Sunday, October 10, 2010

Little Women (By Louisa May Alcott)

Spoiler Warning Ahead!
इतक्यातच एक पुस्तक वाचले: "Little Women- By Louisa May Alcott". Little Women ही चार बहिणींची गोष्ट आहे. वेगळी वये, वेगळे स्वभाव, साहजिकच वेगळी विश्वे आणि वेगळी स्वप्ने घेऊन जगणाऱ्या ह्या बहिणी! ह्या मुलींचे वडील घरापासून लांब युद्धभूमीवर असतात. पूर्वी पैशाने संपन्न असणारे घर फसवणुकीमुळे दारिद्र्याच्या विळख्यात अडकलेले असते. ह्या background वर एक वर्षात त्यांच्या आयुष्यात काय काय घडते ह्याची ही गोष्ट आहे. मेगला छान-छौकीच्या वस्तुंची आवड असते. जो tomboyish असते. वडलांच्या गैरहजेरीत आपण कुटुम्बातील एक जबाबदार व्यक्ती आहोत असे तिला वाटत असते. बेथ ही एक लाजरी-बुजरी, घरालाच जग मानणारी मुलगी असते. सगळ्यात धाकटी एमी थोडीशी स्वार्थी असते. पण ह्या मुलींवर त्यांचे आई-वडिल खूप काळजीपूर्वक संस्कार करत असतात. त्यांच्यातील दुर्गुणांवर मात करण्यासाठी त्यांना मदत आणि प्रोत्साहन देत असतात, वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. एका वर्षात असे वेगवेगळे प्रसंग येतात की ह्या मुलींना जगातील पैसा, आराम ह्या गोष्टींपेक्षा आपल्या घरात मिळणारे प्रेम किती मौल्यवान आहे ह्याचा प्रत्यय येतो. मेग एका श्रीमंत कुटुम्बासोबत काही दिवस काढ़ते आणि केवळ पैसा आनंद देत नाही हे समजते. जो आपल्या धाकट्या बहिणीच्या जीवघेण्या आजारपणात तिची काळजी घेते आणि तिला आपल्यातील स्त्रित्त्वाचा प्रत्यय येतो. बेथ थोड़ी धीट होते. एमीला काही काळ घरापासून दूर एका खष्ट आजीबाईकडे राहिल्याने आपल्या घरात आपल्याला किती प्रेम आणि काळजीने वाढविले जाते ह्याची कल्पना येऊन आपण किती स्वार्थी आहोत ह्याची जाणीव होते आणि त्यावर मात करायला ती शिकते.
कथेमध्ये अनेक मनोरंजक गोष्टी आहेत. चौघी बहिणी नाताळनिमित्त घरात दरवर्षी नाटक बसवत असतात. एक गोष्ट त्या वर्षीच्या नाटकाचे वर्णन करते. त्या काळात असलेल्या clubs च्या craze ने प्रेरित होऊन ह्या मुलीन्नीही एक क्लब काढलेला असतो. त्या क्लबचे, त्याच्या मासिकाचे वर्णन छान आहे. जोची स्वयंपाकघरात झालेली फजिती, एमीची शाळेत झालेली फजिती, बेथच्या मांजरी आणि भावल्या, शेजारच्या घरातील Laurie, त्याचे आजोबा, त्यांच्या गमती-जमती छान आहेत.
लेखिकेची कथनाची शैली खूप ओघवती आहे. सर्व प्रसंग आपल्या डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटासारखे येत जातात. शांता शेळक्यान्नी केलेला "चारचौघी" हा ह्या पुस्तकाचा अनुवादही तितकाच सुंदर आणि प्रभावीपणे ही कथा आपल्यासमोर मांडतो.
बापरे! कोणत्याही गोष्टीला review करणे ही किती अवघड गोष्ट आहे हे मला आत्ता कळते आहे. पण पुस्तक इतके सुंदर होते की ह्याबद्दल लिहून आपण त्याच्या वाचनाची एक स्मृति जपून ठेवावी असे वाटले त्यासाठी हा एक प्रयत्न. ज्यांना कौटुम्बिक कथांमध्ये रस आहे त्यांनी चारचौघी किंवा Little Women नक्की वाचा.

Thursday, August 26, 2010

दोन तासांची पाहुणी

दिवस होता भाद्रपद शुद्ध षष्ठीचा. 'काही विशेष का असते भाद्रपद शुद्ध षष्ठीला?' असा विचार करत असाल तर डोके वापरणे लगेच थांबवा. असेच आपले सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी जड शब्द वापरले. असो, दिवस तसा साधाच होता. पण आमच्याकडे त्या दिवशी एक गम्मत घडली.
       तेव्हा घरी अभिजित आणि मी असे दोघेच असायचो. त्या दिवशी संध्याकाळी कम्पनीतून घरी आले आणि पाय धुवायला म्हणून बाथरूममध्ये जायला निघाले. दार उघडता क्षणी कमोडच्या कडेवर एक काळा पट्टा दिसला. 'काय असेल ते?', अशा विचारानेच माझ्या हृदयाचा ठोका चुकला. अभिजीतला दाखवावे तर तो गच्चीवरून कपडे आणण्यासाठी गेला होता. त्यामुळे ते तिथून हालायच्या आतच 'ते काय आहे?' त्याचा छडा आपल्यालाच लावायला लागणार हे मी समजून चुकले. मनाचा ठिय्या करून थोडे आणखी पुढे  गेल्यावर ती कोणत्यातरी प्राण्याची शेपटी आहे हे लक्षात आले. सस्पेन्स सस्पेन्स अजून वाढला. तसेच धारिष्ट्य करून आणखी पुढे सरकले. तेवढ्यात तो प्राणी धडपडत खाली घसरला. पुढे वाकून पाहिले तर दोन डोळे माझ्याकडे रोखून पाहत होते. 'अरे देवा, उंदीर आहे की काय?', कल्पनाच भयंकर होती. डोळे प्राण्यावर खिळलेले. नीट निरखून पाहिले तेव्हा लक्षात आले की ती खार होती.  काय करावे सुचेना. माझी हालचाल बंद झालेली पाहून खारीने परत हालचाल सुरु केली आणि ती वर यायचा प्रयत्न करू लागली. तिच्या प्रयत्नांना फळ काही येईना.
       हे सगळे घडेपर्यंत अभिजीत खाली आला आणि त्याने खार पाहिली. "घराच्या दारे खिडक्या पूर्ण बंद असताना ही आत आली कुठून?" हा प्रश्न आम्हाला पडला. बहुधा, सकाळी मी निघाल्यावर २ मिनिट दार उघडे होते तेव्हाच ती घरात आली असावी असा निष्कर्ष निघाला.
       एव्हाना खार कमोडच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करता करता अर्धमेली झाली. आता मात्र तिला बाहेर काढायला हवे होते. खारीशी अशा पद्धतीने पहिलीच गाठ पडल्याने तिला हातात धरून बाहेर काढायची काही हिम्मत होत नव्हती. तिला काठीने खालून थोडा आधार देऊन वर काढता येईल का ते पाहिले. पण काठीने आधार देऊनही ती घसरतच होती. शेवटी एक फडके कमोडच्या कडेवर ठेवले तेव्हा खारुताई फड़क्यात नखे रुतवून काठावर चढली.
       इतके सगळे उपद्व्याप करून खारुताई इतकी दमली की ५ मिनिटे ती तशीच कमोड्च्या काठावर पडून राहिली. मग तिला थोड़ी तरतरी आली आणि तिने टुणकन खाली उडी मारून बाथरूमच्या कोपर्याकडे धाव घेतली. थंडीने आणि  भीतीने हुडहुडी भरू लागली. शक्तीच्या अभावी तिला जागचे हलता येईना, तिला अन्नाची गरज होती. "काय द्यावे बरे?" असा विचार करत असतानाच समोर बीट दिसले. बिटाचा तुकडा तिच्यासमोर धरला. तिने अगदी कार्टूनमध्ये दाखवतात तसे दोन हातात धरून तो खायला सुरुवात केली. दोन-तीन बीटाचे तुकडे खाल्ल्यावर तिने २-३ शेंगदाणे खाल्ले. भुकेमुळे खारुताईला "आपण कुठे आहोत? हे अन्न आपल्याला कुठून मिळतेय?" ह्या कशाचीच शुद्ध नव्हती. खाल्ल्यावर तिला जरा तरतरी आली. मग तिने आपले अंग
चाटून स्वछ आणि कोरडे करण्यास सुरुवात केली. अंघोळीचा कार्यक्रम झाल्यावर ती परत थोडी शांत बसली. स्वच्छता मग विश्रांती, परत स्वच्छता परत विश्रांती अशा राउंड्स काही काळासाठी चालू राहिल्या. खारुताई आणखी आणखी तरतरीत दिसू लागली. आधी तिचे आवाजान्कडे लक्ष जात नव्हते, आता ती आवाज ऐकून अंग चोरून बसू लागली, सतर्क वाटू लागली.
        तिला तरतरी आलीये म्हणल्यावर आम्ही तिला एकटीला सोडले. कोणी आजूबाजूला नाही असे पाहून ती बाहेर आली. स्वयंपाकघरात शिरली. उंच उंच उड्या मारून ओट्यावर, फ्रिजवर चढायचा प्रयत्न करू लागली. पण ते काही तिला जमले नाही. तेवढ्यात मी स्वयंपाकघरात काम करायला गेले. माझी चाहूल लागताच ती फ्रिजमागे लपून बसली. काही काळाने कुठे गेली म्हणून पाहू लागले तर दिसेना! अभिजीत शोधू लागला. ती गुपचूप दारामागे जाऊन बसली होती. अभिजीतची चाहूल लागताच तिथल्या झाडूवर झाडासारखे चढायचा प्रयत्न करू लागली आणि जमत नाही म्हणल्यावर काही काळ परत शांतपणे बसून राहिली. आम्ही परत आमच्या कामाला लागलो. मग परत धैर्य करून खारुताई देवघरात शिरली. पाहिले तर ती मस्त देवाच्या फोटोमागे अंग चोरून बसली होती.
         शेवटी तिला जायला आम्ही हॉलचे दार उघडून ठेवले आणि तिच्या थोडे जवळ जाऊन जरा आवाज केला. आवाजाला घाबरून खारीने दाराच्या दिशेने पळ काढला. दाराबाहेर पाऊल टाकताच तिला काहीतरी वेगळे वाटले बहुतेक! ती एक मिनिट तिथेच थांबली आणि भिन्तिवरून उडी मारून निघून गेली.
         खारुताई २-२.५ तासच आमच्याकडे होती पण तेवढ्या वेळात ती घरभर हिंडली. घरी दोघेच असल्याने ह्या छोट्या आगंतुक पाहुणीचा तेवढ्याच वेळात आम्हाला लळा लागला. गेल्यानंतर बराच वेळ आम्हाला दोघांना ती तिथल्या कोपर्यातच असल्याचा भास होत होता! आमच्या डेली सोपमध्ये "guest appearance" देणारी ही खारूताई कायमची आमच्या आठवणीत राहिलेली आहे.

Saturday, August 21, 2010

ग म भ न - कन्नडाचे

सध्या मी 'ग म भ न' शिकतीये कन्नड़ लिपीचे! कसे कसे? कशासाठी? तर कन्नड़ शिकायची आयडिया मला मी रोज कॅबने कंपनीत जाते तेव्हा आली. जसे आपल्या इथे महाराष्ट्रात दुकानांवर  इंग्लिशसोबतच मराठीतही नावे लिहावी लागतात ना तसेच इथेही आहे. प्रत्येक दुकानावर, शो-रूमवर, इंग्लिश आणि कन्नड़ दोन्हीत नावे लिहिलेली असतात. आता हा मुद्दा निघालाच आहे तर मला हे नमूद  करावेसे वाटते आहे की महाराष्ट्रातील अमराठी लोक शिवसेनेला नावे ठेवतात पण दक्षिण भारतात पण तेच तर आहे आणि त्याला हरकत काय आहे? एखाद्या प्रदेशात तिथली भाषा वापरली जावी ही उत्तम गोष्ट आहे. मी इथे कर्नाटकात राहते आहे तर कन्नड़ न शिकता इंग्लिशला आपलेसे का करावे? जोवर येत नाही तोवर इंग्लिशचा वापर करायलाच लागेल पण जर मी कन्नड़ शिकले तर मला एक नवी भाषा यायला लागेल आणि मी जिथे राहते त्या प्रदेशाशी आणि तिथल्या लोकांशी आणखी जवळीक साधण्यास त्याने मदतच होईल. शिवाय भाषेच्या अज्ञानाने जी फसवणूक होऊ शकते तिची शक्यता कमी होईल. असो! तर प्रत्येक दुकानावर, शो-रूमवर इंग्लिश आणि कन्नड़ दोन्हीत नावे लिहिलेली असतात. मी गंमत म्हणून ती दोन्ही नावे बारकाईने पाहायला लागले. अशा अनेक इंग्लिश-कन्नड़ जोड्या नीट जाणिवपूर्वकपणे पाहिल्यावर मला अनेक अक्षरे, कान्हा, मात्रा लिहिण्याची पद्धत कळायला लागली. ह्याचा अजून एक बोनस म्हणजे माझ्या कंपनीत जातानाच्या अर्ध्या तासात मस्त विरंगुळाही होऊ लागला. एक दिवस मी कन्नड़ लिपीसाठी सर्च केले तेव्हा मला http://www.omniglot.com/writing/kannada.htm ही लिंक मिळाली. त्यात प्रत्येक कन्नड़ अक्षर-स्वर  आणि  त्याचा इंग्लिश उच्चार दिला आहे. ते एकदा हाताने लिहून काढले. तेव्हापासून मला अक्षरे आणखी नीट समजू लागली. आता मला कन्नड़मध्ये लिहिलेल्या पाट्या वाचता येऊ लागल्या आहेत. ही लिपी शिकण्याचा अजून एक फायदा म्हणजे- इथे बसेसवर बर्याचदा फ़क्त कन्नड़मधून नावे लिहिलेली असतात. कन्नड़ ना समजणाऱ्यांना बसचे नंबर लक्षात ठेवावे लागतात. पण कन्नड़ वाचता येत असेल तर लास्ट स्टॉपची नावे वाचता येतात. एकदा का लिपी वाचता येऊ लागली की कन्नड़ भाषा शिकण्याचा माझा विचार आहे. बघू कसे काय जमते ते!

Monday, August 16, 2010

रविवारची कहाणी

गेला रविवार एकदम मस्त गेला होता न त्याबद्दल मला लिहायचेसुद्धा होते पण "ब्रेक के बाद" असे म्हणून जे गेले ते परत ब्लॉगकडे वळायला एक आठवडा गेला न मला जे लिहायचे होते तेच मी विसरून गेले...असो...आजचा दिवस म्हणजे रविवार ही काही कमी happening नव्हता....म्हणले गेल्या रविवारची नाही तर आल्या रविवारची कहाणी तरी लोकांना सांगावीच! (टिप: मी एक सामान्य मुलगी असल्याने माझ्या जीवनात अमिताभच्या शोले, बागबान, सरकार, अजूबा आदी पिक्चरसारखे अद्भुत-रम्य असे काही घडत नाही...अमोल पालेकरच्या चितचोर, हम दोनों, बातों बातों में ह्या पिक्चर्ससारखे माझे आयुष्यही हलके-फुलकेच...नवीन सांगण्यासारखे त्यात काही नाही...तरी देवाने फुकटात काहीतरी खरडायची न लोकांपर्यंत पोहोचवायची सोय केल्याने मी लिहिते...तेव्हा तुम्हाला वैताग आल्यास क्षमस्व...)...असो...गाड़ी रुळावर आणली नाही तर पोस्ट रविवारची न संगता भलतीच कहाणी सांगेल...जाते थे जापान पोहोंच गए चीन समझ गए ना अशी गत होईल...तर सकाळी उठले न एकदम क्लिक झाले की आज स्वातंत्र्य दिवस! शाळेतले दिवस आठवले...सकाळी लवकर उठून आवरून शाळेत जायचो...झेंडावंदन करायचो...त्यावेळी सगळ्यांनी मिळून एका आवाजात, एका सुरात म्हणलेली प्रतिद्न्या, राष्ट्रगीत, देशाभाक्तिपर गीते आजही माझ्या कानांत घुमतात...माग काही कार्यक्रम व्हायचे (जे मला आवडायचे नाहीत त्यामुळे ग्राउंडवरच्या धुळीशी, मैत्रिणीच्या वेणीशी, स्वेटरच्या फुलांशी करत बसलेले खेळ अजूनही आठवतात...)कार्यक्रम संपले की एकदम पळत सुटायचो...अंगात एक चैतन्य संचारलेले असायचे...सोसायटीतले झेंडावंदन असायचेच...पार्ले-जीचा पुडा मिळायचा ते झाले की...ण माग खेळाच्या स्पर्धा...घरी आल्यावर टीवीवर लागलेले कार्यक्रम...miss those days! आज ह्यातले काहीच नव्हते...in fact ह्यातले काहीच नसण्याची सवय झालीये...उठले टीवी लावला...कर्मा लागला होता...
हर करम अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए |
दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए ||
"ओळी ऐकण्यापुरत्याच राहिल्या आहेत नाही आपल्यासाठी!", मनात विचार आला...अजून थोडा विचार केला...आपल्या आजूबाजूच्या गरजू लोकांना मदत करून, अन्धश्रद्धांचा त्याग करून, लाच न देऊन, वाहतुकीचे नियम पाळून , कर भरून आपण खारीचा काही होईना वाटा उचलत आलोय आणि उचलत राहू असे डोक्यात येऊन मनाला थोडेतरी बरे वाटले...इतक्यात खालून ढोलाचा आवाज आला...पळत पळत passage मध्ये गेले...जवळच्या शाळेतल्या मुलांची परेड चालली होती...आवाज ऐकून अभिजीतही आला...५ मिनिटे थाम्बून परेड पाहिली...न दिवसाला सुरवात केली...
रविवारची सकाळ...नाश्ता काय करावा? पुदिन्याची चटणी केली...चटणी सॅंडविच खाल्ली, ब्रेडला तोप लावून त्यावर साखर पेरून खाल्ली आणि गोडमिट्ट कॉफीत ब्रेड बुडवून खाल्ला...मजा आली!
आवरून सुरभीकडे गेलो...गेल्याच आठवड्यात तिची आई आलेली...त्यांच्या हातचा दाण्याचा लाडू खायला मिळाला...आईचे घर सोडले की ह्या गोष्टींची किम्मत काय ते कळते! खूप छान वाटले...मग गेलो केतकीकडे...मी, केतकी, तानपुरा न तबला मशीन, सोबतीला यमन...वाह...एक तास कसा गेला कळलेच नाही....मग केतकी आम्हाला "स्मोकिंग चूल्हा" मध्ये जेवायला घेऊन गेली...नावावर जाओ नका...अतिशय साढ़े, घरगुती न रुचकर असे जेवण होते...पुलाव, दाल, फुलके, बटाट्याची भाजी...सोबतीला मसाला ताक...वाह...इतक्यांदा "वाह वाह" करायला ही काही "ताजमहल चाय"ची जाहिरात नाही न मला भेटायला झाकिर हुसेन येणार नाहिये हे माहिती आहे मला...पण tasty खायला मिळाले की तोंडातून अशी दाद येणारच! असो...
पुढचा कार्यक्रम होता "पीपली लाइव्ह" पाहायचा...शो ३ चा होता...आत्ताशी १ वाजला होता...घरी जाऊ, मशीन ठेऊ न पुढे जाऊ असे ठरवले होते त्याप्रमाणे निघालो...management च्या planning and execution चे धड़े पावासानेही घेतलेत की काय कोण जाणे...आम्ही रस्त्यावर पाऊल टाकले न पावसाने पडायला सुरवात केली...पाऊस जोरात नव्हता तेव्हा पुढे टाकलेले पाऊल तसेच आणखी पुढे रेटले...आम्ही जसजसे पुढे जाओ लागलो तसतसे पावसाला अजूनच चेव चढू लागला....थांबणे भाग होते...जिथे थांबलो तिथेच समोर जूसचे दुकान होते...लगेच "chance pe dance" करावा तसे आम्ही दुकानात शिरलो...मेनू कार्ड उघडले..."1 pomegranate juice" ऑर्डर दिली...टीवी चालू होता..."तारे जमीं पर" लागला होता...बाहेर पाऊस, हातात डाळीम्बाचे जूस, टीवी वर "तारे जमीं पर"....मैफिल चांगलीच रंगली...अधून मधून बाहेर लक्ष जात होते..."आपल्याला भाव देत नाही म्हणजे काय!" असा विचार करूनच की काय पाऊस वाढतच चालला होता...पण मैफिल सोडायला मन तयार नव्हते...दुर्लक्षच झाले...तेवढ्यात डिश टीवी चा सिग्नल गेला...आता मात्र पावासाकडे डोळे लागले (तो येण्यासाठी नव्हे तर थांबण्यासाठी...) पण आधी न दिलेल्या भावाचा बदला घ्यायचा म्हणून तोही वाढतच चालला होता...असे करत करत २ वाजले...आता मात्र निघायलाच हवे होते...अभिजीतला म्हणले "चाल जाउया तसेच! पावसात भिजायला मजा येईल..." आम्ही निघालो...पावसाला ठेंगा दाखवून आम्ही तसेच निघालो...केवढी थंडी वाजत होती...तिला ignore करण्यासाठी तोंडातून वेगवेगळे आवाज काढत निघालो...आम्ही पुढे गेल्यावर लक्षात आले की पुढच्या area त विशेष पाऊस पडलेला नव्हता न आत्ताही अतिशय थोडा पडत होता...चला सुटलो असे म्हणून गाडी हाणली न घरी पोचलो (पण आम्हाला काय माहीत रुसलेला पाऊस आमचा पाठलाग करत आमच्या मागेच येत होता...)...२.१५ ला घरी पोचलो...कपडे बदलले ...२.३५ ला बाहेर पडलो...पाहतो तर काय परत पाऊस! पण आता आमच्याकडे रेनकोट होते...परत निघालो थेटरच्या दिशेने...जवळ जवळ १० मिनिटांचा रस्ता पटापट कापला...साधारण १ की.मी. च अंतर उरले होते..."आपण वेळेत पोचणार" असे म्हणेस्तोवर समोर ट्राफिक दिसले...बेंगलोरचे ट्राफिक म्हणजे काट असते ते इथे ययूनाच अनुभवावे...२.४५ वाजले होते...आता अर्धा तासाच्या आत काही आम्ही थेटरला पोचत नाही अशी चिन्हे दिसू लागली...आधीच तो "पीपली लाइव्ह" १.३० तासांचा त्यात आपण १५ मिनिटे उशिरा गेलो तर "अब बचा क्या?" अशी म्हणायची वेळ येणार हे स्पष्ट दिसू लागले...ह्याच चिंतनात १० मिनिटे गेली...इतक्यात ट्राफिक अचानक
क्लिअर झाले...श्रीकृष्णास वासुदेव नदीपार नेत असताना पुराचे पाणी अचानक बाजुला गेले होते तसाच दैवी चमत्कार होउन समोरचे ट्राफिक अचानक क्लेअर झाले...आता आम्हाला काही रस्त्यातून पुढे जाऊन कन्सवधासारखे महत्त्वाचे काम करायचे नव्हते...पण फ़क्त कल्याणकारी कामांच्या वेळीच घडवून आणण्यासाठी जर देवाने चमत्कार राखून ठेवले तर आजच्या जगात तोच बिचारा frustrate होईल...थोडक्यात काय तर चमत्कार व्हावा तसे ट्राफिक क्लेअर झाले...बरोब्बर ३ च्या ठोक्याला आम्ही थेटरात पाऊल टाकले...पुढचा १.३० तास डोळ्यापुढे जे काही घडले ते कमाल होते...."पीपली लाइव्ह" हा एक सुंदर पिक्चर आहे...रिपोर्टर्सची थट्टा अनेक पिक्चर्समधून उडवली जाते...राजकारण्यान्चा नालायकपणा अनेक पिक्चर्स दाखवतात...पण ह्या दोन्हींचा एकत्रित परिणाम किती अनापेक्षित होऊ शकतो त्याचा ह्या पिक्चरने दिलेला पञ्च हृदयावर घाव सोडून जातो...
पीपली लाइव्ह संपून निघालो...भूक लागली होती...मोकामध्ये "chocolate fondue" नामक प्रकार खाल्ला (ठीक ठाकच होता...) क्रीम, चोकोलेटचा (कधी नाव्हे तो) overdose झाला...ह्यावर उतारा काय? पाणीपुरी! वाटेत पाणीपुरी खाल्ली..सोबत मसाला पुरी मिळाली...जीभ धन्य झाली...घरी आलो...शांत बसलो..."आपले उद्या joining आहे!" मन म्हणाले..."अरे देवा! सगळ्या documents जागेवर आहेत का..." काय काय न्यायचेय ते पाहण्यासाठी offer letter उघडले...अनेक कागदांच्या zerox हव्या आहेत असे दिसले...परत घराबाहेर पडलो न घेऊन आलो...तेवढ्यात येता येता मराठी गाण्यांचा विषय निघाला...घरी आल्या आल्या laptop चालू केला गेला...ती गेली तेव्हा रिमझिम, तू तेव्हा तशी, सुरमई श्याम, जिवलगा, श्याम सुंदर राजसा, नाविका रे, पाखरा जा दूर देशी, माझे रानी माझे मोगा, गोमू संगतीन एकातून एक अनेक गाणी आठवत गेली तशी ऐकत गेलो...दिवसाचा शेवट सुरेख झाला...
ह्या दिवसाची आठवन म्हणून पोस्ट लिहायला घेतली अणि अशा प्रकारे रविवारचा दिवस सुखात गेला...जसा पाऊस आमच्यावर कोपला तसा तुमच्यावर न कोपो. तरी जसा आमचा हा रविवार मस्त गेला तसा तुमचा पुढचा प्रत्येक रविवार जाओ. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफल सम्पूर्ण! (मला ह्या वाक्याचा नीट अर्थ माहीत नाही तरी जुन्या काहण्यान्च्या style ची ही केलेली नक्कल...तेव्हा काही चूक झालेली असल्यास क्षमा असावी.)

Monday, August 9, 2010

एक उनाड दिवस...

बंगलोरला आल्यावर हा पाहिला वीकेंड होता ज्यात माझ्या न अभिजीतच्या जिवाला थोड़ी शांतता होती...नाहीतर नवा संसार म्हणजे सामन आणा, भाजी आणा, फ्रिज आणा, फर्नीचर आणा...लिस्ट कधी संपेल की नाही अशी शंका वाटायला लागली होती...असो...तर एकदाचा ज़रा शांतता असलेला वीकेंड मिळाला...
शनिवारी सकाळी जेवायला पंजाबी पद्धतीचे काहीतरी करावे असे सर्वानुमते (म्हणजे माझ्या अणि अभिजीतच्या मते) ठरले...उषा पुरोहितांचे पुस्तक शेल्फतून बाहेर निघाले..त्यावरची शूल झटकली गेली...दिलेल्या रेसिपीज आणि घरात असलेले सामान ह्यांचा अंदाज घेऊन ज्या रेसिपीसाठी लागणार्या वस्तू घरात आहेत तो पदार्थ करायचे ठरले...डीटेल्ड अभ्यास केला गेला आणि "मसाला गोबी आणि लाछा पराठा" करायचे असे ठरले...पुरोहित बाईंच्या आणि देवाच्या कृपेने दोन्ही पदार्थ खूप छान झाले...देवाची कृपा ह्यासाठी की पुरोहित बाईंची रेसिपी कितीही चांगली असेल तरी मसाले आणि मीठ ह्यांचे प्रमाण योग्य होण्यासाठी अजूनही मला ईश्वरी मर्जीवर अवलंबून रहावे लागते...असो...जेवण मस्त झाले...
दुपारी आमच्या मित्रपरिवारासोबत पत्ते खेळण्याचा कार्यक्रम ठरवला गेला...जजमेंटचे डाव मस्त रंगले...१३ डाव खेळल्यावर मात्र आता पोटोबाचाही काही विचार करायला पाहिजे अशी जाणीव आम्हाला झाली...A2B मध्ये गेलो....१४ इडल्या (घाबरू नका...ही एकच डिश असते आणि तिच्यात १४ छोट्या छोट्या इडल्या साम्बारात बुडवून दिलेल्या असतात), समोसा चाट, कचोरी चाट, दही बटाटा चाट, पाव भाजी इत्यादी पदार्थान्वर मस्त ताव मारला गेला...न शेवटी लस्सी आणि कॉफी इत्यादी पेयांनी पोटपूजेची सांगता केली गेली...
वेळ होता...जवळच नवे शोपर्स स्टॉप उघडले होते...त्याला भेट दिली...२५००-३५००च्या अगदी टुकार हाफ-पॅंट, हजाराच्या पटीतल्या किमतींचे सदरे आणि झगे आदी वस्तू पाहून भारतीयांकडे खूपच पैसा झालेला दिसतोय अशा तर्हेचे रिमार्क्स मनोमन मारत तिकडून बाहेर पडलो (तसे पुण्यातही मॉल आहेत न काही लोकांच्या आग्रहाखातर त्यांनाही भेटी दिलेल्या आहेत...तरीही माझे बापडे मन अजूनही अशा वस्तू पाहून अचंबित होते...) ...असो...मित्रमंडळीन्चा निरोप घेऊन निघालो...इतक्यात ह्या अथावाद्यात ठरवलेले एक मोठे काम राहिले आहे ह्याची आठवण झाली...काम होते: कॉर्नर हाऊसला जाऊन आइसक्रीम खाणे...ताबडतोब हे काम पूर्ण करून टाकायचे ठरले...कॉर्नर हाऊसला "Death By Chocolate" नामक सन्डे मिळते त्याची आर्डर दिली गेली....ब्राउनी, चोकोलेट फ़ज, चोकोलेट आइसक्रीम, चोकोलेट सॉस, त्यावर शेंगादाण्याचा चुरा न चेरीज...आहाहा...आता एवढे चोकोलेटसुद्धा माझ्यासारख्या चोकोलेट-लवरच्या डेथला कारण नाही होऊ शकले ही गोष्ट वेगळी...
अशा प्रकारे तर्हेतर्हेच्या पदार्थांचा आणि पत्त्यांचा आनंद घेऊन तृप्त झालेला आत्मा नवर्याच्या मागे गाडीवर बसून आरामात थंड वाऱ्याचा अडिशनल आनंद घेण्यात रममाण झाला....
एवढ्यात आठवण झाली ती "माहेरच्या मुराम्ब्याची"! :D माहेरची साडी, माहेरचे कुंकू वगरे ठीक आहे...पण माहेराचा मुरंबा! हा काय प्रकार आहे? तर त्याचे असे झाले की अभिजीत लग्नाआधी ह्या मित्रमंडळीन्सोबत रहात असताना ते सगळे रोज जेवण घरी तयार करायचे...तोंडी लावणे म्हणून मी रुखावतातला मुरंबा अभिजीतसोबत पाठवला होता...पण ह्यांनी तो काही संपवला नाही...म्हणून तो परत आणण्याचे काम करणे महत्त्वाचे होते...माझ्या माहेरच्या मुरम्ब्याला त्यांनी न खाल्ल्याने बुरशी लागून तो वाया गेला असता तर किती हाहाकार माजला असता ह्याची कल्पना अभिजीतला असल्याने मुरम्ब्याची आठवण करून देताच अभिजीतने गाडी मॅकच्या घराकडे वळवली....मॅकच्या घरी त्याचे आई-बाबा आले होते....काकूंनी मस्त पोहे केले...सोबतीला राजकोटचा म्हैसूर पाक आणि चिक्की होते...आत्मा अजून तृप्त झाला...
आता मात्र काहीही करण्याचे त्राण शिल्लक नव्हते...गाड़ी सरळ घराच्या दिशेने वळवली...घरी येऊन पांघरुणात दडी मारून मस्त झोपून गेलो...
आमच्या वीकेंडच्या आठवणी सांगता सांगता आज वीकडे आहे न आपल्याला काम आहे हे विसरूनच गेले...त्यामुळे रविवारची कहाणी बाकी असूनही सध्या राम राम घेते...उरलेली कहाणी ब्रेक के बाद!

Tuesday, March 23, 2010

आमचे पुणे!



IPL मध्ये पुढच्या वर्षी पुण्याची टीम भाग दिसणार अशी बातमी आली न काल्पनिक पुणेरी पाटयांसाठी लोकांना एक विषय मिळाला. असेच एक फॉरवर्ड मिळाले, जर्सीचे! कमाल वाटली नएखाद्या पोस्टद्वारे पुणेरी दुकानदार तसेच व्यावसायिक (चितळ्यांना दुकानदार म्हणून कसा चालेल बुवा) ह्यांना आदरांजली वाहण्याची इच्छा मनात आली.
गिर्हाईकांशी कसे वागू नये ह्याविषयीचे फुकटात ट्रेनिंग हवे असल्यास "चितळे बंधू मिठाईवाले" ह्यांच्याकडे जाच. फ़क्त काय निरीक्षण करायचे ते लवकर करून बाहेर पडाल ह्याची काळजी घ्या नाहीतर ट्रेनिंगच्या काही भागात तुमच्यावरच प्रयोग होण्याची शक्यता जास्त आहे. जर तुम्ही चितळ्यांच्या बाकरावड़ीचे fan असाल तर तुमच्याकडे शिस्त आणि पेशंस असणे आवश्यक आहे. चितळ्यांकडे बाकरवडीसाठी रांग असते. तुम्ही रांगेच्या १ इंच जरी बाहेर दिसलात तरी चितळ्यांचा शिपाई तुम्हाला हटकतो .. जर तुम्ही त्याच्याशी हुज्जत घालायचा प्रयत्न केलात तर चितळ्यांचा सेवक येऊन तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी शिस्तापालन कसे गरजेचे आहे ह्या विषयावर १ लेक्चर देतो. ह्या सगळ्या भानगडीत चितळ्यांचा त्या दिवशीचा बाकरवड्यांचा स्टॉक संपतो न रिकाम्या पिशवीने तुम्हाला घरी जायला लागू शकते...चिताल्यांनी एक शाळा काढली तर ही मानसे मुलांना शिस्त लावण्याच्या कामी उपयोगी पडतील...चिताल्यांची शाळा!
दुसरा नंबर येतो महेंदळे वाद्यवाल्यांचा! तंबोरा, पेटीसारखे जड़ वाद्य रिक्षातून उतारवल्यावर मेहेंदल्यांचा गडी तुमची मदत करायला येईल असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मूर्ख आहात. वाद्य घेऊन कसेबसे आत गेल्यावर तातडीने कोणीतरी येऊन त्याबद्दल चौकशी करेल असे तुम्हाला वाटले तर तो अजूनच मुर्खपणा असेल. तुम्ही आत जाल, बर्याच वेळ ताटकळत उभे रहाल, कधीतरी दुकानातल्या माणसांना तुमची दया येईल, माग ती येतील, तुमच्या वाद्याकडे चित्र-विचित्र कटाक्ष टाकतील...काय ही ब्याद आलीये अशा पद्धतीने वाद्याला उचलून जमिनीवर आपटतील.."काय झालय?" म्हणून चौकशी करतील न प्रॉब्लम कुठलाही असे ना एक आठवड्याने चौकशी करा असे ठराविक उत्तर देऊन तुमची बोळवण केली जाइल.
जोशी वडेवाल्यांकडे गेल्यावर तुम्ही फुकट वडे मागत आहात की काय अशी तुमची तुम्हालाच शंका येऊ शकते. काही दुकानांत बराच वेळ वाट पाहिल्यावर आपण इथे नक्की कशासाठी आलो होतो हे तुम्ही विसरून जायचीही शक्यता असते. याशिवाय जनसेवा दुग्धालय, जुने डेअरीवाले, बेकरीवाले, रिक्शावाले, कंडक्टर, टेलर, सोनार हे तुम्ही पुण्यातच आहात हे विसरु नये ह्याची वे ळोवेळी दक्षता घेताच असतात!
गेल्या आठवड्यात दादा-वाहिनीसोबत नवरत्न भेळ इथे भेळ खायला गेले. नेहमीच्या सवयीप्रमाणे १ मीडियम, २ गोड अशी आर्डर दिली प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी (action-reaction) तसा दुकानदार खेकसला "आमच्याकडे एकाच प्रकारची भेळ मिलते. आत तिखट-गोड पाणी ठेवलेले आहे. हवी अशी करून ह्या..". "बापरे, केवढा हा अपराध असे वाटून आम्ही आत जाऊन बसलो." (तिथली भेळ खरच चांगली असते म्हणून नाहीतर पुणेरी स्वभावानुसार दुकानादाराच्या तोंडावर शिव्या घालत तिकडून निघालो असतो..असो). तर १ च प्रकारची भेळ जिच्यात लोकांनी स्वतः पाणी घालून चवीनुसार तिखट बनवावी अशी पद्धत असेल तर दिलेली भेळ कमी तिखट नको का? भेळ खायला लागल्यापासून २ मिनिटात दादा- वहिनीचा चेहरा तिखटामुळे लाल झाला! ह्याच दुकानात अजुन एक मजेदार पाटी दिसली! "नवरंग भेळ होटल च्या गिर्हाईकांनी वाहने अमुक-अमुक ठिकाणी लावावीत!" होटल नवरंग बर का..जागा ८*८ पण नसेल. बाकड़ी गुर्हाळात असतात असली लाकडी...संपला विषय!
मजेचा भाग बाजुला ठेऊ..ही सगळी परिस्थिती पाहता मराठी माणसाच्या हातून सगळे व्यवसाय जात चाललेत, जिथे पाहू तिथे बिहारी, मारवाड़ी, गुजराती, भैये लोक दिसतात अश्या बोम्बा मारण्यात काही तथ्य आहे का? उद्या चितले, मेहेंदले, नवरत्न भेळवाले ह्यांच्या क्वालिटीचे प्रोडक्टस बनवून एखादा मारवाड़ी विकू लागला न स्वभावधर्मानुसार गिर्हाइकानशी गोडीने वागू लागला तर आपण तरी त्यांच्याकडे जाऊ का?
पुण्याच्या मराठी माणसांनी खरेच "जागे" व्हायची गरज आहे. पुण्याची मुंबई व्हायला फारसा वेळ उरलेला नाही...

Friday, March 12, 2010

आनंदोत्सव!

सांगितले तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण IIT तल्या लोकांसाठी सर्वांत आनंदाचा काल म्हणजे लाईट गेलेले असतात तेव्हाचा काळ! "हा काय प्रकार आहे! ", असे वाटले असेल न एकदम!
IIT त सण वगरे साजरे होत नसतात. मेस वाल्यांनाच दया आली तर ते गोडाधोडाचे करतील तेवढाच काय तो बदल. बाकी सुट्टीचा पूर्ण "आनंद " घेता यावा यासाठी प्रत्येक प्रोफेसर असाइनमेंट देतो. फराळासारखे प्रोब्लेम्स असतात सोडवायला. दिवाळीत एखादी पणती मिणमिणताना दिसते. ती इतकी बिचारी असते कि कधी जीव सोडेल ते सांगता येत नाही. आकाशकंदील नामक प्रकार कॅम्पसच्या बाहेर पडल्याखेरीज दिसत नाही. असो! तर मुद्दा हा कि "सण = आनंद" ह्याची truth value शून्य आहे. बाकी कोणत्याही गोष्टीतून आनंद मिळत असेल तरी अर्ध्या तासापलीकडे (फारतर एक तास...interesting movie असेल तर १.३० तास!) लोक तिच्यात मन लावत नाहीत. IIT चे विद्यार्थी you know!
तर मग लाईट जायचा न आनंद व्हायचा काय संबंध? तर संबंध असा, की आम्ही IIT त यायच्या आधी इकडे लाईट फारसे जात नसत. साहजिकच generators इथे अजिबात आढळत नाहीत. एवढेच काय इथल्या अनेक servers नादेखील backup नसतो. लोकांच्या खोल्यांमध्ये मेणबत्त्या नसतात. त्यामुळे लाईट गेले की कोणालाच काहीच काम करता येत नाही. फार तर ज्यांच्याकडे laptops आहेत ते लोक काही काळ काम करायचा प्रयत्न करून पाहतात! बर मग? ह्यात तर सगळे आहे. IIT तले लोक एकमेकांवर फार लक्ष ठेउन असतात. लोक अभ्यास करत नाहीयेत म्हणाल्यावर कमालीचा आनंद होतो त्यांना (ह्याला अपवाद असतात, न अशा लोकांची सादर माफी मागत आहे). तेव्हा लाईट गेलेत म्हणजे कोणीच काम करू शकत नाहीये, तेव्हा आपण पण टाईमपास करायला मोकळे ह्या कल्पनेने सगळ्यांना एकदम उत्साह येतो. खोलीत अंधार असतो न शिवाय मुंबईची हवा, प्रचंड उकडत असते. धक्का लावल्यावर पोळ्यातून मधमाश्या जश्या भराभर बाहेर पडायला लागतात तशी IIT तली मुले (न मुलीही) रस्त्यावर येतात. लेकसाईडला एकदम COEP च्या बोटक्लबचे रूप प्राप्त होते. फुटपाथ हे चालण्याखेरीज फतकल मारून बसायलाही वापरले जाऊ शकतात ह्याची प्रचीती येते. काही जण घोळक्याने laptop वर सामुदायिक चित्रपट-दर्शनाचा कार्यक्रम सुरु करतात. समस्त महिलावर्ग H11 मधून बाहेर एकदम पडल्याने काही लोकांना तर फारच जास्त आनंद होतो. एकावेळी इतक्या मुली IIT मध्ये! भारीच!! H11 समोर गर्दी जमू लागते. (सर्व मुलींची ह्या वाक्याबद्दल माफी. ही fact आहे. )
काही लोक IIT च्या बाहेर पडतात, हॉटेल्सची चंगळ होते. काही लोक जमून डंब-सी, अंताक्षरी सारखे खेळ खेळायला लागतात. काही लोक गझला गावून मनात साचलेल्या भावनांना वाट करून देतात. तर काही लोक गिटारवर गाणी म्हणतात.
काही लोकांना अचानक व्यायामाची महती आठवते न चक्क track pant n sport shoes अशा कडक तयारीत बाहेर पडून मैदानावर पळायला जातात.
तर असा हा आनंदोत्सव पाहून IIT लाही आपल्यामध्ये माणसेच राहतात ह्याची खात्री पटत असेल. लाईट परत कधी येऊच नयेत असे तिलाही वाटत नसेल तरच नवल!
काही लोकांची मात्र भयंकर पंचाईत होते. paper submission, presentations च्या deadlines असतील तर एकेक क्षण एकेका तासासारखा वाटतो. माझ्यावर अशी वेळ फारशी आलेलीच नाही. उलट एकदा माझी परीक्षा होती न लाईट गेले. खूप वेळ वाट पाहूनही आलेच नाहीत. म्हणून मग शेवटी सरांनी सोडून दिले. मग आम्ही खूप मज्जा केली. शेवटी ती परीक्षा रात्री ९-१२ ठेवण्यात आली. फारच मजेदार experience होता तो. दिवस इतका छान गेला होता की परीक्षा कशी झाली ह्याचा डोक्याला विचार न करू देताच सगळ्यांनी आपापले पाय कॅन्टीनकडे वळवले. गरमागरम कॉफी न शांत झोप!
IIT बद्दल मी उपरोधक काहीतरी लिहित असले तरी असे छान छान अनुभव फक्त IIT च देऊ शकते. technology साठी नाही तरी त्यांसाठी तरी प्रत्येकाने एकदा तरी IIT तल्या life चा अनुभव घ्यावाच!
आजच मजा झाली. lab मधून निघाले न वाटेत असताना अचानक लाईट गेले.बाप रे! सगळीकडे अंधार...रस्त्याला आत्ताच पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या लावल्या आहेत त्या तेवढ्या चमकत होत्या. काहीही दिसत नव्हते. अशा वेळी बिबट्या-साप यांसारख्या कॅम्पसमध्ये राहणाऱ्या प्राण्यांची विशेष आठवण येते..काही अंतर चालल्यावर गाड्यांचा प्रकाश दिसू लागल्यावर कुठे जीवात जीव आला. पटकन होस्टेलवर आले. पण रूमवर जायची सोय कुठे होती! माझा फोन फारच अत्याधुनिक :D असल्याने फारच प्रकाश देतो. त्यामुळे जिना तर अगदीच clear दिसतो. त्यात खोलीत मेणबत्ती नसतेच. passeges भूतबंगल्याची आठवण करून देतील असे न लोक आपापल्या labs मध्ये! बर काही काळ खाली बसावे म्हणाले तर आमच्याइथले डास साधे-सुधे चावत नाहीत तर आपल्याला अजून काही काळ बसले तर त्यांनी रक्त शोषल्याने आपल्याला anemia होईल की काय अशी माणसाला भीती वाटू शकण्यापर्यंत मजल गाठतात. IIT च्या BTECHs न जशी स्पेशल माजुर्डेपणा दिलेला असतो तसे इथल्या दासांनाही परमेश्वराने स्पेशल लांबीची सोंड दिली आहे की काय असा प्रश्न पडतो! jeans मधूनसुद्धा माणसाच्या पायापर्यंत पोचण्याची ability ह्या सोंडान्मध्ये असते. असो! किशोर कुमारच्या "जाते थे जपान पोहोंच गये चीन समझ गये ना" ह्या गाण्यासारखी माझी गाडी "IIT तल्या आनंदोत्सवाकडून" डासबोधाकडे पोहोचण्याआधीच थांबवावी हे बरे!