद्राकडे पाहून जोर-जोरात ओरडत बसलेला कावळा, किती गोष्टी होत्या रमून जाण्यासारख्या. एका खेकड्याला च्या मागे मागे नजर परत समुद्रावर गेली. समुद्राच्या लाटांकडे पाहताना सावरकरांच्या 'सागरास' मधल्या ओळी हळू हळू नजरेतून मनात उतरू लागल्या.  
भू मातेच्या चरणतला तुज धूता मी नित्य पाहिला होता...
ह्या फेनमिषे हससि निर्दया कैसा का वचन भंगिसी ऐसा...
त्या लाटांच्या हालचालींना, त्यांवर येणाऱ्या फेसाला सावरकरांनी किती वेगळा अर्थ दिलाय.
'सागरास' मधील प्रत्येक ओळ त्यादिवशी समुद्रकिनार्यावर बसून मी अनुभवली. डोळ्यांतून पाणी आले. केवढे हे देशप्रेम, स्वदेशी परत जाण्याची केवढी ही तळमळ, आणि ती व्यक्त करण्याचा किती प्रभावी प्रयत्न. इंग्रजांविरुद्ध कडवी झुंज देणाऱ्या, अंदमानच्या तुरुंगात काळ्या-पाण्याच्या शिक्षेला निडरपणाने सामोर्या जाणार्या ह्या वीराचे तेच कणखर मन मातृभूमीच्या विरहाने  एवढे हळवे झालेले दिसते. सावरकरांच्या चतुरस्र व्यक्तिमत्त्वाबद्दल वाटणारे आश्चर्य, आदर मनात मावत नव्हता. विचार इथेच थांबले असते तर बरे झाले असते. पण देशासाठी संपूर्ण आयुष्याचे बलिदान देणाऱ्या ह्या माणसाची भारत मातेने काय किंमत केली ह्या विचारांनी मन खिन्न झाले. 
समुद्राहून निघून, जेवून चारच्या सुमारास महाबलीपुरम सोडले. भेंड्यांचा कार्यक्रम सुरु झाला. ३-४ तास सलग भेंड्या खेळत होतो. हसत-खेळत मजेत प्रवास चालला होता. १० च्या सुमारास गाडी धक्के खात खात रस्त्यात थांबली. गाडीतले पेट्रोल संपल्याची घोषणा ड्रायवर महाशयांनी  केली. कमाल माणूस होता तो! प्रवासात पेट्रोल पूर्णपणे संपून गाडी थांबेपर्यंत ह्या ड्रायवरला कळलेच नाही ही कल्पनाच मोठी आश्चर्यकारक होती! ड्रायवर महाशय गाडीतून उतरले. पुढे जाऊन पंप मारून थोडे पेट्रोल चढवले. गाडी २ मिनिटे चालून परत थांबली. जवळ पास एक चिटपाखरुही दिसत नव्हते. परत पंप मारला, परत गाडी थोडी पुढे जाऊन कुरकुरत थांबली असे ४-५ वेळा झाल्यावर शेवटी एक पेट्रोल पंप दिसला आणि आम्हाला हुश्श वाटले. कॅनमधून थोडेसे पेट्रोल आणून गाडीत भरले. समाधानाचा निश्वास टाकत गाडी पुढे निघाली. ह्या सगळ्या गोंधळात जेवण झालेच नव्हते. पुढे एक छोटे शहर लागले. जेवणासाठी हॉटेल मिळते का पाहू लागलो. खूप शोधल्यावर एक हॉटेल मिळाले. तिथे जे काही उरले-सुरलेले मिळाले ते जेवलो. पेट्रोल भरले. गाडीचे पोट भरल्यावर गाडीला तरतरी आली आणि ती सुसाट निघाली. आमच्या पोटोबाची पूजा झाल्याने आम्हाला पेंग यायला लागली. कसे-बसे डोळे उघडे ठेवत, जागे राहण्याचा प्रयत्न करत आणखी काही वेळ गेला आणि अजून काही आश्चर्यकारक घटना न घडता आम्ही बंगलोरला आलो. 
ही ट्रीप आत्तापर्यंतच्या ट्रिप्स मधली सगळ्यात कमी प्लानिंग केलेली अशी ट्रीप होती. मजा आली, पण पॉँडिचेरी, महाबलीपुरम मध्ये बघण्यासारख्या, ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा इतरही जागा आहेत त्या पाहता आल्या नाहीत. ह्या जागा पाहण्यासाठी, आणि ह्या ट्रीपमध्ये पाहिलेल्या जागांविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी अजून एकदा पॉँडिचेरी-महाबलीपुरमला भेट द्यायला मला नक्की आवडेल. 
(Photography: Abhijeet)  



Sunday, June 12, 2011

शांत, सुंदर कूर्ग



कूर्गची तारीफ लोकांकडून पुष्कळदा ऐकली होती. २-३ वेळा जायचे बर्यापैकी नक्कीही केले होते. पण काही ना काही कारणाने दरवेळी कुर्गची ट्रीप रद्द होत होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत अभिजीतचे आई-बाबा यायचे ठरले. आता मात्र नक्की जायचेच असे ठरवले. मॅजेस्टिक, बंगलोरहून कुर्गला बऱ्याच गाड्या असतात असे कळले. संदीपकडून 'अपना घर' ह्या होमे-स्टेची माहिती मिळाली होती. लगोलग बुकिंग्स करून टाकली.
शुक्रवारी रात्री ११च्या गाडीने कुर्गला निघालो. तिथे पहाटे ४.३० ला पोहोचलो. होमे-स्टेतर्फेच बस-स्टॅंडहून कॉम्प्लिमेंटरी पिक-अप, ड्रॉपची सोय होती. होमे-स्टेचा मालक रशीन ह्याला फोन लावला. १५ मिनिटात तो घ्यायला आला. होमे-स्टेवर जावून थोडा आराम केला. रशीननेच साईट-सीइंगसाठी गाडीची सोय आणि प्लानिंग करून दिले. नाश्त्याला गरमा-गरम पुट्टू, सांभार आणि कॉफी असा बेत होता. पुट्टू आम्ही वायनाड ट्रीपमध्येही खाल्ले होते. तांदळाचा हा पदार्थ सांभारसोबत भारी लागतो.


कॉफीही मस्तच होती. पोटोबाची पूजा सकाळी सकाळी आटोपल्यावर फिरायला बाहेर पडलो.
पहिली जागा होती Bhagamandala (मला इथल्या जागांच्या नावांचे उच्चार कधीच समजत नाहीत, त्यामुळे इंग्लीशमधूनच लिहिते). इथे कावेरी, सुज्योती आणि कनिके ह्या नद्यांचा संगम होतो. शिवाय इथे Bhagundeshwara Kshetra हे मंदिरही आहे. मंदिराच्या आवारात मुख्य देवळासोबत इतर छोटी छोटी ५-६ देवळे आहेत. देउळ दगडी आहे. आजूबाजूचा निसर्गही रम्य आहे. थोडा वेळ तिथे घालवून पुढे निघालो.


पुढचे ठिकाण होते तलकावेरी. ब्रह्मगिरी पर्वतात वसलेले असे हे ठिकाण. इथे कावेरी नदी उगम पावते. छोट्या झर्याच्या रुपात इथे जन्मास आलेली कावेरी लगेचच भूमिगत होऊन काही अंतरावर आपल्या डौलदार रुपात पुन्हा प्रकटते. ह्या जागेला विशेष धार्मिक   महत्त्व आहे. शंकराचे आणि गणपतीचे देउळ आहे. देवळाच्या बाजूने ब्रह्मगिरी पर्वताचे मोहक सौष्टव नजरेस येते. डावीकडे दरी. हिरव्यागार झाडांनी नटलेली, धुक्याची शाल ल्यालेली.


कितीतरी वेळ ह्या सौंदर्याला डोळ्यात साठवत राहिलो. पुढे सुमारे ४०० पायऱ्या वरती जाताना दिसल्या. एक-एक पायरी चढत जेव्हा वरती पोहोचलो तेव्हा एका क्षणात अंगाला आलेला क्षीण नाहीसा झाला. आम्ही ब्रह्मगिरीच्या शिखरावर होतो. चारीही दिशांनी दरी...पायथ्याच्या गावांचे मनोरम दृश्य. छोटी घरे, शेते...पलीकडे आणखी काही पर्वत. हिरवीगार जमीन. एके ठिकाणी पर्वताच्या सावलीने लीफ ग्रीन कलरचा पॅच निर्माण झाला  होता. सूर्याच्या किरणांमुळे त्याच्या मधोमध लिरील ग्रीन कलरचा आणखी एक पॅच तयार झाला होता. फारच सुरेख दृश्य होते ते. ढगात बसलोय की काय असे वाटत होते. 


काही वेळ तिथे घालवून खाली आलो. गरमा-गरम चहा प्यायला आणि पुढच्या प्रवासाला निघालो.  
पुढची जागा होती Abbi Falls. ह्या धबधब्याकडे जाणारा रस्ता एका खासगी कॉफीच्या प्लांटेशनमधून जातो. पायऱ्या उतरत खाली जाताना  आपल्या डोळ्यांना काय आनंद मिळणार आहे ह्याची पूर्ण कल्पना येत नाही. धबधबा जसा जसा जवळ येतो तसा तसा आपल्या आवाजाने आपले अस्तित्त्व जाणवून देऊ लागतो. पहिल्यांदा नजरेस पडतो तो झुलता पूल. ह्या पुलावर उभे राहून धबधब्याचे सौंदर्य न्याहाळत बसण्याचा आनंदच अवर्णनीय. समोर मोठीच्या मोठी खडकाची भिंत न तिच्या टोकावरून कोसळत खाली येणारा धबधबा. मुख्य म्हणजे धबधब्याच्या तिन्ही बाजूंना रेलिंग घातल्याने लोक दारू पिऊन धिंगाणा इथे घालून शकत नाहीत त्यामुळे निसर्गप्रेमींना येथील मनोरम दृश्याचा पुरेपूर आस्वाद घेता येतो. रस्त्यापासून दूर अशा ह्या ठिकाणी धबधब्याचा आवाजही अगदी वेगळ्या प्रकारचा अनुभव देऊन जातो. निसर्ग म्हणत असावा अशी काही काहीच तर ठिकाणे आहेत जिथे मी मोकळेपणाने बोलू शकतो आणि माझे शब्द माणसांपर्यंत पोचू शकतात. खरच हा धबधबा आपल्याशी काहीतरी बोलत आहे असे वाटते. त्याचे रूप डोळ्यात साठवत आणि आवाज कानांमध्ये ऐकत तिथेच बसून राहावे असे वाटले.


थोड्या वेळाने मन भानावर आल्यावर पुढे जायला हवेय ह्याची जाणीव झाली. परत निघालो. वर जावून ताक, तिखट लावलेली कैरी खाल्ल्यावर सिंहगडाची आठवण झाली. नॉस्टॅल्जिक वाटले.   शेवटी ''जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी|". असो. तिथून निघालो आणि 'Raja's Sit' नावाच्या ठिकाणी गेलो. इथे एक बाग होती. बागेतून आणखी आत गेल्यावर दरीचा व्ह्यू होता. थोडावेळ तिथे बसलो. ढगांनी पावसाचे काही थेंब सांडून 'चला घरी जा बरे' असे शांत आवाजात सांगितले. जोरात पाऊस पडून त्यांनी हाकलण्याची आणखी पुढची स्टेप घेण्याआधी आम्हीच तिथून पळ काढला.रूमवर परत आल्यावर रशीनने गरमा-गरम कॉफी दिली. मग आराम करून जेऊन आलो. पत्ते खेळले. झोपून गेलो. 
दुसऱ्या दिवशी सकाळी ८ ला निघायचे होते. नाश्त्यात गरमा-गरम इडली-सांभार-कॉफी होते. त्यावर तव मारून निघालो ते एलिफंट कॅम्पकडे. गाडीतून जाताना जे दृश्य दिसत होते ते अप्रतिम होते. पावसाळी हवा. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरव्यागार बागा कॉफीच्या, नारळाच्या, आंब्याच्या, निलगिरीच्या न आणखीही ना माहिती असलेल्या कसल्या कसल्या झाडांच्या. काही काही बागांमधली झाडे तर इतकी उंच होती की जणू काही त्यांच्यात आभाळाला टेकण्यासाठी शर्यत लागली होती. ह्याच बागांमध्ये क्वचित दिसणाऱ्या केळीच्या झाडांच्या झावळ्याही जमिनीकडे झुकलेल्या नव्हत्या...त्याही ताठ होत्या. असे वाटत होते की जणू ही झाडे हात उंचावून इतर उंच झाडांना म्हणत आहेत की 'आम्हालाही कडेवर घेऊन आभाळाला हात लावू द्या की...' असे रम्य दृष्य पाहता पाहता एलिफंट कॅम्प कधी आले तेच कळले नाही. 
एलिफंट कॅम्प हे एक नदी ओलांडून पलीकडे आहे. ९.३०-११ ह्या वेळामध्ये हत्तींना नदीच्या किनार्याशी आणून त्यांना अंघोळ घालणे, मग त्यांना खाऊ पिऊ घालणे इत्यादी कार्यक्रम केले जातात. २० रुपयात बोटने नदी पार करून हा सगळा कार्यक्रम पाहण्याची सोय फॉरेस्ट डीपार्टमेंटने लोकांना करून दिली आहे. जर हत्तीला अंघोळ घालायची असले किंवा स्वतः खाऊ घालायचे असेल तर आणखी पैसे भरून तिकीट घेता येते. 


बोटने पलीकडे गेलो. हत्तींचे शांतपणे निरीक्षण करता येईल अशी मोक्याची जागा शोधून बसलो. कॅम्पची लोक एकेक करून हत्तींना अंघोळ घालायला आणत होते. हत्तींचे चालणे, वागणे ह्यावरून हत्तींचे वय लक्षात येत होते. सगळ्यात मोठे हत्ती शांतपणे येऊन किनार्यावर पडायचे. त्यांना अंघोळ घातली की माहुताच्या आदेशाप्रमाणे निघून जायचे. थोडे मध्यमवयीन हत्ती स्वतःला वाटले तर सोंडेने अंगावर पाणी घेत होते. एक हत्तीचे पिल्लूही तिथे होते. बाकीच्या हत्तींना साखळदंड बांधलेले होते. हे पिल्लू लहान असल्याने पाहिजे ते करायला मोकळे होते.


 ते आले, पळत पळत पाण्यात शिरले. पाण्यात वेगवेगळ्या हालचाली करून मजा करू लागले. मग त्याचा कंटाळा आल्यावरइतर हत्तींना त्रास देणे त्याने सुरु केले. ह्याला धक्का दे, त्याच्या पायाशी खेळ असे खूप वेळ केल्यावर मात्र माहुताने पाठीवर एक फटका मारला. 'आता आपली जाण्याची वेळ झाली' हे पिल्लाला समजले. नाखुशीनेच आपल्या आईच्या मागे मागे जाऊ लागले. चढ आल्यावर मात्र पिल्लाला काय करावे ते कळेना. तेव्हा पाय गुडघ्यात वाकवून सोंडेचा आधार घेऊन, अडखळत कडे बसे ते चढले. ५ मिनिटांपूर्वीच अंघोळ करून स्वच्छ झालेले पिल्लू परत मळले.


पुढचा कार्यक्रम होता हत्तींच्या नाश्त्याचा. कॅम्पच्या लोकांनी त्यांना भरवायला नाचणीचे गोळे केले होते. २-२ गोळे हे लोक हत्तीच्या तोंडात भरवत होते. एक गोळा लागलीच तोंडात टाकून, न दुसरा गोळा सोंडेत झेलून हत्तींची खादाडी सुरु झाली. पुढे हत्तींची सगळी माहिती तिथल्या माणसांनी दिली. कॅम्पला तशी मजा आली. पण अंकुशाकडे पाहून मला फार वाईट वाटले. हत्तींना वठणीवर आणण्यासाठी माहूत अंकुश आणि पायाचा वापर करतात. पायाने कानावर टोचून टोचून हत्तीला सूचना देतात. अंकुशाच्या काठीने डोक्यावर मारतात. टोकदार अंकुश डोक्याला टोचतात. त्या हत्तींना सारखे तसे करून दिखात नसेल काय? आपल्याला कोणी असे केले असते तर? केवळ बुद्धी कमी म्हणून तो विशालकाय हत्ती माणसाच्या मुठीत राहतो.   
एका माणसाने दुसर्या माणसाला अशा प्रकारे वागवले तर ती गुलामगिरी न माणसाने प्राण्यांना असे वागवले तर त्याला काय म्हणायचे? असे विचार मनात चालू असताना नजर वेधली ती पलीकडच्या सुरेख दृश्याने. मस्त हिरवळ, भरपूर झाडे, त्यांमधली काही गुलमोहोराची होती..हिरवा आणि केशरी रंगांनी रंगून गेली होती.


डोळ्यांना तृप्ती मिळाली. निसर्गाचे हे वैभव डोळ्यात साठवत बोटीने परत पलीकडे गेलो. गाडीत बसलो ते 'निसर्ग धाम' ला जाण्यासाठी.
परत एकदा झुलत्या पुलाने झुलून दाखवून आमचे स्वागत केले. पूल बांधलेला आहे कावेरी नदीवर. नदीच्या पाण्यात बोटिंग करायची सोयही आहे. पूल पार करून आत गेल्यावर आपण बांबूच्या बेटावर आहोत असे वाटते. जिकडे तिकडे बांबूच्या झाडांचे पुंजके. 


आत गेल्या गेल्या एका मोठ्या कुंपण घातलेल्या जागी नांदणारे असंख्य ससे नजर वेधून घेतात. खूप वेगवेगळ्या रंगांचे नि वयाचे ससे आहेत. मी बराच वेळ त्यांचे निरीक्षण करत बसले. पुण्याच्या मांजरांची आठवण झाली. काही ससे झोपले होते. काही बसल्या बसल्या डुलक्या मारत होते तर काही मस्त पाय पसरून, एकमेकांच्या अंगावर लुडकून झोपले होते. 


काही सशांची खादाडी चालली होती. कसली घाई असते ह्या सशांना काय माहित. खातानाही तोंड ते इतके भरभर भरभर हलवत होते की दुखत कसे नाही असे वाटत होते. थोड्या वेळानंतर सशांचा खेळण्याचा कार्यक्रम सुरु झाला. सुरवात झाली ती अशी. एका सशाला अचानक काय वाटले त्याने भराभरा जाऊन दुसर्या सशाच्या अंगावर उडी मारली. खो मिळाल्यासारखा हा ससाही दुसर्या सशाच्या दिशेने पळाला. त्याचा खो मिळताच तिसर्या सशाने हेच केले. ह्या खो-खोचा कंटाळा आल्यावर परत खादाडी आणि झोपेचा प्रोग्राम सुरु झाला.
हे पाहत असतानाच खुराड्यातून अचानक छोटेसे हरणाचे पिल्लू बाहेर आले. बॅम्बीची आठवण झाली त्याला पाहून. थोडावेळ आपला गेस्ट अपिअरन्स देऊन ते परत खुराड्यात जाऊन बसले. 
'स्वीट कॉर्न' चा आस्वाद घेत घेत आत जायला निघालो. वाटेत एके ठिकाणी दिवसभर वन्य प्राण्यांवर आधारित फिल्म्स दाखवण्याची सोय केलेली दिसली. पुढे जाऊन हरणांच्या पिंजर्याला भेट दिली. भरपूर हरणे होती. त्यांचा पिंजराही मोठा होता. गरज लागेल तेव्हा हरणांना विश्रांती घेता यावी म्हणून छान अडोश्याचीही सोय होती. 
तिथेच पुढे हत्तीवर सैर करण्याची सोय होती. पण मला तो प्रकार विशेष आवडला नाही.हत्तींविषयी फारच वाईट वाटले. 


फोटोत दाखवल्याप्रमाणे त्या प्लाटफॉर्मखाली मान घालून आधी हत्तीला उभे करायचे. मग लोक त्यावर बसणार. मग हत्ती ठरलेल्या वाटेवर ५ मिनिटे हिंडवून आणणार. हे दिवसातून अनेक वेळा रिपीट झाल्यावर हत्तीला कंटाळा नसेल येत का? बर वाट फार निमुळती होती. त्यामुळे दोन हत्ती विरुद्ध दिशेने आले की जॅमचा प्रोब्लेम सोडवण्यासाठी परत हत्तींच्या कानाला अंकुश लावून त्यांना वळवले जायचे. कानामागे पायाने टोचून टोचून हत्तीला वाट दाखवली जायची. अंकुश आणि पायाचा सारखा वापर करूनच बहुदा एका हत्तीचा कान अक्षरशः फाटला होता. 
चालत चालत आणखी थोडे पुढे गेल्यावर नदी लागते पुन्हा. निसर्गधाम ही जागा बरीचशी वायनाड च्या 'kuruwa irland' सारखी आहे. तपकिरी रंगाचे पाणी, फारसे वाहते नाही. भोवताली हिरवी झाडे. आकाश दिसताच नाही. गूढ वातावरण एकदम. 


इथे एका माकडाने धुमाकूळ घातला होता. लोकांच्या पिशव्या उचकून त्यातून जर खाण्यासारखा पदार्थ बाहेर आला तर त्याचा फन्ना उडवायचा नाहीतर कपड्यांसारख्या निरुपयोगी वस्तू बाहेर आल्या तर भिरकावून द्यायच्या असा प्रकार चालला होता. २-३ माणसांनी हुसकावून लावायचा प्रयत्न केला असता ह्या माकडाने त्या माणसांच्या अंगावर धावून जायचेही कमी केले नाही. 


काही वेळ पाण्यात पाय सोडून बसलो न निघालो. आतच छोटेसे हॉटेल आहे तिथे जेऊन निसर्गाधामला अलविदा म्हणले.
पुढे गोल्डन टेम्पलला गेलो. दारातून प्रवेश केल्या केल्या स्वच्छ आणि सुंदर असे प्रांगण लागले. प्रांगणातून अजून आत गेल्यावर एक छोटी वाट लागली. दोन्ही बाजूंनी हिरवळ होती. हिरवळीवर वेगवेगळे पक्षी दिसत होते. सतत जाग असलेल्या ह्या ठिकाणीही एका बदकोबांचे मस्त डुलक्या घेणे चालले होते. 


मुख्य मंदिर बंद दिसले. आणखी आत गेले असता "Padmasambhava Buddhist Vihara" नावाची मंदिरासारखीच जागा दिसली. आत गेलो तर एका वेगळ्याच दुनियेत असल्यासारखे वाटले. मोठाच्या मोठा हॉल. समोर बुद्ध देवतांच्या तीन प्रचंड मोठ्या मूर्ती होत्या. हॉलच्या भिंतींवर बौद्ध इतिहासावर आधारित काही चित्र होती. खांबांना आणि छपराला पाच रंगांच्या कापडांच्या झालरींनी सजवलेले होते.


त्या मूर्ती, सजावट आणि शांतता ह्यांमुळे नकळतच जमिनीवर बसून ध्यानमग्न व्हावे अशी इच्छा झाली. ५ मिनिटे डोळे मिटून बसल्यावर शांतीचा अनुभव आला. डोळे उघडवेसेच वाटेना. काही वेळानी बळेच डोळे उघडले. शांतपणे मंदिराबाहेर पावले टाकली. प्रांगणाच्या बाहेर पावले टाकू इतक्यात मुसळधार पाऊस आला. पळत पळत एका हॉटेलात जाऊन बसलो. गरमागरम चहाने रंगत वाढवली. कसे बसे गाडीत बसलो आणि होम-स्टे वर पळालो. 

रशीनने परत गरमागरम कॉफी आणून दिली. कॉफीचा आस्वाद घेत घेत पत्ते खेळलो. होम-स्टेतच गॅस आणि भांड्यांची सोय असल्याने तिथेच सूप, नूडल्स, सॅन्डविचेस तयार करून त्याचा फन्ना उडवला. परत पत्ते खेळलो. अभिजीतच्या आई-बाबांच्या लग्नाचा वाढदिवस होता दुसर्या दिवशी. रात्री १२ ला केक कापून त्यांना सरप्राईझ द्यायचे ठरवले होते. रशीनला सांगून केक मागवून ठेवला होता. पत्ते खेळता खेळता ११.३० वाजले सगळ्यांना झोप आली होती. सगळे आपापल्या रूम्सवर गेलो. मधल्या काळात केक आणि ग्रीटिंग कार्ड काढून ठेवले. १२ वाजता जाऊन आई-बाबांचे दर वाजवले. घाबरतच त्यांनी दर उघडले. अशा नवीन ठिकाणी केकचे सरप्राईझ मिळण्याची त्यांची पहिलीच वेळ होती. एकदम खुश झाले. थोड्या वेळ गप्पा मारून झोपलो. 
दुसर्या दिवशी नाश्त्यात रशीनने उपमा दिला होता. त्यावर तव मारून झाल्यावर रशीनने स्टेशनवर सोडले. गाडी वेळेवर आली. गाडी निघाली आणि पुन्हा सुंदर रस्त्यावरून पळायला लागली. पण २-३ दिवसांच्या धावपळीमुळे आता मात्र डोळे मिटू लागले. स्वप्नातही नारळाच्या बागा येऊ लागल्या. गाडी बंगलोरला आल्यावर मात्र जाग आली. आधी भराभर अंतर कापणारी गाडी आता मात्र गोगलगायीच्या वेगाने चालू लागली. कसे बसे मॅजेस्टिक आले. तिथून पकडलेली घरासाठीची बस जॅममधून वाट काढत काढत कशीबशी स्टेशनच्या दाराशी पोचेस्तोवर बंद पडली. परत आतपर्यंत चालत जाऊन दुसरी बस पकडली. पुन्हा तिकीट काढावे लागले. ट्रीपच्या शेवटी  मनस्तापाचा काळा तीट लागल्याने इतक्या सुरेख झालेल्या ट्रीपला आपलीच नजर लागायची भीती गेली. घरी येऊन खिचडी करून खाल्ली आणि झोपून गेलो. 
२-३ दिवसांची ही ट्रीप इतकी रेफ्रेशिंग होती की तिने पुढले अनेक दिवस बंगलोरमधल्या धावपळीला तोंड देण्यासाठीचे इंधन पुरवले....
(Photos By: Abhijeet and Me)

Friday, May 20, 2011

७०-८० च्या दशकातील निवडक हिंदी गाणी

    दररोजप्रमाणे सकाळी घरात धावपळ करून ऑफिसमध्ये आले. सवयीनुसार फेसबुक उघडले. कलीगशी डिस्कशन केल्याशिवाय काम पुढे जाणार नव्हते आणि तो आला नव्हता. त्यामुळे हातात रिकामा वेळ होता. फेसबुकवर रेंगाळायाला सुरवात झाली. रेंगाळणे हे क्रियापद वापरायचे कारण म्हणजे कोणताही माणूस काही विशेष उद्देशाने फेसबुक उघडत असेल असे मला नाही वाटत. कोणाची वाट पाहत असू किंवा एखाद्या शोला भरपूर वेळ उरला असेल तर जसे आपण जवळपासच्या रस्त्यावर रेंगाळत बसतो तसेच फेसबुकचे मला वाटते. रेंगाळताना कोणी भेटले, किंवा काही आवडीचे सापडले तर ठीकच नाहीतर हात-पाय हलवण्याची खरोखर वेळ यायची वाट पाहत इकडे तिकडे बघत बसायचे नुसते. असो असेच रेंगाळत असताना मला 'कहाँ से आए बदरा' ह्या गाण्याची लिंक मिळाली. फेसबुकवर रेंगाळणे बंद होवून एक से एक सुंदर अशा गाण्यांच्या दुनियेकडे पावले वळली. अर्थात ह्याही प्रवासात यु-ट्यूबची साथ मिळाली. यू-ट्यूबवर येत जाणार्या सजेशन्समुळे सध्या चालू असलेल्या गाण्याच्या ढंगाची गाणी एका पाठोपाठ एक मिळत गेली न कलीग येईस्तोवारचा वेळ तर एकदम मस्त गेलाच, मूड फ्रेश झाला आणि शिवाय नंतरही कामे करताना मध्ये ब्रेक घेतले त्यात छान छान गाणी ऐकायला मिळाली. प्ले केलेले प्रत्येक गाणे हे माझ्या इतके आवडीचे होते की मी लिस्ट करत गेले आणि एक छोटीशी  गाण्यांची प्ले-लिस्ट तयार झाली. ती अशी:

कहाँ से आए बदरा (चश्म-ए-बद्दूर)
तू जो मेरे सुर में (चितचोर)
ना जाने क्यों, होता है यूँ जिंदगी के साथ (छोटीसी बात)
रिम-झिम गिरे सावन (मंज़िल)
तेरे बिना जिया जाये ना (घर)
तुम्हे हो ना हो (घरोंदा)
दो दीवाने शहर में (घरोंदा)
गोरी तेरा गांव बड़ा प्यारा (चितचोर)
आने वाला पल (गोलमाल)
उठे सबके कदम (बातों बातों में)
थोडा है थोड़े की ज़रूरत है (खट्टा मीठा)
ना बोले तुम ना मैंने कुछ कहा (बातों बातों में)
कहते सुनते बातों बातों में प्यार हो जायेगा (बातों बातों में)

लिस्ट हरवून जायला नको म्हणून ब्लॉगवर लिहून ठेवायचे ठरवले. ज्यांना ही गाणी आवडत असतील त्यांनी एखादे गाणे यु-ट्यूबवर लावले की पुढची गाणी आपोआप मिळत जातील.
ह्या सगळ्या गाण्यांमध्ये मला आवडते अशी गोष्ट ही की ती गाणी खूप साधी-सरळ आहेत. अर्थात नीट पाहायला गेले तर ती म्हणायला कठीण आहेत. पण त्यांचे शब्द असे आहेत की आपल्या दैनंदिन जीवनातील विचार-घटनाच ते कथन करत आहेत की काय असे वाटते. पिक्चरायझेषन पहिले तर आपल्यासारखीच मध्यमवर्गीय माणसे आपण घालू शकतो त्या पोशाखात आणि आपण करू शकतो अशा आचारात समोर वावरताना दिसतात. संगीतात कुठेही लाउडनेस नाही. त्यामुळे ही गाणी ऐकताना त्यांच्याबरोबर समरस झाल्याचा प्रत्यय मला येतो.
     ह्या गाण्यांच्या चित्रपटांपैकी घर सोडून इतर सिनेमे माझे अनेकदा पाहून झालेत. ह्या गाण्यांसारखेच हे सिनेमेही मला खूप आवडतात. ज्यांना ही गाणी आवडली असतील पण सिनेमे पाहिले नसतील त्यांनी जरूर पहा.
    प्रत्येकाची आवड-निवड वेगळी, पार्श्वभूमी वेगळी, गाणी ऐकण्यामागचा हेतूही वेगवेगळा...त्यामुळे ह्या लिस्टमध्ये विशेष काय आहे असे वाटून काही लोकांना पोस्ट वाचून कंटाळाही आला असेल. त्यांना सॉरी. @बाकीचे पब्लिक: एन्जॉय!!

Friday, April 15, 2011

आजीचे घर

   परवा आजोबांकडे गेले होते. खूप वर्षांनी गेले. ज्या घरात माझे सगळे बालपण गेले त्या घरात कॉलेज, आय. आय. टी. अन मग लग्न ह्या गोष्टींमुळे कित्येक वर्षात पाऊलच ठेवता आले नव्हते. नानांना खूप आनंद झाला होता मी गेल्यामुळे... पण मी मात्र जुन्या आठवणींनी घायाळ झाले..
    हेच घर..नाना-आजी रिटायर व्हायला आल्यावर त्यांनी हे घर घेतले. आधी भाड्याची अनेक घरे, मग २ खोल्यांचे छोटेसे घर असा प्रवास करत करत पेशाने शिक्षक असलेले नाना-आजी आज रिटायर झाल्यावर स्वतःच्या सुटसुटीत अशा तीन खोल्यांच्या घरात आले. मुळातच आहे त्यात मजेत राहण्याचा स्वभाव असलेल्या आजीने आता रिटायर होणार म्हणल्यावर तर आणखीच वेगवेगळे प्लान बनवले. घर छान सजवले. संध्याकाळी बाल्कनीत बसून मोकळ्या हवेचा आस्वाद घेण्यासाठी झोपाळा बांधून घेतला. घरात मांजरे पाळली.
    ह्याआधीही आजीकडे काही कमी मजा असायची असे नाही. २ च खोल्यांचे घर होते पण आनंदाने पूर्ण भरलेले. शनिवारी शाळा सुटली की घरी येऊन जेवायचे न कपड्यांचे बोचके बांधून सायकलवर बसून सुसाट वेगाने आजीकडे जायचे. एकदा आजीकडे गेले की काहीही करा, कसेही वागा, कोणी ओरडायला नाही की काही नाही. 
   दुपारी आजोबा सगळ्या दारे-खिडक्या-पडदे बंद करून झोपायला जायचे. त्यांच्या घोरण्याचा आवाज एकदा सुरु झाला की आम्ही आमचे उद्योग करायला मोकळे. आजी, मावश्या, मी अन असेल तर दादा असे ओळीने पांघरूण  घेऊन आडवे व्हायचो. थोड्या वेळाने आजी झोपली की आमची हळू आवाजात बडबड सुरु व्हायची. फालतू विनोद, पाचकळ गप्पा- गोष्टींना ऊत यायचा. कधी कधी खिदळणे कंट्रोल न झाल्याने हसण्याचा मोठा आवाज ऐकून आजोबांची झोपमोड व्हायची. "झोपा की रे आता का मारू दोन फटके..." असे उगाचच ऐकवून ते परत झोपी जायचे. आमचे उद्योग परत चालू व्हायचे. डोक्यावर पांघरूण ओढून रिमोट कंट्रोलची वेगवेगळी बटणे दाबत लाल दिवा कसा लुकलुकतोय ते पाहत बसणे, एकमेकांना चिमटे काढणे, कागदावर खेळ खेळणे ह्यात अख्खी दुपार निघून जायची. मध्येच भूक लागली की फ्रीजमध्ये डोके खुपसून डोळ्यांना दिसेल तो खाऊ खायचा. आजीच्या फ्रीजमध्ये सरबते, काजुकंद, चॉकलेट्स ह्यांची रेलचेल असायची. अशा पद्धतीने दुपार घालवल्यावर आजी-आजोबांची उठायची वेळ व्हायची. मग उठल्यावर आजी मस्त चहा करायची. मग मावशीने straw ची बाहुली बनवण्यासाठी आणलेल्या straw ढापून त्यांनी चहा पिणे, बशीत चहा ओतून मांजरीसारखे चाटत चाटत दूध पिणे आदि प्रकार निवांतपणे चालत राहायचे.
    संध्याकाळ झाली की आजीचा ठराविक प्रोग्राम सुरु होई. आधी आजी स्वच्छ हात-पाय-धुवायची. मग खुर्चीत बसून आधी चेहऱ्यावर, मानेवर पावडर चोपडायची. मग केसांना काजळ लावून त्यांना काळा रंग आणायची. मग मस्त पेपर-पुस्तके वाचत बसायची. तिचा हा कार्यक्रम चालू झाल्यावर आम्ही खेळायला जायचो. परत येऊन हात-पाय धुवून, शुभंकरोती म्हणेस्तोवर जेवायची वेळ यायची. आजीची आमटी मस्त असायची. सर्व पदार्थ स्वैपाकघरातून हॉल मध्ये आणायचे, ताटे-वाट्या-भांडी घ्यायचे न मग जेवायला बसायचे. हसत-खेळत-गप्पा मारत जेवण व्हायचे. मग झोपायची तयारी... गाद्या घालायच्या  न लोळायला लागायचे. दिवे मालवले की आजी भुताच्या गोष्टी सांगू लागायची. भीती वाटून मावशीच्या कुशीत डोके खुपसून लपून बसल्यावर कधी झोप लागायची ते कळायचे नाही.
    आजीकडे सकाळी लवकर उठायचे वगरे काही नियम नव्हते. तेव्हा लवकर जाग आली की लोळत पडायला भरपूर वाव होता. मुळात जाग यायची तीच आजोबांच्या "राजी-मंजी उठा आता...किती वाजले पहा जरा!" (राजी-मंजी ही माझ्या मावश्यांची टोपण नावे)...आजोबा ही वाक्ये अनेक वेळा त्याच आवाजात रिपीट करत राहायचे कारण ज्याला त्याला मनापासून इच्छा झाल्याशिवाय कोणीही उठणार नाही ह्याची त्यांना खात्री होती. पण अमुक एक वेळ झाली तरी गजर करायचे काम जसे घड्याळ   करते तसे हे वाक्य म्हणण्याचे काम आजोबा दिवसें-दिवस, वर्षानुवर्षे करीत असत.
    झोपेतून उठले की आवारा-आवर, स्वैपाक सुरु व्हायचे. Background ला जुनी गाणी, बहुधा गीता दत्तची, चालू असायची. सैया मिलने आना रे, बाबूजी धीरे चलना, मूड मूड के ना देख इत्यादी गाणी ऐकली की अजूनही माझ्या डोळ्यासमोर तेव्हाचे वातावरण उभे राहते. अशा प्रकारे हसत-खेळत-कामे करत पुढचा दिवस सुरु व्हायचा.
    नंतर नानी-नाना नव्या घरी आले. तिकडे आधी म्हणाले तसा झोपाळाही होता. मांजरे होती. नवनवीन मित्र-मैत्रिणी होते. मजाच मजा. नानी ही एक फार रसिक व्यक्ती होती. तिला नाटक-सिनेमे ह्यांची भयंकर आवड होती. अनेक नाटक-सिनेमांच्या कॅसेटस तिच्याकडे होत्या. ते पहायलाही मजा यायची. तिच्या ह्या रसिकतेला काळाची मर्यादा नव्हती. जुने सिनेमे, जुनी गाणी, जुने डान्स जेवढे तिला आवडायचे तेवढेच नवेही. मला आठवतंय तिला प्रभू देवाचा डान्स फार आवडायचा म्हणून मावश्या, नानी-नाना, मी, दादा आणि आई-बाबा असे डेक्कन थेटरला जावून "हमसे हे मुकाबला" हा पिक्चरही पहिला होता....
    आजोळी अशीच मजा करत गेलो. मधल्या काळात माझ्या एका मावशीचे लग्न झाले. तिला मुलगा (अमित) झाला. तिचे बाळंतपण आजीकडेच झाले. घरात भरपूर खेळणी आली. अमितचे कौतुक करण्यात आणि काळजी घेण्यात काही काळ गेला. खूप आनंदात दिवस चालले होते.
    पण सगळेच छान होत राहिले तर ते आयुष्य कसले. तापाचे निमित्त होऊन तब्येतीने एकदम व्यवस्थित असलेली आजी पंधरा दिवसात गेली. आजोबांचा धीर पूर्ण खचला. घरात आजोबा न धाकटी मावशी असे दोघेच जण उरले. ज्या घरात लाड करून घेण्यासाठी जात होते तिथे आजीचे मरणोत्तर संस्कार करण्यासाठी न नंतर मावशी-आजोबांना मानसिक आधार द्यायला म्हणून राहायला जाण्याची वेळ आली. नंतर धाकट्या मावशीचेही   लग्न झाले. घरात आजोबा एकटे राहू लागले. घरातली एकेक वस्तू घराबाहेरची वाट धरू लागली. शो-केस मध्ये तोर्यात मिरवणाऱ्या वस्तूंवर धुळीचे थर  बसू लागले. घर सुने वाटू लागले.
    आजोबांच्या घरी परवा पाउल टाकल्यावर एवढा सगळा काळ डोळ्यासमोरून झरझर येऊन गेला. गळा दाटून आला, डोळ्यातले पाणी कधी एकदा बाहेर यायला मिळते याची वाट पाहू लागले. लग्न झाल्यावर सासरी जाताना रडायचे नाही असे मनाशी पक्के केले होते तेव्हा ह्या अश्रूंना बांध घालण्याची कला अवगत झाली ती  आज कमी पडली. हसत-हसत आजोबांना निरोप देऊन बाहेर पडले तशी मात्र डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. आत्ता मस्त मजेत असलेल्या हिला एकदम झाले तरी काय हे मात्र अभिजीतला कळले नाही...

Friday, April 8, 2011

वल्ली अशी व्यक्ती

    सेल्वी: वय ३५, उंची ५ फूट, काळा रंग, सडपातळ बांधा..वर्णन "आपण ह्यांना पाहिलात का?" मधील एखाद्या हरवलेल्या व्यक्तीचे नसून माझ्याकडे कामाला येणाऱ्या बाईचे आहे. ह्या वर्णनात काही विशेष नाही पण ते वाचून तुमच्या डोळ्यासमोर जी वक्ती उभी राहू शकते त्यापेक्षा सेल्वी खूप वेगळी आहे. आजपर्यंत अनेक कामवाल्या बायका मी पाहिल्या पण सेल्वीसारखा नमुना सापडणे ही अशक्य गोष्ट आहे. असे काय वेगळे आहे सेल्वीमध्ये? वाचा म्हणजे समजेल.
    पहिला दिवस. समोरच्या दुकानदाराला सांगून ठेवले होते की एखादी कामवाली बाई ओळखीची असेल तर पाठवून दे. संध्याकाळी बेल वाजली. दार  उघडले. समोर कोणी दिसेना. बाहेर मान काढून आजूबाजूला पहिले तर नवीन जागी गेल्यावर लहान मुले जशी बावरून उभी असतात तशी सेल्वी उभी होती. आत बोलावले. काम काय आहे, पैसे, वेळ वगैरे ठरले. मी ऐकले होते की बंगलोरमध्ये नीट बोलणारी बाई मिळणे अवघड आहे. इथे कामवाल्या बायकांना भयंकर भाव असल्याने त्यांचे कामाचे भावही तितकेच जास्त असतात आणि वागणे म्हणजे चितळ्यांकडे काम करणाऱ्या माणसांहूनही तुसडेपणाचे असते. (चितळ्यान्चा वारंवार उद्धार करण्यासाठी मी तुमचीच माफी मागते पण दरवेळी पुण्याला गेल्यावर ते एक नवी हिट देऊन मला त्यांचा विसर पडू नये ह्याची ते पुरेपूर काळजी घेतात त्यामुळे त्यांची आठवण काढल्याशिवाय मलाही चैन पडत नाही. असो.) तर बंगलोरमधल्या बायकांची अशी प्रतिमा माझ्या मनात असताना सेल्वीला भेटून मला जरा बरे वाटले. पण प्रथमदर्शनी ही व्यक्ती माझ्या पोस्टचा विषय बनेल असे काही मला वाटले नाही.
सेल्वी रोज कामाला येते आणि रोज नवनवीन कारनामे करते किंवा ऐकवते. त्यामुळे तिचे किस्से सांगायला एक पोस्ट नक्कीच पुरे पडणार नाही पण 'निवडक सेल्वी' मला ह्या पोस्टमधून कॅप्चर करता येतीये का ते पाहते. किस्से वाचताना सेल्वीचे वय ३५ आहे हे लक्षात घेऊन वाचल्यास किस्से आणखी रंगतदार वाटतील.
हा किस्सा मला अभिजितने सांगितला. सांजवेळ झाली होती. लाईट गेले होते. मी कामाहून यायची होते. अभिजित घरात एकटा होता. हॉलमध्ये फक्त एक मेणबत्ती लावलेली होती. सेल्वी पायाचा आवाज न करता वर आली. बाहेर थंडी असल्याने तिने फरचा कोट घातलेला होता. अभिजीतला घाबरवण्यासाठी म्हणून सेल्वी भूतासारखा आवाज करत घरात शिरली. फरच्या कोटमुले मेणबत्तीच्या प्रकाशात खरच एखाद्या विचित्र प्राण्यासारखी दिसत होती. न आमच्या आसपास लहान मूल कोणी नसल्याने (आणि मोठ्या माणसांनी असे वागणे अपेक्षित नसल्याने) तिचे ते रूप पाहून अभिजीत खरच दचकला. न तो दचकलेला पाहून सेल्वी हसत सुटली. मी घरी आल्यावर भैयाची कशी मजा केळी ह्याची स्टोरी सेल्वीने छान मसाला लावून मला सांगितली. नंतरचे काम सेल्वीने एका हातात मेणबत्तीन धरून दुसऱ्या हातात फडके-झाडू धरून पूर्ण केले. तिचा स्वभाव गंमतीशीर नसता तर तिचे ते भयंकर स्वरूप पाहून मला नक्की भीती वाटली असती.
बंगलोरमधील बायकांना हिंदीतून बोलता येत नाही (ते अपेक्षितही नाही). पण सेल्वीला मात्र बऱ्यापैकी चांगले हिंदी येते. केवळ हिंदीतून बोलणेच नाही ८०-९०च्या दशकातल्या सिनेमातील गाणीही सेल्वीला चांगलीच माहित आहेत. अभिजीत घरी नसेल की नामी संधी पाहून तर सप्तकात सेल्वी 'मुझे नींद न आये, परदेसी परदेसी, देखा ही पेहली बार ' इत्यादी गाणी गात असते. ह्या तिच्या कालाकारीबद्दल मी तिला दाद देणेही तिला अपेक्षित असते. त्यासाठी प्रत्येक गाणे संपले की टी माझ्याकडे लाजून पाहते अगदी कविता म्हणून दाखवली की लहान मुले लाजतात तशी.
    एकदा संध्याकाळी मी कामावरून येत होते. ६.४५ वाजले होते. सेल्वी आमच्याकडे यायची वेळ आहे ७.३०. सेल्वी जनरल रस्त्यातून हिंडत होती. मला पाहून म्हणे चाल आज मी तुझ्याकडे लवकर येते. म्हणले चल. आमच्या घराच्या खालचे फाटक उघडेपर्यंत सेल्वी माझ्याबरोबर चालली. घराचा जिना आल्यावर पाळायला लागली. म्हणले कसली घाई आहे. म्हणे भर भर जाते न भैयाची मजा करते. पळत पळत गेली न रोजच्या सवयीनुसार गेल्या गेल्या ओरडली 'म्याडम किधर ही?'  अभिजीत म्हणाला आली नाही अजून. सेल्वी मुद्दाम भीतीचे नाटक करत म्हणे "७.३० बाज के हो गया म्याडम नी आयी अब तक?" आता ६.३० ची वेळ. बाहेर उजेड होता. अभिजीतला कळले की ती मजा करत आहे. तो म्हणाला अभी टीम नही हुआ ना, आयेगी. तरी हिचे घाबरण्याचे नाटक चालूच. शेवटी मी वर पोचल्यावर आणखी एकदा भैयाला आपण कसे फसवले ह्याचे स्वतःच समाधान वाटून घेऊन, हसत-हसत बाईसाहेब कामाला लागल्या.
    सेल्वी अतिशय भोळी आहे. तिच्या सांगण्याप्रमाणे तिच्या आई-वडिलांनी तिला खऱ्या जगाचा अनुभवच घेऊ दिलेला नाही. आमच्या गल्लीपलीकडे तिने कधी पुन टाकलेले नाही. लग्नानंतर तमिळनाडूतील कोणत्याश्या गावी नवर्यासोबत गेली. आधी २ मुली झाल्या. मुलगा पाहिजेच ह्या सासूच्या आग्रहाखातर अजून एक पोर जन्माला घातले. ह्यावेळी नशिबाने (?) मुलगा झाला. काही काळ बरे चालले. नंतर नवरा दारूच्या आहारी गेला. सेल्वीला, मुलांना मारू लागला, कसेही वागू लागला. तेव्हा मुलांना घेऊन सेल्वी आपल्या आई-वडिलांकडे निघून आली. डोक्याला छप्पर, खायला अन्न न मुलांचा सांभाळ ह्यासाठी सेल्वी आई-बाबांना ३००० रुपये देते. सेल्वीची अशी परिस्थिती पाहता काही लोक सेल्विच्या मुलांची फी भरतात. परंतू त्याबदल्यात सेल्वीकडून कितीही काम करून घेतात. सेल्वीही काही कमी नाही. ती मुलांसाठी रोज प्रत्येकी एक पर्लेजीचा पुडा, पाव-पाव लिटर दूध घेऊन जाते. समोरच्या दुकानदाराला ती महिन्याचे १ हजार रुपये देते. त्यात हा सगळा खुराक, शाम्पू, साबण इत्यादी गोष्टी नेते. सेल्वीकडे चंद्रमुखीचा ब्लाउज (असेही काही असते हे तिच्याकडूनच कळले), अमक्या स्टाईलची साडी, तमक्या स्टाईलची टिकली अशा वस्तू असतात. सेल्वी पार्लरमधून हेयर-कट करून घेते. काळजीपोटी एकदा तू काही सेव्हिंग करतेस की नाही असे विचारले असता ती शून्य सेव्हिंग करते असे कळले. "तुझा नवरा सोबत नाही. दोन मुली आहेत त्यांची लग्ने कशी करशील?" असे विचारले असता मुलगा (जो आत्ता ५ वर्षांचा आहे) करून देईल ना असे म्हणाली. असे विचार करून चालणार नाही हे समजावून दिले असता ५ मिनिटांसाठी थोडे विचारात पडली पण बहुधा आयुष्य हे असल्या  गोष्टींची काळजी करण्याइतके स्वस्त नाही असा विचार करून पुन्हा मूळ पदावर आली. कधी कधी ह्या भोळेपणामुळे तिची काळजी वाटते.
   लोकही साधे नसतात. एका गाण्याचे क्लास घेणाऱ्या बाईंकडे ही कामाला जाते. त्यांनी हिच्या डोक्यात घालून ठेवले की "मुलांना गाणे शिकव म्हणजे शाळेत बक्षिसे मिळायला लागतील, पुढे मोठी होऊन खूप कमावतील. दुसर्यांकडून मी महिन्याला ४५० रुपये घेते तुझ्याकडून मात्र प्रत्येकी २५० घेईन." झाले हिच्या डोक्यात भूत बसले. रोजच्याप्रमाणे इकडच्या तिकडच्या गप्पा सांगायला सुरवात केल्यावर तिने मला हे सांगितले. मला तिला नित समजवावे लागले की असे काही करण्यापेक्षा पैसे साठवून ठेव थोडे. काही दिवसांनी परत बाईसाहेब मला विचारत होत्या "कम्प्युटरची किंमत काय असते? विचार करतीये मुलांसाठी एक घ्यावा!" धन्य! काय बोलावे मला कळेना. मुलगा आहे इंग्लिश मिडीयमला. मुली कन्नड मिडीयम मध्ये. तिघेही क्लासला जातात. शिवाय मुलींना इंल्गीश यावे ह्यासाठी बाई स्पेशल इंग्लिशची  ट्यूशन शोधात आहेत. अंथरून पाहून पाय पसरावेत पण हे सेल्वीला कसे कळणार. मुलांना इंग्लिश शिकवले की त्यांना आपोआप छान नोकरी लागेल अशी तिची धारणा कोण दूर करणार? मुलांना रोज बिस्किटे खायला घालून खुश ठेवण्यापेक्षा स्वतः त्यांना थोडा वेळ दिला तर त्यांना जास्त आनंद मिळेल हे तिला केव्हा कळणार? खूप समजावले तरी सेल्वी तशीच.
कधी कधी असे वाटते की ही माणसे काही नसताना किती सुखी असतात...आपणच सगळे असून दुःख शोधून काढत असतो बहुधा. घर-गाडी-करियर-म्हातारपणासाठी सेव्हिंग करता करता आहे ते सुख खर्च करत राहतो... उद्याची चिंता ना करता हाती येणारा प्रत्येक क्षण मनाला येईल तसा उपभोगून स्वछंदीपणे जगणारी सेल्वी बरोबर की उद्याची काळजी करत, प्रत्येक पाउल जपून, मोजून-मापून टाकण्यात हाती असलेले अनेक क्षण खर्ची घालणारे आपण बरोबर?
(सेल्वीबद्दल लिहिण्यासारखे पुष्कळ आहे पण वेळेअभावी जेवढे जमले तेवढे लिहिले...सेल्वीचे नाव-नवीन प्रताप पाहता माझ्या इतरही पोस्ट्स मध्ये तिचा रेफरन्स येताच राहील...)