Sunday, July 12, 2009

प्राण्यांनाही मन असतं!

काल Lab ला जात असताना एका ओळखीच्या आवाजाने माझं लक्ष वेधलं. आवाज मांजरीच्या पिल्लाचा होता. आवाजाचा वेध घेत घेत निघाले न StaffC (Canteen) पर्यंत जाऊन पोहोचले. आवाज छपरावरून येत होता. staff C चं छप्पर एकदम बुटकं असल्याने सम्पूर्ण छपराचा एक scan मारला. तिथे अडगळ सोडून आणखी काहीच दिसलं नाही त्यामुळे तिथून निघणार एवढ्यात परत आवाज आला. आता अगदी निरखून पाहिल्यावर छपराच्या कोपर्याताल्या जाळीखाली काही तरी हलत असल्यासारखं वाटलं. अजून जवळ जाऊं पाहते तर एक अगदी छोटं (एखाद्या महिन्याचं असेल) मांजरीचं पिल्लू दिसलं. सुमारे ५ मिनिटं त्याला हाका मारल्यावर त्याला माझ्या सज्जनपणाची खात्री झाली न ते हळुहळू माझ्या जवळ आलं.
ते अतिशय भुकेजलं होतं. त्याच्या आवाजाची स्थिती पहाता ते खूप वेळापासून असंच ओरडत असणार हे स्पष्ट काळात होतं. शिवाय भूक न भीती ह्यांमुळे ते थरथर कापतही होतं. Canteen मध्ये त्याच्यासाठी आणायला गेले तेव्हा तिथले काका म्हणाले "दोन पिल्लांना इथे कोणीतरी दुपारी सोडून गेलं. एका पिल्लाला कुत्र्याने मारलं न आता हे उरलंय. इथे कुत्री येतात, बोके येतात. लोकं कशाला सोडून जातात इथे कोणास ठाऊक?"
दूध घेऊन गेले. बशीत ओतलं न पिल्लापुढे ठेवलं. त्याला बशीत दूध आहे हेच समजेना. शेवटी हाताच्या तळव्यावर चमचाभर दूध घेऊन हात त्याच्यासमोर धरला. आता त्याला दुधाचा वास आला न त्याने हातावरचं दूध चाटायाला सुरवात केली. असे २-३ चमचे दूध प्यायल्यावर त्याची भूक शांत झाली. Glass मधलं उरलेलं दूध पिऊन टाकण्यासाठी त्याच्या शेजारी बसले. तर ते मांडीत येऊन बसलं न एका मिनिटाच्या आत झोपूनही गेलं... त्याला सुरक्षित वाटत होतं. दूध संपवल्यावर ५ मिनिटं तशीच बसून राहिले. मनात विचार येऊ लागले "पिल्लू स्वतःचं संरक्षण करण्याइतकं मोठं नाही? ह्याच्या आईपसून तोडून सरळ आशा अयोग्य ठिकाणी ह्याला आणून सोडण्याचा निर्दयपणा कोणी कसं करू शकतं? शेवटी तो एक छोटासा जीव आहे. एखाद्या माणसाच्या बाळाला इतक्या सहज कोणी आईपसून दूर करू शकेल? मग प्राण्यान्शी माणसं अशी का वागतात? आता ह्या पिल्लाचं काय होईल?"
मी त्याच्यासाठी काहीही करू शकत नव्हते. एवढ्या मोठ्या IIT मध्ये प्राण्यांसाठी एकही जागा नाही. Hostel वर प्राणी पाळले तर मुलींना ते Unhiegienic वाटतं. अरे स्वच्छतेची फिकिर काय माणसांनाच असते?
एकदा एका अशाच एका पिल्लाला H-12 च्या इथे नेऊन सोडलं होतं. बरेच दिवस होतं ते तिथे. एक दिवस त्याला कुत्र्याने मारल्याचं कळलं. त्या पिल्लाबरोबर त्याची आई असती तर त्याच्या जिवाची तिने काळजी घेतली असती.
अजून एक अनुभव म्हणजे आमच्या हॉस्टलच्या पार्किंगमधे एक छोटं कुत्र्याचं पिल्लू आसर्याला येऊन बसायला लागलं. त्या गोंडस पिल्लाला पाहून अनेक मुलींनी येता-जाता त्याला खायला घालायला सुरवात केली. हळु-हळू ते आमच्या हॉस्टल मध्येच २४ तास राहू लागलं, मोठं होऊ लागलं. थंडीच्या काळात खाली मांडलेल्या खुर्चीवर हक्काने येऊन झोपू लागलं. कधी मेस मध्ये घुसू लागलं. आता मात्र मुलींमधली स्वच्छता जागी झाली. हॉस्टल कौंसिल ने फरमान काढलं की हॉस्टलच्या आवारात कुत्र्यांशी खेळताना आढळल्यास दंड भरावा लागेल. अचानकपणे त्या कुत्र्याला कोणी खायला घालेनासं झालं. हॉस्टलच्या परिसरात पाऊल ठेवताच त्या कुत्र्यावर Watchman धावून जाऊ लागला. येणार्या-जाणार्या प्रत्येक माणसाकडे ते कुत्र आशेने पाहत असतं. कोणीतरी आपल्याला खायला देइल, पाठीवरून पूर्वीसारखा हात फिरावेल.
रस्त्यातून एकदा जात असताना एका कुत्र्याच्या जिवाच्या आकांताने ओरडण्याचा मला आवाज आला. पाहाते तर Divider च्या समोर ते कुत्रं पडलं होतं. त्याच्या कम्बरेपासूनाचा सगळा भाग रक्ताबम्बाल झाला होता. त्याच्या अंगावरून गाडी गेली होती न गाडीवाला लक्ष न देता निघूनाही गेला होता. कुत्रं मोठं होतं. माझ्या एकटीच्याने उचललं जाणार नव्हतं. शिवाय मला कुत्र्यांची थोडी भीतीच वाटते त्यामुळे त्याला तिकडून हलवून रस्त्याच्या कडेला आणणे माझ्यासाठी अशक्य होतं. पण हेही स्पष्ट होतं की त्याला तसंच तिथे राहू दिलं असतं तर अजून एखादी गाड़ी अंगावर जाऊन ते मेलं असतं. माझा पाय पुढे हालेना. मी हताशपणे त्याच्याकडे बघत तिथेच उभी राहिले. येणारी जाणारी माणसं त्या कुत्र्याकडे बघून शोक व्यक्त करत पुढे जात होती. शेवटी एक रिक्शावाला थांबला. मी कुत्र्याकडे पाहात असलेलं पाहून त्याने माझ्याकडे कुत्र्याविषयी चौकशी केली. मी सगळी हकीकत सांगताच तो म्हणाला "इथे जवळच लिलाताई परुळेकर ट्रस्टचं कुत्र्यान्चं अनाथालय आहे तिकडे आपण ह्याला नेऊन सोडू." तो कुत्र्याला उचलून घेऊन आला. आम्ही त्याला घेऊन ट्रस्टमध्ये गेलो. लागलीच कुत्र्याला उपचार मिळाले.
"प्राण्यांनाही मन असतं" हे आपण का लक्षात घेत नाही? मांजरी आहे म्हणजे पिल्लं होणार. त्यांना तिच्यापासून तोडून वार्यावर सोडण्यापेक्षा एखादवेळेला तिला पिल्लं होऊ देऊन मग १००० रुपये खर्चून तिचे लसीकरण करून आणण्याइतका शहाणपणा माणसं का वापरत नाहीत? aapaN आत्ता ह्या कुत्र्याला खाऊ पिऊ घातले तर ते कायमचे इथे रहायला लागून पुढे त्यालाच इतरांच्या हाताचा मार खायला लागेल, त्यापेक्षा त्याला स्वतःचा दूसरा मार्ग शोधू दे , ही दृष्टी प्राण्यान्बाबत आपण का ठेवत नाही? माणसांच्या अंगावरून गाडी गेली तर त्यांना हॉस्पिटल मध्ये नेलं जातं (तेहि आता कमी होतंय) पण कुत्र्याचा जीव वाचवावा असं मात्र कोणालाच वाटत नाही.
माणसं माणूसकीने वागायला शिकणार का?

2 comments:

  1. A very true and touching extraction of thoughts at the end...
    ANIMALS ARE BEAUTIFUL PEOPLE :)

    ReplyDelete
  2. लय भारी !!

    "मोठा मासा छोट्या माशाला खातो", हा मात्स्य-न्याय म्हणजे प्राण्यांचे (व पश्चिमे चे) चिंतन आहे.
    "सर्वे भवन्तु सुखिनः" हे खरे मानवाचे (व पूर्वेचे=भारताचे) चिंतन आहे.

    ReplyDelete